Thursday, 27 January 2022

 राष्ट्रनिर्माण कार्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान

विविध क्षेत्रात मागील अडीच वर्षात भरीव कामगिरी

-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे गौरवोद्गार

            मुंबई, दि. २६- राज्याने आरोग्य, पर्यावरण, उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, पर्यटन, वने, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा अशा विविध क्षेत्रात गेल्या अडीच वर्षात भरीव कामगिरी केली आहे. राष्ट्रनिर्माण कार्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करूया, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

            भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान समाजसुधारकांना अभिवादन करून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

            यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, तिन्ही सेनादलाचे राज्यातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक संजय पांडे, महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव दीपक कपूर, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव उमेश मदन, कोविड योद्धे आदी उपस्थित होते. कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

            यावेळी राज्याला संबोधित करताना राज्यपाल म्हणाले, राष्ट्रनिर्माण कार्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे आणि म्हणूनच राज्याला देशाचे 'ग्रोथ इंजिन' संबोधले जाते. भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यानिमित्ताने राज्यात आपण विविध कार्यक्रमही आयोजित करीत आहोत. गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राने केलेली कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या प्रयत्नांची दखल संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेने घेतली. नुकताच स्कॉटलंड येथे महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लिडरशिप’ पुरस्कार मिळाला. इलेक्ट्रिक वाहन धोरणामुळे देशातल्या पर्यावरण आणि वाहन उद्योगामध्ये नव्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सार्वजनिक वाहतुकीचे पूर्ण विद्युतीकरण हे लक्ष्य आपण ठेवले असून मुंबईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरूवातही झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या स्थानिक नागरी संस्थांमधील नागरिक, गृहनिर्माण संस्था यांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात सर्व शासकीय विभागांनी इलेक्ट्रिक वाहने वापरावीत यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

            गेल्या दोन वर्षांपासून कोविडशी मुकाबला करीत असतांना अर्थचक्र थांबू न देता, केवळ गर्दीवर निर्बंध घालण्याचे राज्य सरकारचे नियोजन देशात वैशिष्ट्यपूर्ण ठरले. कोविडचा नियोजनबद्धरित्या मुकाबला केल्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने ‘मुंबई मॉडेल’ चे कौतुक केले आहे. मुंबई उच्च न्यायालय, नीती आयोग तसेच जागतिक आरोग्य संघटनेने देखील महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. हे यश केवळ प्रशासनाचे नसून फ्रंट लाईन वर्कर्स, डॉक्टर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे आहे आणि म्हणून या कोरोना योद्ध्यांचे राज्यपालांनी मनापासून कौतुक केले.

            संकटाचे संधीत रूपांतर करून, राज्य शासनाने प्रयोगशाळा, बेड्सची संख्या आणि वैद्यकीय साधनसामग्री आदी आरोग्याच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढविल्या. देशात पहिल्यांदाच तज्ज्ञ डॉक्टर्सचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय टास्क फोर्स निर्माण केले. बालकांसाठी वेगळा टास्क फोर्स उभा केला. गेल्या दोन वर्षांत महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत सुमारे साडे चौदा लाख मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या. राज्य सरकारने कोविड काळात गरीब व गरजू जनतेला स्वस्त दरात भोजन देण्यासाठी शिवभोजन थाळी मोफत दिली. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून २५ लाख मजुरांना रोजगार उपलब्ध करुन दिला. बांधकाम कामगार, आदिवासींना खावटी कर्ज, रिक्षा, टॅक्सी चालक, पालक गमावलेले बालक, विधवा महिला, निराधार योजनेतील निवृत्ती वेतनधारक या सर्वांना या संकटात आधार देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.

            गेल्या दोन वर्षात उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, पर्यावरण, पर्यटन, वने, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा अशा प्रत्येक विभागांनी राज्यात नवनवीन योजना राबविल्याचे राज्यपालांनी सांगितले. शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली आणि ३२ लाख शेतकऱ्यांना २० हजार २३४ कोटी रुपये इतकी कर्जमाफी देऊन त्यांना मोठा दिलासा दिला. शेतकऱ्याला आपल्या पायावर भक्कमपणे उभे करणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे शासनाचे धोरण असल्याचे ते म्हणाले. त्याचाच एक भाग म्हणून माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविला जात आहे. स्पर्धेच्या वातावरणात शेतकऱ्यांना सक्षम बनविणे, शेतमालाच्या सर्वसमावेशी मूल्य साखळ्या विकसीत करणे, त्याचबरोबर ‘विकेल ते पिकेल’च्या माध्यमातून, शेतकऱ्यांना अधिक बळ देणे सुरू आहे. याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होत आहे. आज राज्यात पाच हजार शेतकरी गट तसेच कंपन्यांना थेट खरेदीदारांशी जोडण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःला समर्थ करावे यासाठी ई-पीक पाहणी हे मोबाईल अप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्याअखेर सुमारे ९६ लाख शेतकऱ्यांनी हे मोबाईल अप्लिकेशन डाऊनलोड करून या योजनेचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.

            नवीकरणीय उर्जेचे धोरण आणून महाराष्ट्राने ऊर्जा क्रांती आणली आहे. शेतकऱ्यांना किफायतशीर आणि दिवसा सुनिश्चित वीजपुरवठा होण्यासाठी कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करणे सुरू आहे. नवीन अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणानुसार पाच लाख सौर कृषीपंप बसविण्यात येत आहेत. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राज्यात राबवून सुमारे आठ हजार जलस्त्रोत योजनांची दुरूस्ती करण्यात येत आहे. 

            राज्यपाल म्हणाले, राज्याने गेल्या दोन वर्षांत विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणली आहे. एक लाख ८८ हजार ७३ कोटी रूपयांचे ९६ सामंजस्य करार केले आहेत. ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२१ या कालावधीत राज्यामध्ये एक लाख ७१ हजार ८०७ कोटींची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. राज्याने पर्यटन क्षेत्राला संजीवनी दिली आहे. आतिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला तसेच परवान्यांची संख्या कमी केली आणि अनेक करात सवलती दिल्या. या क्षेत्रात रोजगारवाढीची मोठी संधी असून, हे रोजगार स्थानिकांना मिळतील हे पाहिले जात आहे. कृषी पर्यटन, साहसी पर्यटन तसेच इतर नवनवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. मुंबई हे जागतिक दर्जाचे पर्यटन शहर झाले पाहिजे असे शासनाचे नियोजन आहे. वरळी येथील शासकीय दूध योजनेच्या १४ एकर जागेवर एक हजार कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची नवीन पिढीला ओळख करून देण्यासाठी शासनाने राज्यातील गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनाची योजना हाती घेतली आहे.

            राज्यपाल म्हणाले, पायाभूत सुविधा कामे व रस्ते बांधकामात राज्याने मोठी आघाडी घेतली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. याशिवाय मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची क्षमता वाढवून प्रवासाचा वेळ आणखी कमी करणे, वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू, कोकण द्रुतगती महामार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, सागरी महामार्गाचे उन्नतीकरण, पुणे शहराभोवतालचा चक्राकार वळण मार्ग, रेवस-रेडी रस्ता सागरी महामार्ग, वर्सोवा-विरार सागरी मार्ग, समृद्धी महामार्गास जोडणारा जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मुंबईची वाहतूक गतिमान करणाऱ्या कोस्टल रोडचे कामही ५० टक्के पूर्ण झाले आहे. केवळ देशातच नव्हे तर जगात हा प्रकल्प नावाजला जाईल. मुंबई महानगर, पुणे, नागपूर याठिकाणी मेट्रोची कामे वेगाने सुरू असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई महानगरात १७८ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुणे महानगर प्रदेशात मेट्रोची कामे प्रगतीपथावर आहेत. तर, नागपूर मेट्रो प्रकल्पातील सुमारे २५ किलोमीटर लांब प्रवासी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. महिला खरेदीदारांना मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्के सवलत देण्याचा क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतला आहे. मुंबईत ऐतिहासिक बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला असून लवकरच धारावी पुनर्विकासाचे कामही मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी नुकतीच मुंबई महानगरपालिकेने ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधा सुरू केली आहे. परिवहन विभागाने देखील त्यांच्या सुविधा ऑनलाइन करून नागरिक, वाहतूकदार यांना मोठा दिलासा दिला आहे.  

            सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून शहरी भागात १५ लाख ३८ हजार घरकुले बांधण्यात येत आहेत. ग्रामीण भागात महाआवास अभियानामधून ४ लाख ४४ हजार घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. यावर्षीही हे अभियान राबविण्यात येत असून याद्वारे ५ लाख घरकुले बांधून पूर्ण करण्यात येतील, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना शुद्ध, पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा व्हावा यासाठी 'हर घर नलसे जल' योजना राबविण्यात येत आहे. शासनाने सुमारे ९५ टक्के नळ जोडण्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामुळे घराघरात नळाने पाणी येऊन लोकांचे विशेषतः महिलांचे कष्ट कमी होणार आहेत. महिला आणि मुलांवरील अत्याचाराला कठोरपणे आळा बसण्यासाठी नुकताच विधिमंडळात शक्ती कायदा देखील संमत करण्यात आला आहे. 

            अन्य महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख करताना राज्यपाल म्हणाले, राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्याचे आणि जागतिक नकाशावर राज्याचे नाव कोरण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करून नवी मुंबई येथे ‘स्पोर्टस सिटी’ उभारण्याचा शासनाचा मानस आहे. शासनाने ग्रामीण व शहरी भागातील गाव, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे रद्द करुन त्यांना समताधिष्ठित किंवा महापुरूषांची नावे देण्याचा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यात २३ ठिकाणी शैक्षणिक संकुलांमध्ये वसतीगृहे सुरु करण्यात आली आहेत. मुला-मुलींसाठी शिष्यवृत्ती, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज यासारख्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये सीटी सर्व्हेलन्स प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. साहित्य व संस्कृतीचे जतन करण्यासाठी तसेच वाचनाची चळवळ अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकांचे गाव उभारण्यात येणार आहे. तरूणांमधील कल्पकतेला चालना देण्यासाठी शासन स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहे. स्टार्टअप्स आणि प्रारंभिक टप्प्यातील उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे बौद्धीक मालमत्ता हक्क म्हणजेच पेटंट मिळविण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येत आहे. राज्याचा जैविक वारसा जपण्यास शासन कटिबद्ध आहे. यासाठी राज्यात नव्याने चार जैविक वारसास्थळे घोषित करण्यात आली आहेत. पश्चिम घाट तसेच विदर्भातील वन्यजीव कॉरिडॉर अधिक मजबूत करण्यासाठी नऊ संवर्धन राखीव क्षेत्रे अधिसूचित करण्यात आली आहेत. वन्यजीव कृती आराखडा स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणात देखील सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ग्रामीण भागासह आता शहरांनीही स्वच्छता चळवळीला आपलेसे केले आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसीत महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन काम करीत असल्याचा राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

            या कार्यक्रमात गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस वाद्यवृंद पथक तसेच बृहन्मुंबई अश्वदलाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली. मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपायुक्त निलोत्पल हे संचलन प्रमुख होते. कार्यक्रमाचे निवेदन शिबानी जोशी यांनी केले.

            राज्यपालांनी यावेळी निमंत्रितांची भेट घेतली व प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

राजभवन येथे ध्वजारोहण.

            तत्पूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकवला व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी राष्ट्रगीत म्हटले.  


०००००

 राज्यपालांच्या हस्ते संस्कृती जागरण मंडळाच्या सांस्कृतिक विशेषांकाचे प्रकाशन

‘स्वातंत्र्य लढ्यातील योगदानासोबत वनवासी बांधवांचे संस्कृती रक्षणाचे कार्य समाजापुढे आणावे’ - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

            मुंबई, दि. 26 : देशातील वनवासी, जनजाती व आदिवासी बांधवांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान जसे मोठे आहे, तसेच संस्कृती रक्षणाचे त्यांचे कार्य देखील महत्वाचे आहे. वनवासी बांधवांच्या शीघ्रतम विकासासाठी कार्य करताना त्यांचे संस्कृती रक्षणाचे कार्य देखील समाजापुढे आणले पाहिजे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.  

            संस्कृती जागरण मंडळ व जनजाती विकास मंचतर्फे ‘स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान’ या विषयावरील प्रजासत्ताक दिन विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २६) राजभवन, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

            कार्यक्रमाला जनजाती विकास मंचचे अध्यक्ष नरेश मराड, सांस्कृतिक वार्तापत्राचे सचिव शिरीष पदे, वार्तापत्राच्या व्यवस्थापिका सुनिता पेंढारकर, रा. स्व. संघाच्या कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे, अजय मुडपे व इतर निमंत्रित उपस्थित होते.

            स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक क्षेत्रात महिलांची प्रगती होऊन त्या पुढे आल्या. अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांची देखील प्रगती झाली. मात्र वनवासी बांधव विकासापासून अजूनही दूर आहेत. आजही अनेक आदिवासी भागांमध्ये रस्ते, दूरसंचार, वीज आदी सेवा पोहोचल्या नसून वनवासी बांधवांच्या विकासासाठी शीघ्रगतीने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे राज्यपालांनी सांगितले. आदिवासींच्या विकासासाठी शासनासह सेवाभावी संस्थांनी देखील अधिक प्रयत्न केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

            ‘स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान’ या विषयावरील विशेषांक प्रसिद्ध करून संस्कृती जागरण मंडळाने राज्यातील तसेच देशातील अनेक ज्ञात व अज्ञात वनवासी बांधवांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाची अभ्यासपूर्ण माहिती समोर आणल्याबद्दल राज्यपालांनी व्यवस्थापिका सुनिता पेंढारकर व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले. 

            मुकुंद कानडे यांनी यावेळी विशेषांकाची माहिती दिली तर नरेश मराड यांनी जनजाती विकास मंचची माहिती दिली. सांस्कृतिक वार्तापत्राचे कार्यवाह शिरीष पदे यांनी आभार प्रदर्शन केले.    

000

Wednesday, 26 January 2022

 Continue भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशक्षमता आता 100

            मुंबई, दि. 25: नागपूरच्या नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 60 वरुन 100 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

            या आयुर्वेद महाविदयालयातील बी.ए.एम.एस. या नमूद आयुर्वेद या पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग यांनी निर्धारीत केल्यानुसार 100 इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.

000

 डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता आता 200

            मुंबई, दि. 25: अहमदनगरच्या डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे मेडिकल कॉलेज अँड हॉस्पीटलच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 150 वरुन 200 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

            या वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार 200 इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.

वृत्त क्र. 269

अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेजच्या

पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता आता 150

            मुंबई, दि. 25: धुळ्यातील साक्री रोड येथील अण्णासाहेब चुडामण पाटील मेमेारियल मेडिकल कॉलेजच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 100 वरुन 150 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

            या वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार 150 इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.

00000

वृत्त क्र. 270

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशक्षमता आता 150

            मुंबई, दि. 25 : अमरावतीच्या शिवाजीनगर येथील डॉ. पंजाबराव उपाख्य देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 100 वरुन 150 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

            या वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार 150 इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.

0000


 



 Continue   पर्यटन सहसंचालक डॉ.सावळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विविध श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या राज्य पर्यटन पुरस्कारांची यादी

टूर ऑपरेटर्स : बेस्ट टूर ऑपरेटर (नॅशनल), बेस्ट टूर ऑपरेटर (इंटरनॅशनल), बेस्ट ट्रॅव्हल एजंट (महाराष्ट्र), बेस्ट टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स (महाराष्ट्र), बेस्ट ॲडव्हेंचर टूर ऑपरेटर्स (महाराष्ट्र).

आदरातिथ्य : बेस्ट हॉटेल, बेस्ट हेरिटेज हॉटेल, बेस्ट इको-फ्रेंडली हॉटेल, बेस्ट इको-फ्रेंडली फॉरेस्ट/टेन्टेड अकोमोडेशन, बेस्ट होस्टेड अकोमोडेशन.

फुड अँड बेव्हरेज : बेस्ट होम डायनिंग, बेस्ट रेस्टॉरंट स्टँडअलोन, बेस्ट रेस्टॉरंट हॉटेल.

विविध श्रेणी : बेस्ट टुरिस्ट गाईड ऑफ महाराष्ट्र, बेस्ट अम्युझमेंट/ थीम पार्क्स, बेस्ट माइस सेंटर, स्पेशलाईज्ड टुरिझम सर्व्हिसेस, टुरिझम एज्युकेशन अँड ट्रेनिंग, बेस्ट थीम/ निचे टुरिझम ॲवॉर्ड.

गव्हर्नमेंट डिपार्टमेंट : मोस्ट टुरिस्ट फ्रेंडली नॅशनल पार्क/ सँक्चुरी, मोस्ट टुरिस्ट फ्रेंडली पिलग्रीमेज सेंटर (ट्रस्ट/ गव्हर्नमेंट बॉडी), बेस्ट सिव्हिक मॅनेजमेंट सिटी (म्युनिसिपल कॉर्पोरेशन), बेस्ट सिव्हिक मॅनेजमेंट सिटी (म्युनिसिपल कॉन्सिल/ नगर पालिका), बेस्ट व्हिलेज (ग्राम पंचायत).

डिजीटल टुरिझम ॲवार्ड : बेस्ट इन्फ्लुएन्सर ऑन सोशल मीडिया (युट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक अँड ट्विटर), बेस्ट ट्रॅव्हल रायटर/ ब्लॉगर, बेस्ट महाराष्ट्र ट्रॅव्हल फोटोग्राफर, बेस्ट टुरिझम प्रमोशन इन प्रिंट मीडिया (न्युजपेपर/ मॅगझिन/ पब्लिकेशन), बेस्ट टुरिझम प्रमोशन इन डिजीटल मीडिया (न्यूजपेपर/ मॅगझिन/ पब्लिकेशन/ वेब पोर्टल), बेस्ट टुरिझम प्रमोशन इन इलेक्ट्रॉनिक मीडिया.

विविध टुरिझम टुरिस्ट सेगमेंट : सोशल इम्पॅक्ट इन टुरिझम ॲवार्ड, स्वच्छ पर्यटन प्रोजेक्ट ॲवॉर्ड ऑर चेंज मेकर्स ॲवॉर्ड, मोस्ट इनोव्हेटीव्ह/ युनिक टुरिझम प्रोडक्ट, बेस्ट वेलनेस सेंटर, बेस्ट मेडिकल टुरिझम फॅसिलिटी, बेस्ट टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, बेस्ट म्युझियम ॲवार्ड, बेस्ट टुरिझम डेस्टिनेशन प्रमोशन थ्रू मुव्ही/ वेब सिरीज/ डॉक्युमेंटरी इ., बेस्ट मोन्युमेंट ॲक्सेसिबल टू टुरिस्ट.

एक फेब्रुवारी पासून या श्रेणींमध्ये अर्ज करता येणार असून विजेत्यांना महाराष्ट्र दिनी पारितोषिके दिली जातील. याबाबतची अधिक माहिती पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.

 वैभवशाली, निसर्गसंपन्न महाराष्ट्राचा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून

जागतिक नकाशावर झळकवण्यास पर्यटन विभाग सज्ज

                                                   - मंत्री आदित्य ठाकरे

राज्य पर्यटन पुरस्कार योजनेची घोषणna

            मुंबई, दि. 25- महाराष्ट्रात सर्व प्रकारची पर्यटनस्थळे उपलब्ध आहेत. या वैभवशाली, निसर्गसंपन्न महाराष्ट्राचा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक नकाशावर झळकवण्यास पर्यटन विभाग सज्ज असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पर्यटकांना सोयी सुविधांबरोबरच नाविन्यपूर्ण पर्यटनाचा अनुभव घेता यावा, यासाठी राज्याने विविध धोरणे आखली आहेत. पर्यटनवृद्धीसाठी शासनाबरोबरच विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांचाही मोलाचा हातभार असतो, ही बाब विचारात घेऊन राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या औचित्याने त्यांनी विविध 39 श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या राज्य पर्यटन पुरस्कार योजनेची घोषणा केली.

            पर्यटन मंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर, सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी यावेळी उपस्थित होते.

            पर्यटन मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, बीच शॅक, कॅरॅव्हॅन अशा विविध धोरणांच्या माध्यमातून राज्याने पर्यटन स्थळे अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पर्यटकांना राहण्यासाठी देखील होम स्टे, पर्यटन विकास महामंडळाची रिसॉर्टस् आदी पर्यायांतून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवीन पिढीच्या पर्यटकांचाही विचार करण्यात आला असून पर्यटक, बायकर्स, सायकलिस्ट यांच्यासह पर्यटन क्षेत्रात कार्यरत भागीदारांची मते जाणून घेऊन विविध धोरणे आखण्यात आली आहेत. कोविड मुळे पर्यटनात खंड पडला असला तरीही कोविडनंतरच्या काळासाठी विविध धोरणांच्या माध्यमातून शासन सज्ज झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आता राज्यातील विविध पर्यटनस्थळांची माहिती जागतिक स्तरावर करून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

            पर्यटन राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या प्राकृतिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक ठेव्याचे आपण जतन करीत आहोत. राज्याचा हा मौल्यवान ठेवा पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करण्यासाठी महत्त्वाची धोरणे आखली आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून वेळोवेळी मिळत आहे. राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने ‘ग्रामीण आणि समुदाय आधारित पर्यटन’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसेनानी, थोर समाज सुधारक व क्रांतिकारक यांच्या ऐतिहासिक चळवळींचे, जन्मभूमीचे दर्शन येत्या काळात अधिक व्यापक माध्यमातून घडविण्या noचा प्रयत्न पर्यटन विभाग करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

            प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी पर्यटकांची आवड-निवड लक्षात घेऊन पर्यटन धोरणांमध्ये लवचिकता असणे आवश्यक असून त्यानुसार राज्याने विविध धोरणे आखली असल्याचे सांगितले. राज्यात असलेली विविध संग्रहालये हा माहितीचा खजिना असून पर्यटकांना त्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

            पर्यटन संचालक श्री.बोरीकर यांनी पर्यटनाचे फायदे व देशाच्या विकासाच्या दृष्टीने पर्यटन क्षेत्राचे महत्त्व सर्वांना पटवून देणे तसेच राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी या हेतूने राष्ट्रीय पर्यटन दिनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. केंद्र सरकारमार्फत ‘आझादी का अमृत महोत्सव’ही साजरा केला जात आहे. यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना ‘ग्रामीण आणि समुदायावर आधारित पर्यटन’ ही असल्याने ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात नव्याने जाहीर झालेल्या कृषी, कॅरॅव्हॅन आणि साहसी पर्यटन धोरणाअंतर्गत नोंदणीसाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पर्यटन संचालनालय समाजमाध्यमांद्वारे पर्यटनस्थळांविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले.

            पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते यावेळी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरणाअंतर्गत पहिली नोंदणी करण्यात आलेल्या ‘मोटोहोम’ संस्थेच्या सचिन पांचाळ यांचा, साहसी पर्यटन धोरणाअंतर्गत जमीन, हवा आणि पाणी अशा विविध क्षेत्रात नोंदणीद्वारे सहभागी झालेल्या वसंत लिमये, पुष्कराज आपटे, अनुपम अविनाश जाधव, चिन्मय दिवेकर, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कांबळे यांचा प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर आय लव्ह महाराष्ट्र या नावाने सहा भागांचा कार्यक्रम केल्याबद्दल कर्ली टेल संस्थेच्या कामिया जानी वर्मा यांचा तसेच किल्ले पर्यटन वृद्धींगत करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची नवीन पिढीला ओळख करून देण्यासाठी ‘बायकर्स क्लब’ ने 18 किल्ल्यांची भ्रमंती केली आहे. यातील प्रतिनिधींचा देखील श्री.ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. क्रिएट युवर ओन स्टोरी इन्फ्लुएन्सर कार्यक्रमाअंतर्गत सिद्धार्थ जोशी यांचा प्रातिनिधीक स्वरूपात नोंदणी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या अंतर्गत एक लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेले 100 इन्फ्लुएन्सर आगामी सहा महिने राज्यातील विविध पर्यटनस्थळी जाऊन पर्यटनस्थळांची माहिती सांगणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते यावेळी दोन कॅरॅव्हॅनला झेंडा दाखवून त्याचाही शुभारंभ करण्यात आला. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील ‘फ्रीडम मुव्हमेंट सर्किट’ मधील महत्त्वाची ठिकाणे आणि टूर ऑपरेटर्सची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

            पर्यटन सहसंचालक डॉ.सावळकर यांनी उपस्थितांचे

 


Featured post

Lakshvedhi