Monday, 17 January 2022

 फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर देशाचा नावलौकिक होईल

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

        अलिबाग,दि.16:- नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.

     नवी मुंबई, खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence) उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, खासदार तथा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष व महिला आशिया चषक भारत 2022 चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल,खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर,आदेश बांदेकर,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून तर नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, सहव्यवस्थापक कैलास शिंदे यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

मातीशी नाळ जोडली

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. खारघर येथे निर्माण झालेले हे उत्कृष्टता केंद्र नव्या पिढीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. येथे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, याहून अधिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम अभिनंदनीय आहे.

स्पोर्ट्स सिटीचा उदय

             खारघर हे शहर भविष्यात "स्पोर्टस् सिटी" म्हणून नावारूपाला येईल, यात शंकाच नाही. या ठिकाणी "सर्व खेळांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा एकाच शहरात" ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या मैदानात सराव करणारा हिंदुस्थानचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर विजेता संघाच्या रूपात दिसावा, जागतिक पातळीवर हिंदुस्तानच्या संघाचा दरारा निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.

     यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राज्य शासनाचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. नव्या पिढीचा आवडता खेळ फुटबॉलच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाचे उत्तम सहकार्य मिळत आहे. या उत्कृष्टता केंद्राच्या व मैदानाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू घडतील, असे सांगून महाराष्ट्र राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढेल यासाठी सर्वजण मिळून सातत्याने प्रयत्नशील राहू, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. तसेच याच मैदानात लवकरच एएफसी वूमेन एशियन कप इंडिया 2022 चे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे श्री.एकनाथ शिंदे यांनी खारघर येथील हे उत्कृष्टता केंद्र एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे,असे सांगून नवी मुंबई शहर हे एज्युकेशन सिटी, आयटी सिटी याबरोबरच आता "स्पोर्टस् सिटी" म्हणूनही ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

नव्या पिढीसाठी पर्वणी

            पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटबॉल प्रेमी नव्या पिढीसाठी हे केंद्र एक पर्वणी ठरणार असून येथे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. खारघर, नवी मुंबई, पनवेल हे विविध खेळ व त्या खेळांसाठीच्या सोयीसुविधांचे केंद्रबिंदू होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले खेळाडू, संघ आपल्या महाराष्ट्राचे व हिंदुस्थानचे नाव मोठे करतील, असे सांगितले.


 


क्रीडा क्षेत्रातील मानाचा केंद्रबिंदू


            राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे या म्हणाल्या, नव्या पिढीचा फुटबॉल हा आवडता खेळ आहे. येत्या काळात पनवेल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या पार्श्वभूमीवर या उत्कृष्टता केंद्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजित होतील. ग्रामीण व शहरी भागातील प्रतिभावंत खेळाडूंसाठी हा प्रकल्प निश्चितच लाभदायक राहील. यातून उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले जातील, त्यामुळे हा प्रकल्प क्रीडा क्षेत्रातील एक मानाचा केंद्रबिंदू ठरेल.

   या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या शुभेच्छा दिल्या.

     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाविषयीची तांत्रिक व प्रशासकीय माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. तसेच या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे विशेष आभारही मानले.


    कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे या प्रकल्पाचे आभासी उद्घाटन झाले. त्यानंतर या प्रकल्पाच्या निर्मितीबाबतची छोटीशी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

 खतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करा, केंद्राकडे मागणी

कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र

            मुंबई, दिनांक १६: रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे यासंदर्भात त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र लिहिले आहे.

            मंत्री श्री. भुसे आपल्या पत्रात म्हणतात, रब्बी हंगाम सध्या जोरात चालू आहे. अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्र राज्याचे लागवडीयोग्य क्षेत्र वाढले असल्याने खताची मागणी जास्त आहे. अलीकडे अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्या असल्याने एवढी महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. राज्यात अधिकाधिक अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात.

            याप्रकरणी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणी मंत्री श्री. भुसे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

             खत उत्पादकांनी राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार खतांची विक्री करावी. सुरळीत पुरवठा राखण्यासाठी आणि खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक पावले केंद्र सरकारने उचलावीत आणि रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार प्रती ५० किलो बॅगचा खतनिहाय दर आणि झालेली वाढ खालीलप्रमाणे: (कंसात नमूद दर दिनांक १३ जानेवारी,२०२२ रोजीचे)

१०:२६:२६- १४४० ते १४७० (१४४० ते १६४०). वाढ: १७० रुपये.

१२:३२:१६- १४५० ते १४९० (१४५० ते १६४०) वाढ: १५० रुपये. 

१६:२०:०:१३ - १०७५ ते १२५० (११२५ ते १२५०) वाढ: ५० रुपये.

अमोनियम सल्फेट: ८७५ (१०००) वाढ: १२५.


१५:१५:१५:०९ - ११८० ते १४५० (१३७५ ते १४५०) वाढ:१९५. 


 


 



Sunday, 16 January 2022

 स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित

पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन

“महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी विचारच प्रेरक”

-उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई दि. १६: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपाने स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी सक्षमपणे पुढे नेला. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचे रक्षण करत स्वराज्याचा विस्तार केला. युध्दनिपुण, प्रकांड पंडित छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाला आणि शौर्याला मानाचा मुजरा करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वाभिमानी’ विचारच प्रेरक असून त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यावर मोठे संकट आले. स्वराज्यावरील या संकटाचा मोठ्या धैर्याने सामना करत छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण करुन स्वराज्याच्या सीमा विस्तारल्या. आपल्या कार्यकाळात छत्रपती संभाजी महाराज एकही युध्द हरले नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने स्वराज्यातील रयतेला स्थैर्य प्राप्त झाले, स्वराज्याला सक्षम छत्रपती मिळाले, स्वराज्याच्या शत्रूंवर वचक बसला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांच्या शिकवणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार केला. रयतेसाठी आणि स्वराज्याच्या स्वाभिमानासाठी त्यांनी समर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्श विचारांवर मार्गक्रमण करत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

00000



 देवाजवळ दिवा का लावावा. आणि कधी लावावा...

सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असते. दिवसाला एकूण ०८ प्रहर असतात यात दिवसाला ०४ व रात्रीचे ०४ चे प्रहर असे एकूण ०८ प्रहर असतात. यात दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो ०४ ते ०७ वाजे पर्यत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. संध्या मध्ये सुर्य अस्ताची वेळ आणि सुर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातरवेळ असते. जी सध्या ६.४५ ते ७.३० आहे. दिनमानानुसार ती बदलत जाते जसे की उत्तरायणात सुर्यास्त ऊशीरा होतो तर दक्षिणायणात सुर्यास्त लवकर होतो त्यामूळे संध्या समय वरखाली होतो त्यामूळे दिनमानानुसार कातरवेळ बदलते. 

काही लोक सांगतात ७.३७ ला दिवा लावावा कारण कामाख्या देवीचा दिवा हा ७.३७ लावतात परंतू पूर्वी तसे नव्हते पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती. गावात वरसकी पद्धती असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याची वरसकी असेल तो सुर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत. दिवा लावल्यावर घंटानाद होत असे. घंटानाद ऐकताच सर्व जण आपआपल्या घरात देवाला व तुळशीला दिवाबत्ती लावत. त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मान-पाण होता, ग्रामदेवताची दिवाबत्ती लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे या मागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर राखणदारा सोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करते. कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रुप धारण करुन जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो. कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रुपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातारवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशी जवळ दिवा लावला जातो.

संध्याकाळी 6.30 नंतर केव्हाही दिवा लावावा, दिवा लावल्यावर घरातील सुवासींनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे. आणि उंबरठ्यावर हळद कुंकू वहावे.

देवाजवळ आणि तुळशीजवळ

दिवा लावून देव अन् दिवा यांना नमस्कार करावा !

 सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ४८ मिनिटांच्या (दोन घटिकांच्या) काळाला ‘संधीकाल’, असे म्हणतात. संधीकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ, तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधीकालात दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल. तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा. सूर्यास्तानंतरच्या संधीकालातही दिवा लावावा. (खरे तर देवाजवळ दिवा २४ घंटे तेवत असायला हवा.)

 ‘यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळप्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो’, असे गुरुचरित्रात सांगितले आहे. दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडेतेलाचा दिवा लावावा.

 देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते. देवतेच्या या कृपाकवचामुळे घराचे अन्य संकटांपासूनही रक्षण होण्यास साहाय्य होते.

दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्यावे.

हे लक्षात आले कि मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल.

   दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे. सूर्य मावळल्यानंतर, वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते.

  यामुळे, जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात. आणि असे जीव हे अतिसुक्ष्म असल्याने शरिरावरील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरिरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात.

  स्त्रियांच्या शरिरावरील रंध्रे ही पुरूषांच्या शरिरावरिल रंध्रांपेक्षा मोठी असतात. त्यामुळे स्त्रियांच्या शरिरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटील शरिररचनेनुसार, स्त्रियांना जास्त धोका असतो.

त्यामुळेच सातच्या आत घरि असावे असे सांगण्यात आले आहे.

  वातावरणात सुक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा, सर्वत्र दिवे लावून मिळवता येते.

  म्हणून दिवे लावावेत. तसेच प्रकाशाचीही कमतरता भरुन निघते.

    सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात. यावेळी प्रचण्ड डिस्टर्बन्स असतो. या काळात ऊर्जेची आवश्यकता असते. 

    त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्रदर्शन होण्याआधी पर्यंत दिवे लावावेत.

   तसेच हे दिवे तेलाचे किंवा तुपाचेच असावेत.

   वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूंची वाढ ही, फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडले जाणार्या लहरींद्वारेच थोपवली जाते.

इलेक्ट्रीकल दिव्यांद्वारे निघणार्या लहरींद्वारे थोपवली जाऊ शकत नाही.

सायंकाळी संध्या करावी आणि देवाजवळ दिवा लावावा. याच वेळी अंगणात तुळशीजवळही दिवा लावावा. देवाजवळ लावलेला दिवा २४ घंटे तेवत असायला हवा. सायंकाळी दिव्याच्या वातीवर आलेली काजळी काढावी. सध्या बहुतेक जणांच्या घरात २४ घंटे दिवा तेवत ठेवलेला नसतो. त्यामुळे त्यांनी सायंकाळ झाल्यानंतर देवाजवळ दिवा लावावा.

तिन्हीसांजेला घरात अन् तुळशीजवळ दिवा लावल्याने

घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होणे

आणि त्या वेळी वातावरणातील वाईट शक्तींचा त्रास होऊ नये; म्हणून घरी थांबणे

‘तिन्हीसांजेला, म्हणजेच दिवेलागणीच्या वेळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वातावरणातील वाईट शक्तींच्या संचाराम म्हणून शक्यतो दिवेलागणीच्या वेळेपूर्वी घरी यावे किंवा दिवेलागणीनंतर घरातून बाहेर पडू नये. बर्‍याचदा वाईट शक्तींची त्रास हा तिन्हीसांजेच्या वेळी सर्वांत जास्त प्रमाणात होते. अघोरी विद्येचे उपासक तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणार्‍या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करवून घेतात. म्हणून तिन्हीसांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात, हत्या (खून) होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात. या काळाला ‘कातरवेळ’ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ’, असे म्हणतात.’

 तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते. त्यामुळे वायूमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते.

वायूमंडलात कार्यरत असणार्‍या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय (भीती) निर्माण करतात.

तिन्हीसांजेच्या वेळी ‘शुभं करोति०’ म्हटल्यामुळे देहाभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते. तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने १२ घंटे सूक्ष्मातून कार्यरत रहातात.

 मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते. तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास साहाय्य होते.’ 

दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात बदल होत असतात . दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशीर करावी . दिवस लहान होत गेला कि सकाळची पूजा उशीरा आणि सायंकाळची लवकर . या दोन विभागात दोन्ही वेळेच्या पूजेचे टाईमिंग फिक्स ठेवा . आणि पूजा , दिवेलागण करा . 

आता लवकर दिवस मावळायला लागलाय भाद्रपद ते माघ दिवस लहान असतो म्हणून दिवेलागण लवकर करावी . फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो. चैत्र वैशाखात तर सायंकाळी सात वाजता ही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवेलागण करावी .

देव्हाऱ्यात व तुळशी जवळ पहाटे पासून(दुपारी वगैरे आपोआप विझला तरी हरकत नाही) रात्री ९ वाजेपर्यंत तेवत ठेवणे कारण, 

हिंदू धर्मानुसार रात्री ९ वाजता शेजारती झाल्यानंतर देव विश्राम करतात व तेंव्हा उजेड नसावा!

दिवा सुर्योदया आधी आणि सुर्यास्ता नंतर लावावा....

कारण ती प्रकाशाची पुजा आहे.. त्या प्रतीचा ऋणानुभाव आहे आणी प्रकाशाची पुजा म्हणजेच देवाची पुजा होय....


🙏🙏🙏

आंतरजालावरून प्राप्त

🚩 प्रेषक-: मिलिंद रानडे 🙏

Saturday, 15 January 2022

 रायगड किल्ला व परिसर विकासाच्या कामासाठी

प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

· रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचा आढावा

            मुंबई, दि. 12 : रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची कामे गतीने व्हावीत, कामांची गुणवत्ता, दर्जा कायम राखावा या विकासकामांना गती मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, पर्यटन विभाग, पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन यांनी समन्वय राखून प्राधिकरणाला कामकाजात सहकार्य करावे, या प्राधिकरणाला मंजूर असलेला यंदाच्या आर्थिक वर्षातील नियतव्यय शंभर टक्के वितरीत करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच या प्राधिकरणाला प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

            मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचा आढावा घेतला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार संभाजी राजे, खासदार सुनिल तटकरे, सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, कोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आदि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी घडविलेला इतिहास हा प्रेरणादायी आहे. या इतिहासात रायगड आणि परिसराला मोठे महत्व आहे. त्यामुळे रायगड किल्ल्याचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाला निधी कमी पडू देणार नाही. या प्राधिकरणाच्या कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या निधीचा विनियोग पालकमंत्री, जिल्हा प्रशासन आणि प्राधिकरणाने समन्वयाने करावा. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा, समाधीचे संवर्धन, जतन करण्याचे काम, शिवसृष्टी उभारणी अशी नियोजित सर्व कामे शास्रोक्त पद्धतीने करावीत. ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वास्तूंचे जतन आणि संवर्धन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

            रायगड किल्ला आणि परिसर विकासाचे काम पूर्णत्वाला नेणार असून रायगड किल्ला परिसरातील 21 गावांचा विकास व्हावा, स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

******



 पैठण येथे मोसंबी फळपिकासाठी “सिट्रस इस्टेट”

                                               - संदिपान भुमरे

३६ कोटी ४४ लाख रुपयांची तरतूद

            मुंबई, दि. 13 : औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका फळरोपवाटिका-पैठण प्रक्षेत्रावर मोसंबी फळपिकासाठी "सिट्रस इस्टेट" ही योजना राबविण्यास तसेच "सिट्रस इस्टेट" ची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचे कार्यक्षेत्र पैठण केंद्रबिंदू मानून १०० किलो मीटर परिघात राहील. सदर "सिट्रस इस्टेट" साठी रुपये ३६ कोटी ४४ लाख ९९१ रुपये एवढी तरतूद टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.

            श्री भुमरे म्हणाले, राज्यात लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये संत्रा पाठोपाठ मोसंबी फळपिकाचे उत्पादन घेतले जाते. मोसंबी उत्पादनात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. जागतिक हवामान बदलाच्या परिणामस्वरुप गत ७-८ वर्षांत फळपिकांखालील क्षेत्रात चढ-उतार होत आहेत. मराठवाड्यात मोसंबी पिकांसाठी अनुकूल हवामान पिक पद्धतीचा विचार करता मोसंबी हे फळपिक शेतकऱ्यांना अधिक लाभदायक ठरते. मराठवाड्यात सुमारे ३९ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर मोसंबी उत्पादन घेतले जाते. त्यापैकी औरंगाबाद जिल्हा २१ हजार ५२५ हेक्टर व जालना जिल्हा १४ हजार ३२५ हेक्टर हे प्रमुख मोसंबी उत्पादक जिल्हे आहेत. मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मोसंबी फळपिकाचे शाश्वत उत्पादन, प्रक्रिया तसेच निर्यातीसाठीचे क्लस्टर निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका फळरोपवाटिका - पैठण प्रक्षेत्रावर मोसंबी फळपिकासाठी “सिट्रस इस्टेट” स्थापन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

            मोसंबी फळपिकाची उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यासाठी तालुका फळरोपवाटिका-पैठण, जि. औरंगाबाद या फळरोपवाटिका प्रक्षेत्रावर उच्च तंत्रज्ञानावर आधारित फळरोपवाटिका स्थापन करणे, सदर प्रक्षेत्रावर मोसंबीच्या जातीवंत मातृवृक्ष लागवड करणे, मोसंबी फळपिकाच्या शास्त्रोक्त लागवड पद्धतीच्या फळबागा विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना कीड-रोगमुक्त उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात किफायतशीर दराने उपलब्ध करुन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट असल्याने मंत्री श्री.भुमरे यांनी सांगितले.

            मोसंबी फळपिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी तसेच शास्त्रोक्त लागवड पद्धतीच्या प्रचारासाठी शेतकरी प्रशिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे. शेतकरी प्रशिक्षण व विस्तार यातून नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी “सिट्रस इस्टेट” लाभदायक ठरणार आहे.

            तसेच मोसंबी फळ प्रक्रिया, संकलन, ग्रेडिंग, वेस्टन, साठवण, विपणन, प्रक्रिया, वाहतूक व निर्यातीला चालना देण्यासाठी व देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय निर्यात विपणन साखळी निर्माण करणेही यामुळे शक्य होणार असल्याचे मंत्री श्री.भुमरे यांनी यावेळी सांगितले.

00000





 राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या

जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन !

            मुंबई दि 12- राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            राष्ट्रासाठी त्यागाची आणि जगण्याची प्रेरणा असणा-या राजमाता जिजाऊ आणि जगभरातील युवकांना जगण्याचा आणि जिंकण्याचा मूलमंत्र देणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव (प्र.सु.र.का.) इंद्रा मालो यांनीही यावेळी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून वंदन केले.

0000


 

Featured post

Lakshvedhi