Thursday, 25 November 2021

 

०००

 राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणूकीवर निर्बंध नाहीत


अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची माहिती


            मुंबई, दि. 24 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत सर्व खाद्यतेल व खाद्य तेलबियांच्या साठवणूकीवर दि. 31 मार्च, 2022 पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणूकीवर साठा निर्बंधाची मर्यादा किती प्रमाणामध्ये असावी याबाबत राज्य शासनाने निर्णय घ्यावयाचा आहे.राज्यात व्यापा-यांसोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार राज्यात खाद्यतेल व खाद्य तेलबियांवर साठा निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.


            सर्व खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणूकीवर साठा निर्बंधाची मर्यादा किती प्रमाणामध्ये असावी याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कृषि व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तसेच खाद्यतेल व्यापारी संघटनांबरोबर बैठका घेण्यात आल्या होत्या. त्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार येत्या दोन-तीन महिन्यात खाद्यतेलबियांचे नवीन उत्पादन येणार आहे त्यामुळे साठा निर्बंध लावल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल. याशिवाय देशात मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात करण्यात येते. त्यावर निर्बंध लागू नाहीत. सध्या खाद्यतेलाचे भाव स्थिर आहेत.त्यामुळे केवळ देशांतर्गत खाद्यतेलावर साठा निर्बंध लावणे योग्य होणार नाही, असा निर्णय सविस्तर चर्चेनंतर या बैठकांमध्ये घेण्यात आला आहे. खाद्यतेलाचे भाव तीस टक्के पेक्षा जास्त वाढल्यास साठा निर्बंध लावण्यासाठी संबंधित व्यापारी संघटनासोबत पुन्हा बैठक घेऊन कार्यवाही करावी, असाही निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.त्यामुळे केंद्र शासनाच्या दि. 08 ऑक्टोबर, 2021 च्या अधिसूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात खाद्यतेल व खाद्य तेलबियांवर साठा निर्बंध लावण्यात आलेले नाहीत अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत प्रसिध्दीस देण्यात आलेली आहे.


000



 अक्कलकुवा तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांमार्फत

स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा

- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 24 : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक आदिवासींना कामे उपलब्ध करून त्यांचे स्थलांतर थांबविण्यात यावे असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील जलसंधारण कामांबाबत मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री श्री भरणे बोलत होते. या बैठकीस माजी आमदार नरेंद्र पाडवीमृद व जलसंधारणचे सहसचिव डी.एस.प्रक्षाळेजलसंधारणचे अवर सचिव अ.र.जगताप, उपविभागीय अधिकारी सुनिल पवार उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. भरणे म्हणालेअक्कलकुवा तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तेथील स्थानिक आदिवासींना धरणातील गाळ काढणे अशी जलसंधारणाची कामे देण्यात यावी. कृषी विभागजलसंधारण विभागवन विभाग यांनी संयुक्तिकरित्या स्थानिक आदिवासी शेतकरी यांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे स्थलांतर थांबविण्यास सहकार्य करावे, असेही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले.

०००


 

अक्कलकुवा तालुक्यात वृक्ष लागवडीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावी

- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 

            मुंबई, दि. 24 : नंदुरबार येथील मौजे भगदरीमौजे भांगरापाणीमौजे काठी व जौजे मुलगीशहादा या गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड करण्यात यावी. असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

            नंदुरबार येथील अक्कलकुवा तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या कामांसंदर्भात बैठकीचे आयोजन आज मंत्रालयात करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीस माजी आमदार नरेंद्र पाडवीनाशिकचे वनसंरक्षक अ.मो. अंजनकरधुळे वनसंरक्षक डी. डब्लु. पगारनंदुरबारचे उपवनसंरक्षक कृष्णा भवरनंदुरबारचे सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी आर.ए.कुलकर्णी आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री भरणे म्हणालेअक्कलकुवा तालुक्यातील संबंधीत गावात सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात यावी. जेणेकरून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल. नियमानुसार काम करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहकार्य लाभेल या दृष्टीने काम करावे असेही ते म्हणाले.

०००

 

Wednesday, 24 November 2021

 दुबई वर्ल्ड एक्स्पोमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची अबुधाबी फिल्म कमिशनला भेट

            मुंबई, दि. 24 : दुबई येथे सध्या वर्ल्ड एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. या दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशनर हन्स फारकीन यांची भेट घेऊन उभय देशादरम्यान चित्रपट निर्मितीत लागणाऱ्या तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासंदर्भात, तसेच या क्षेत्रात महाराष्ट्रात गूंतवणूक करण्याबाबत चर्चा केली.


              दुबई सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दुबई वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधांचे सादरीकरण करण्यात आले. चित्रपट, विविध प्रकारच्या मालिका, वेब सिरीज यांच्या चित्रीकरणासाठी सुलभ पद्धतीने ज्या सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत त्यांची माहिती जागतिक पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या अनुषंगानेच आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशन येथे भेट दिली.


अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान व राज्यातील गुंतवणुकीबाबत चर्चा


             अबुदाबीचे फिल्म कमिशनर हन्स फारकीन यांच्याशी महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती व्यवसाय संदर्भाने मंत्री श्री.देशमुख यांनी चर्चा केली. मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत नव्याने उपलब्ध केलेल्या सोयीसुविधांची माहिती दिली. अबुधाबी फिल्म कमिशन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीत दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान व्हावे, या संदर्भाने महाराष्ट्रात दुबई येथून गुंतवणूक व्हावी या बाबतही चर्चा झाली.


            अबुधाबी सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाचे अध्यक्ष मोहम्मद-खलिफा-अल-मुबारक यांचीही अमित देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली. दोन्ही देशांना उपयुक्त ठरेल या पद्धतीने मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत संयुक्त प्रकल्प उभारण्याबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे यांच्यासह विस्टास मीडिया अबुधाबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंत्तीखाब चौगुले, अबुधाबी फिल्म कमिशनचे व्हाईस प्रेसिडेंट संजय रैना हेही सहभागी झाले होते.


            अबुधाबी येथे चित्रीकरण झालेल्या ‘एक था टायगर’, ‘विक्रम वेध’ या चित्रपटांच्या सेटला मंत्री श्री.देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी चित्रीकरणाच्या आधुनिक व्यवस्था व कार्यपद्धतीचा अनुभव घेतला, अशा प्रकारच्या अद्ययावत माहितीचे आदान-प्रदान झाले तर भविष्यात दोन्ही देश या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करू शकतील, अशी भावना श्री. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.


००००



 


मतदार नोंदणीबाबत प्रश्नांची उत्तरे

आता 'चॅटबॉट'द्वारे एका क्लिकवर

राज्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रारंभ

 

            मुंबई, दि. 22 (रानिआ) : राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने 'महाव्होटर चॅटबॉट'द्वारे मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा प्रारंभ राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या हस्ते आज झाला.

            राज्य निवडणूक आयोगाने 2017मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी जगात पहिल्यांदा निवडणूक प्रक्रियेत ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यात प्रत्यक्ष मतदानाबाबतच्या सर्व माहितीचा समावेश होता. भारत निवडणूक आयोगातर्फे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत राबविण्यात येत असलेल्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने आता मतदार नोंदणीसंदर्भातील सर्व प्रकारची माहिती आणि प्रश्नांची उत्तरे मिळतील.

            महाव्होटर चॅटबॉटच्या http://bit.ly/mahavoter या दुव्यावर (लिंक) क्लिक केल्यास मराठी आणि इंग्रजी भाषेचा पर्याय उपलब्ध होईल. त्यानंतर आपल्या मनातील सर्व शंकांचे निरसन वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या माध्यमातून (एफएक्यू) सहज आणि सुलभरीत्या होईल. मतदार यादीतील आपल्या नावाचा शोध घेणे, मतदार यादीत नाव नोंदविणे, त्यासाठीचे आवश्यक कागदपत्रे, तांत्रिक स्वरूपाची माहिती, नावात किंवा पत्त्यात दुरुस्ती करणे, नाव वगळणे आदींसंदर्भातील एफएक्यूंचा त्यात समावेश आहे.

            यादीतील आपल्या नावाचा शोध घेण्यासाठी, नव्याने नाव नोंदविण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी थेट लिंक उपलब्ध होईल. त्याद्वारे तिथल्या तिथे आपण अपेक्षित कार्यवाही करू शकतो. याशिवाय आपण +917669300321 या व्हॉट्सॲप क्रमांकावर Hi करून माहिती मिळवू शकतो किंवा https://mahavoter.in या संकेतस्थळालाही भेट देऊ शकता.

            मतदार म्हणून आता विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यात नाव नोंदविल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत मतदान करता येईल. महाव्होटर चॅटबॉटने तर मतदार नोंदणीचे काम अधिक सुलभ झाले आहे. तरुणांना ते नक्कीच आवडेल. त्यामुळे मतदारांनी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. मदान यांनी केले आहे.

०-०-०

(Jagdish More, SEC)


 

Mahavoter Chatbot

 

            The State Election Commission and Gupshup Institute have made available the facility of voter registration and answers to all the related queries through 'Mahavoter Chatbot' at the click of a button. It was inaugurated at the hands of State Election Commissioner U. P. S Madan.

            Mahavoter is a novel concept using bot technology for election awareness, wherein the State Election Commission is pioneer to implement the idea in 2017 elections. It had all the information about the voters and about polling. Now SEC is coming with Mahavoter 2, an expanded verion which covers, the voter registration process, especially keeping in view the Special Summary Revision which is being implemented by the Election Commission of India till November 30, 2021. Now the bot will answer all kinds of information / questions related to voter registration.

            Clicking on the link http://bit.ly/mahavoter of Mahavoter Chatbot will provide Marathi and English language options. All the doubts in your mind will be answered easily and simply through frequently asked questions (FAQ). This includes FAQs for finding your name in the Electoral Roll, registering your name in the Electoral Roll, documents required for it, technical information, correction of names or addresses, omission of names, etc.

            A direct link will be available to search for your name in the voter list, to register a new name or to correct it. That way, we can take action wherever we want. Apart from this you can get the information by doing Hi on WhatsApp number +917669300321 or you can also visit https://mahavoter.in

            Now, as a voter, if you register your name in the voter list of assembly constituencies, you will be able to vote in the upcoming local body elections. Voter registration has become much easier with the MahaVoter chatbot. Young people will be more comfort with it. Therefore, voters should take maximum advantage of this state-of-the-art facility till November 30, 2021, appealed by Shri. Madan.

0000


राष्ट्रपतींच्या हस्ते संरक्षण अलंकरण सन्मान प्रदान

महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा गौरव

 

        नवी दिल्ली, 22 : राष्ट्रपती आणि तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा समावेश आहे.

         राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आज दोन टप्प्यात ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -२०२०’ प्रदान करण्यात आले. सकाळी आणि सायंकाळी आयोजित या पुरस्कार प्रदान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अधिकारी व जवानांना उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि समर्पण वृत्तीच्या प्रदर्शनासाठी कीर्ती चक्र, शौर्य चक्र, परम विशिष्ट पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक अशा विविध सन्मानाने गौरविण्यात आले.

परम विशिष्ट तसेच अतिविशिष्ट सेवा पदक

            महाराष्ट्राचे सुपूत्र एअर मार्शल प्रदीप बापट यांना परम विशिष्ट सेवा पदक तर व्हाईस ॲडमिरल किरण देशमुख ,एअर व्हाईस मार्शल निखिल चिटणीस आणि एअर कमोडोर मकरंद रानडे यांना अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.                              

          कॅप्टन महेश कुमार भुरे यांना असामान्य साहसासाठी शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. कॅप्टन भुरे यांनी दहशतवाद विरोधी कार्यवाहीचे अनुकरणीय नेतृत्व करत एका दहशतवाद्याला ठार केले व दहशतवाद्यांना परतवून लावले.

००००

             


 

युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

अभिषेकने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबई, दि. 22 :- दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या युवकाने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, अवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे अभिनंदन केले आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात, शारिरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेकने १८० किलोमीटर सायकलींग, ४२.२ किलोमीटर धावणे आणि समुद्रात ३.८ किलोमीटर अंतर पोहणे ही आव्हाने १३ तास ३३ मिनीटे अशा विक्रमी वेळेत पूर्ण केली. अभिषेकचे वडील सतिश ननवरे यांनी यापूर्वी आयर्न मॅन हा किताब पटकविला आहे. वडीलांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अभिषेकने अवघ्या अठराव्या वर्षीच ही यशस्वी कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीचा सर्वांना अभिमान आहे, त्याच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिषेकचे कौतुक केले आहे.

*****


 

सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

 

            मुंबई, दि. 22 : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली.

            सायबर क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हे सर्वांसाठी मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिस नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. सायबर गुन्हेगारी आणि फॉरेन्सिक सायन्स या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य मिळावे तसेच उभय देशातील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत, अशी अपेक्षा गृहमंत्री वळसे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

            महाराष्ट्र पोलिसांना पोलिसिंगसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्र्यांना यावेळी सांगितले.

              पुढील आठवड्यात लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांसाठी सिंगापूर विमानसेवा सुरु होत आहे. यासाठीही मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळावे, असेही वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी सांगितले.

            तसेच सिंगापूर राज्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी, कम्युनिटी पोलिसिंग तसेच पोलिसांची कार्यपद्धती याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.

००००

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी सुरू

 

            मुंबई, दि. 22 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे. सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

...

Janjagar

 


Featured post

Lakshvedhi