राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांचे वितरण
प्रा. जयंत विष्णू नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न' पुरस्काराने सन्मान
नवी दिल्ली दि. 23 : भारत सरकारच्या वतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्ट योगदानासाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ प्रा. जयंत विष्णू नारळीकर यांना 'विज्ञान रत्न' या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. तसेच अन्य दोन श्रेणीमध्य महाराष्ट्रातील सहा शास्त्रज्ञ आणि संशोधकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि संशोधकांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी, विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा आणि विज्ञान टीम या चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात आजीवन योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना देण्यात येणारा विज्ञानरत्न पुरस्कार प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ प्रा. जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने आयुकाचे संचालक डॉ. रघुनाथन श्री आनंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
नारळीकर यांनी 'होयल-नारळीकर सिद्धांत' विकसित करून गुरुत्वाकर्षण आणि द्रव्य निर्मितीचे एकत्रीकरण करणारा स्थिर अवस्था ब्रह्मांडाचा आराखडा मांडला होता. तसेच, 'क्वासी-स्टेडी स्टेट कॉस्मॉलॉजी' मॉडेलद्वारे कॉस्मिक बॅकग्राउंड रेडिएशन आणि दीर्घिकांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण दिले होते.
विज्ञान श्री पुरस्कार नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन, यांना पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करण्यात आला. तसेच न्यूट्रॉन बीमलाइन्स आणि सुपरकंडक्टिव्हिटी क्षेत्रातील योगदानासाठी (परमाणु ऊर्जा) डॉ. युसूफ मोहम्मद सेख (बीएआरसी), मुंबई यांसह - कृषी विज्ञानसाठी: डॉ. ज्ञानेंद्र प्रताप सिंह (आयसीएआर-नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्ली) – जीव विज्ञान क्षेत्रातील मानवी जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे रोग संवेदनशीलता आणि इतिहासाचे संशोधना साठी डॉ. कुमारसामी थंगराज (सीएसआयआर-सीसीएमएम, हैदराबाद), रसायनशास्त्र क्षेत्रात स्वस्त पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रा. तलाप्पिल प्रदीप (आयआयटी मद्रास),प्रा अनिरुद्ध भालचंद्र पंडित (इंजीनियरिंग विज्ञान), ; प्रा. महान एमजे (गणित आणि कंप्यूटर विज्ञान); श्री जयन एन (अंतरिक्ष विज्ञान आणि प्रौद्योगिकी)यांना विज्ञान श्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.
No comments:
Post a Comment