जागृत समाजामुळेच कल्याणकारी कार्यक्रमांना बळ – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
ब्रम्हकुमारीजचा नागपुरातील विश्वशांती सरोवर परिसर हा अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे कार्य करीत असून ही प्रेरणादायी भूमी असल्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. जागृत समाज हा शासनाच्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांना बळ देतो. हाच संदेश पुढे नेत एकता व विश्वासावर आधारित ब्रह्मकुमारीजचे अभियान हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगतीच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. मानवतेला पुढे नेणारा हा उपक्रम विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत योगदान देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी, ब्रह्मुकुमारी सेवकांना कलश व ध्वज प्रदान करून राष्ट्रपतींनी मोहिमेचा शुभारंभ केला.
ब्रह्मकुमारीज नागपूरच्या प्रमुख राजयोगिनी बी.के. रजनी दीदी यांचे स्वागतपर भाषण झाले. ब्रह्मकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी.के. मृत्युंजय भाई यांनी ब्रह्मकुमारीजच्या वतीने महाराष्ट्रात सुरू होत असलेल्या मोहिमेविषयी माहिती दिली.राजयोगिनी बी.के.चंद्रिका दीदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या राज्यव्यापी मोहिमेसाठी ब्रह्माकुमारीजमार्फत आठ सिद्धांत निश्चित करण्यात आले आहेत. यात व्यसनमुक्त समाजाची निर्मिती, शाश्वत जीवन पद्धती, स्वच्छता व नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीत कर्तव्याचे भान, मानवतेसाठी कर्तव्यतत्परता, मूल्याधारित शिक्षण, निर्मळ व संयमी जीवन-योगा, हरित व शाश्वत महाराष्ट्र, सुसंवादातून आनंदी जीवन यावर भर दिला आहे. या सिद्धांतातूनच महाराष्ट्रात स्वर्णिम युगाचा प्रत्यय अधिक बळकट होणार असून राज्यातील प्रत्येक तालुका पातळीवरील ब्रह्मकुमारीजच्या केंद्रांमार्फत ही मोहीम प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.