Thursday, 3 August 2023

हिंजवडी येथील सबस्टेशनचे काम लवकरच करणार

 हिंजवडी येथील सबस्टेशनचे काम लवकरच करणार


      - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई, दि. पुणे जिल्ह्यातील वाढते नागरीकरण लक्षात येऊन हिंजवडी येथील सबस्टेशनचे काम लवकरच करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


      पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथे महापारेषण कंपनीने बांधलेले ४०० केव्हीचे सबस्टेशन बंद असल्याबाबतचा प्रश्न सदस्य राहुल कुल यांनी उपस्थित केला होता.


      उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हे उपकेंद्र बंद नाही. ४०० के. व्ही. सह आणखी सहा अतिउच्चदाब उपकेंद्र बँक चार्ज करण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश उपकेंद्र त्यांच्या संलग्न वाहिन्या वनविभागाच्या मंजुरी अभावी कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत. तसेच 66 के.व्ही पेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्चदाब पारेषण वाहिन्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या मनोऱ्याच्या व्याप्त जागेचा तसेच अतिउच्च दाब पारेषण वाहिन्याच्या पट्ट्याखालील जमिनीच्या नुकसान भरपाई पोटी मोबदला देण्यासंदर्भात धोरण निश्चित केले आहे. या सुधारित धोरणानुसार बाधित शेतकरी, जमीनधारकांना वाढीव मोबदला देण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


 


प्रतिकारशक्ती

 प्रतिकारशक्ती


आज आपण प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवता येईल या विषयी थोडी माहिती घेऊ.


काही छोटय़ा गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो.


तुळस

रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो.

तूप

कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवजरून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतं ती या पदार्थाना जमत नाही.

आवळा-लिंबू

लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. पण लिंबू खावं म्हणजे लिंबूचं खावं. लिंबाचं लोणचं नव्हे. 


आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा, कॅंण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते. 

पानीं 

आरोग्याच्यादृष्टीनं पाण्याचं महत्त्वं वेगळं सांगण्याची गरज नाही. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यानंच भागेल याची काळजी घेतल्यास शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाईल. तहान लागली पाणी नाही म्हणून मिल्क शेक/ नारळपाणी/ज्यूस प्यायलं म्हणून तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर उलटवून टाकण्याचीच शक्यता जास्त. पाणी आवश्यकतेपेक्षा कमी प्यायलं किंवा जास्त प्यायलं तरी अपाय होतो. 


नाचणी सत्वं

दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्त्व हवंच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्त्वं असतात. हे नाचणी सत्त्वं दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं.


नाचणीची भाकरी खावी .


दुपर जेवणात कोशिंबीर असावी. पण ती काकडी, टोमॅटो नाहीतर मुळयाचीच हवी असं नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाचवेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, अॅंन्टिऑक्सिडंटस मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे त्यामुळे वृध्दांच्या आहारात तर बीटाचा समावेश असायलाच हवा. 

दूध-हळद


रात्री जेवल्यानंतर एक कपभर दुध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी. आणि ते दूध रोज प्यावं. या दुधात चव म्हणून अनेकजण साखर घालतात. पण तसं करू नये. 


लहान मुलांना दूध-हळद ऐवजी दूधात थोडं केशर आणि एखादा बदाम भिजवून, वाटून ते दूध द्यायला हवं. दुधात केशराच्या एक-दोन काडय़ाच वापराव्यात. 

 दही आणि ताक

रोजच्या जेवणात कोणी दही खावं आणि कोणी ताक घ्यावं याबाबतही काही नियम आहेत. प्रौढ स्त्रिया-पुरूष आणि वृध्दांनी रोजच्या जेवणात ताक घ्यावं. ताक म्हणजे दह्यात पाणी घालून घुसळून केलेलं ताक नव्हे. तर लोणी घुसळल्यानंतर शिल्लक राहणा:या अंशाला आहारशास्त्रात ताक म्हणतात. आणि या ताकाच्या सेवनानं शरीराला फायदा होतो. लहान मुलांना ताक देवू नये. त्याऐवजी रोज दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात त्यांना दोन चमचे ताजं दही द्यावं. मुलांना दही देतांना त्यात साखर घातली जाते. त्याऐवजी दह्यामध्ये खडीसाखर घालावी.


गुळाचा खडा आणि खडीसाखर.

घरात वृध्द आणि लहान मुलं असले की आपल्या डब्यातला गूळ आणि खडीसाखर कधीही संपू देवू नये. वृध्दांना दिवसभर तरतरी राहण्यासाठी गुळाचा खडा खूप उपयुक्त असतो. शिवाय चक्कर आल्यास, तोल जात आहे असं वाटल्यास, घसा कोरडा पडल्यास गुळाचा खडा किंवा खडींसाखर तात्काळ शरीरात ऊर्जा निर्माण करतं.


लहान मुलं एका जागी कधीच बसत नाही. दिवसभर त्यांच्या अॅक्टीव्हीटी चालूच असतात. यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा खडीसाखरेतून मिळू शकते. मुलांना शाळेच्या डब्यात एक छोट्या डब्बीत खडीसाखर घालून आवश्य द्यावी. 


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




कन्नमवारनगर, विक्रोळी (पू) येथील महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाच्याइमारतीची पुनर्विकास निविदा महिनाभरात

 कन्नमवारनगर, विक्रोळी (पू) येथील महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाच्याइमारतीची पुनर्विकास निविदा महिनाभरात


                        - उद्योग मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 2 : कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतिवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व चटईक्षेत्र वापरुन तिथे पाचशे रुग्णशय्या असलेले स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले होते, त्यानुसार म्हाडाकडे त्याबाबत आवश्यक त्या अधिमूल्याचा भरणा केला असून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. येत्या महिन्याभरात संबंधित कामाची निविदा काढण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


       सदस्य सुनील राऊत यांनी कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतीवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते.


            मंत्री श्री.सामंत म्हणाले की, महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या वास्तुविशारद सल्लागाराने सादर केलेल्या आराखड्यास म्हाडा प्राधिकरणाची मंजुरी, तसेच वृक्ष प्राधिकरण, पर्यावरण व वन मंत्रालय यांची ना-हरकत मिळण्यासह प्रस्तावित रुग्णालय आणि कर्मचारी सेवा निवासस्थानाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्याकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्याची कार्यवाही महानगरपालिका स्तरावर सुरु असून येत्या महिन्याभरात या बाबतची निविदा काढण्याची प्रक्रिया करण्यात येईल. त्याचप्रमाणे येत्या तीन वर्षांत रुग्णालयाचे काम पूर्ण केले जाईल, असे श्री.सामंत यांनी सांगितले.  


0000


 

पित्तावर घरगुती उपाय*

 *पित्तावर घरगुती उपाय*




 जेव्हा पोटातून अ‍ॅसिड अन्ननलिकेकडे येऊ लागतं. तेव्हा याला अ‍ॅसिडीक रिफ्लक्स म्हटले जाते. याला सर्वसामान्य भाषेत आम्लपित्त म्हटले जाते. अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात.


अ‍ॅसिड रिफ्लक्सची सर्वात मोठी ओळख ही व्यक्तीला अस्वस्थ वाटणे आणि छातीत जळजळ होणे असते. कधी कधी छातीच्या खालीही वेदना होता. यावर काही घरगुती उपायांनीही उपचार केले जाऊ शकतात.

केळी 

केळीतून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते. पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.


तुळस 

तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते. तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा.


दूध

दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी आम्ल निर्मिती थांबते व अतिरीक्त आम्ल दूध खेचून त्याचे अस्तित्व संपवते. थंड दूध प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. दुध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे. मात्र त्यात चमचा भर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.


बडीशेप

बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास , बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.


लवंग

लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते , पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते. लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा, त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या. यारसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.


वेलची

आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते. स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून ती पाण्यात टाकून उकळा, हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल.


पुदिना

पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करत. पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळून घ्या. थंड झाल्यावर हे पाणी प्यावे. ‘मेन्थॉल’ पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.


आलं

आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो. आल्याच्या सेवनाने पचन सुधारते. तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो. आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्यावे.


आवळा

तुरट, आंबट चवीचा आवाळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील ‘व्हिटामिन सी’, अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते.रोज चमचाभर आवळ्याची पावडर / चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही .कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस मिळतात.

प्रमोद पाठक.


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*




बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनीघेतली इरशाळवाडीतील अनाथ बालकांची भेट

 बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनीघेतली इरशाळवाडीतील अनाथ बालकांची भेट


 


            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सुशिबेन शहा यांनी आज रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील अनाथ बालक व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली.


            या दुर्घटनेमध्ये शून्य ते 18 वर्षे वयोगटातील 22 बालके अनाथ झालेली आहेत. ही बालके व त्यांचे कुटुंबीय सद्य:स्थितीत चौक ग्रामपंचायत अंतर्गत उभारण्यात आलेल्या निवास व्यवस्थेमध्ये राहात आहेत. या बालकांमध्ये बहुतांश बालके ही आदिवासी विभाग अंतर्गत चिखले, माणगाव, डोलवली येथील निवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ही बालके आश्रमशाळेत शिक्षण घेत असली तरी त्यांना विशेष बाब म्हणून महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजना लागू करण्याबाबत आयोगामार्फत पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच जी बालके शिक्षण घेत नाहीत किंवा त्यांनी काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडलेले आहे, अशा शाळाबाह्य बालकांसाठी व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाची सोय खासगी स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने करण्यासाठी बाल हक्क आयोग प्रयत्नशील असणार आहे.


             आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत एम्पॉवर माईंडस् या विशेष उपक्रमांतर्गत या बालकांसाठी समुपदेशन तसेच इतर सामाजिक, मानसिक घटकांच्या अनुषंगाने प्रथमतः सहा महिन्यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. सदर भेटी दरम्यान बालकांचे लसीकरण, त्यांना आवश्यक असणाऱ्या इतर बाबी याबाबतही माहिती घेण्यात आली.


            या भेटीच्या वेळी आयोगातील सदस्य ॲड. नीलिमा चव्हाण, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे, अध्यक्ष तथा सदस्य महिला बालकल्याण समिती रायगड, पोलीस निरीक्षक, तहसीलदार, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग, एकात्मिक बालविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ

 मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ


       मुंबई, दि. 3 : मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला.   


            या बांधकाम शुभारंभ आणि भूमिपूजनप्रसंगी विधानपरिषद उपाध्यक्ष डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजन आणि शुभारंभ झाल्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.  


             मनोरा आमदार निवासाच्या १३४२९.१७ चौ.मी. भूखंड क्षेत्र असलेल्या या जागेवर ५.४ एफ.एस.आय. (FSI) च्या अनुषंगाने ७२१५६.०६ चौ.मी. प्रस्तावित प्रत्यक्ष बांधकाम आहे. आधुनिक स्थापत्यशैलीनुसार काळाच्या गरजा आणि वास्तूकलेचा वारसा यांचा संगम साधणाऱ्या मनोरा आमदार निवासाच्या ४० मजली व २८ मजली अशा दोन भव्य इमारती उभारण्यात येणार आहेत.


असे असेल नवीन आमदार निवास :


            या नवीन मनोरा आमदार निवासामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी एकूण ३६८ निवासस्थाने सदस्यांसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था होणार आहे. या इमारतीमधील प्रत्येक कक्षाचे क्षेत्रफळ साधारणतः १००० चौ. फूट असेल. या दोन्ही इमारतींमध्ये ८०९ वाहने एकाचवेळी पार्क करता येतील अशा पद्धतीचे पोडियम वाहनतळ असेल. या ठिकाणी विविध स्तरावर स्वयंपाकगृहे, बहुपयोगी हॉल, प्रत्येक मजल्यावर सभागृह, अतिथी कक्ष, व्यायामशाळा, उपाहारगृह, व्यावसायिक केंद्र, पुस्तकालय, ग्रंथालय, सांकृतिक केंद्र, छोटे नाट्यगृह अशा अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.


0


 


 


 


 

रानकवी' ना. धों. महानोर यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले

 रानकवी' ना. धों. महानोर यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले


                                                   - राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 3 : राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ कवी, गीतकार, साहित्यिक व माजी आमदार ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ना. धों. महानोर यांनी आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांचे साहित्य व काव्य हे वास्तवदर्शी व हृदयाला भिडणारे होते. त्यांची अनेक गीते लोकांच्या मनात आहेत. त्यांच्या निधनामुळे राज्याने मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारा एक थोर कवी व साहित्यिक गमावला आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.  


000


Governor Bais condoles demise of 'Ran Kavi' N D Mahanor


     Mumbai, 3 : Maharashtra Governor Ramesh Bais has expressed grief over the demise of Marathi poet and writer N. D. Mahanor. In a condolence message, the Governor wrote: 


     "The works of poet, lyricist and writer N. D. Mahanor reflected the life and aspirations of the common man. His writing and poetry was realistic and touched the core of the heart. Many of his lyrics are fresh in the memory of the people. In his demise the State has lost a respected poet and writer who enriched the world of Marathi literature."   


0000



 


वृत्त क्र. 2595


मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक, कवी ना. धों. महानोर


यांना श्रद्धांजली, मराठी मातीतला 'रानकवी' हरपला


 


            मुंबई, दि.3 :- “मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.


            “मराठी माती सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्याची अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. शेतातून, साहित्यिक मंच ते विधानपरिषद असा त्यांचा प्रवास राहिला. या सगळ्याच ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटवली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


0000



 


वृत्त क्र. 2594


रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला


                                             - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


            मुंबई, दि. 3 : “ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, “ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केल. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !”


0000



 


वृत्त क्र. 2593


 


मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा 'रानकवी' हरपला


                                                        -उपमुख्यमंत्री अजित पवार


 


            मुंबई, दि. 3 :- "ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं 'रानकवी' होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां'नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी' 'पळसखेडची गाणी' सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं. निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते 'वनश्री' पुरस्काराने सन्मानित होते. राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या 'पद्मश्री' पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधिमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पवार कुटुंबीयांनी घनिष्ठ मित्र गमावला आहे. महानोर कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ना. धों. महानोर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कवीवर्य ना. धों. महानोर यां

च्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.


००००


 


Featured post

Lakshvedhi