Tuesday, 20 June 2023

भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना

 भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई दि. २० :- राज्य शासनाने मुंबईचा कायापालट करून स्वच्छ, सुंदर मुंबई करण्याचे अभियानही हाती घेतले आहे. यामध्ये मुंबई शहरासह उपनगरांतील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे.या माध्यमातून भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येईल व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            भांडुप येथील नवजीवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात शिक्षणमहर्षी श्री.रामचंद्र सावंत यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पुतळ्याचे अनावरण व डॉ.दीपक सावंत लिखित “गुलदस्ता” या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नवजीवन संस्थेचे सरचिटणीस डॉ दीपक सावंत, संस्थेचे अध्यक्ष ऍड दीपक साळवी, माजी आमदार श्याम सावंत, अशोक पाटील, सौ अनिला सावंत यांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.


            मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५० रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून लवकरच सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येईल. मुंबईतील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार आहे. म्हाडा एमएमआरडीए, सिडको, मुंबई महापालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. भांडुप आणि परिसरातील पुनरविकासाचे प्रकल्प, रस्ते, नालेसफाई तसेच सुशोभीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. तसेच या भागातील नागरिकांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. विक्रोळी येथे 500 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “स्व. प्राचार्य सावंत यांनी लावलेल्या नवजीवन संस्थेचे आज वट वृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय असेच आहे. शिक्षण हे आपल्या परिवर्तनाचे प्रमुख साधन असून प्रत्येकाने आपली क्षमता, कुवत ताकद ओळखून कार्य करावे. प्रत्येक जण कर्माने मोठा असतो तेव्हा प्रत्येकाने चांगले कर्म करण्यावर भर द्यावा”.


            डॉ. दीपक सावंत यांनी कोरोना काळात विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेले स्तंभलेखन पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे. डॉ. सावंत यांचे राज्याच्या कुपोषण निर्मूलनातील योगदान उल्लेखनीय आहे. हे लक्षत घेऊन त्यांची राज्याच्या कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.


            डॉ. दीपक सावंत यांनी प्रास्ताविका मध्ये दिवंगत रामचंद्र सावंत यांच्या आठवणींना उजाळा दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


00




 

राज्यात जानेवारी ते मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ उमेदवारांना रोजगार

 राज्यात जानेवारी ते मे २०२३ अखेर ८८ हजार १०८  उमेदवारांना रोजगार


- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा


            मुंबई, दि. २० : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.


                  मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.


                  विभागामार्फत राज्यात ऑनलाईन व ऑफलाईन रोजगार १०४ रोजगार मेऴाव्यांचे चांगल्या पद्धतीने आयोजन करता येत असून उद्योजकांसह नोकरीइच्छूक उमेदवारांचा मेऴाव्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे,तसेच ऑनलाईन व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनही जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर २८८ समुदेशन सत्र आयोजित केले असून यामध्ये ८४ हजार ८९० उमेदवारांनी या सत्रांचा लाभ घेतला आहे अशी माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.  


नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी


                विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख ४ हजार ६९५ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, माहे जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर विभागाकडे ६१ लाख ०६ हजार ०५८ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात १० लाख ३७ हजार ७४७, नाशिक विभागात ९ लाख ४७ हजार ७८६, अमरावती विभागात ६ लाख ३५ हजार ९२०,औरंगाबाद विभागात १२ लाख ०५ हजार ६८७, नागपूर विभागात ८ लाख ५१ हजार ३०१ पुणे विभागात १४ लाख २७ हजार ६१७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.


            माहे जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे यात मुंबई विभागात २३ हजार ६३४, नाशिक विभागात १४ हजार २११, अमरावती विभागात ३ हजार ३६७,औरंगाबाद विभागात १७ हजार ४५१, नागपूर विभागात १ हजार १६५ ,पुणे विभागात २८ हजार २८० बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.


            नोकरीइच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.


०००

खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करा

 खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करा


- कृषिमंत्री अब्दुल सत्तार


खते, बियाणे आणि कीटकनाशक विक्रीत काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश


            मुंबई, दि. 20 :- “पावसाचे आगमन येत्या काही दिवसांत होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे या खरीप हंगामात पीकपेरणी नियोजनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कृषी विभागाने उपयुक्त सल्ला द्यावा आणि मार्गदर्शन करावे. तसेच, खते, बियाणे आणि कीटकनाशके त्यांना योग्य दरात आणि वेळेवर मिळतील, यासाठीची कार्यवाही करावी, तसेच, खते, बियाणे, कीटकनाशके विक्रीत काळाबाजार करणारे आणि बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा”, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.


            कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील वरिष्ठ कृषी अधिकारी, राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरु यांची पाऊस आणि पेरणीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण हेही या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


            मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांना पेरणीपूर्व योग्य पीक पाणी सल्ला देणे गरजेचे आहे. हवामान विभागातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने कृषी विभागाने यासंदर्भातील सूचना, मार्गदर्शन शेतकऱ्यांना वेळोवेळी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांपासून अगदी गावपातळीवरील विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना पीकपेरणी संदर्भातील माहिती, पावसाला विलंब झाल्यास घ्यावयाची काळजी, विशिष्ट हवामान पद्धतीत कोणते पीक घ्यावे, याबाबतचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शेतकरी हा राज्याचा महत्वाचा घटक आहे. शेतकरी संकटात येणार नाही, यासाठी आतापासूनच योग्य ती पूर्वतयारी आणि नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.


            “सध्या राज्याच्या काही भागात पेरणी झाली आहे. जून महिना अखेरीस पाऊस येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करु नये, यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी”, अशा सूचनाही मंत्री श्री. सत्तार यांनी दिल्या.


            “सध्या शेतकरी वर्ग पेरणीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यात व्यस्त आहे. अशावेळी त्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी कृषी विभागाने घ्यावी. जिल्हास्तरावरील सनियंत्रण समित्यांनी याबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा. चुकीचे काम करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री श्री. सत्तार यांनी दिले. बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कडक कार्यवाही संदर्भात राज्यासाठी नवीन कायदा करण्याचा विचार सुरु आहे. देशात इतर राज्यांनी असा कायदा केला असेल तर त्याचाही निश्चितपणे अभ्यास करुन आपल्या राज्याचा कायदा अधिक कडक असेल”, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे धागेदोरे शोधून संबंधितांवर कडक कार्यवाहीच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या.


            यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव श्री. अनुपकुमार, कृषी आयुक्त श्री. चव्हाण, विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंनीही त्यांचे म्हणणे मांडले.            


0000

छातीतील 'कफ' पासून मिळवा सुटका या घरगुती उपायांनी*

 *छातीतील 'कफ' पासून मिळवा सुटका या घरगुती उपायांनी*


कमी तापमान आणि हवेमधील प्रदूषण यामुळे श्वसनमार्गाचा दाह होतो. यामुळे नाकातून पाणी, शिंका आणि कफयुक्त खोकला सुरू होतो.


कधी कधी छातीत खूप कफ असतो, तो खोकताना छातीत वाजतो, पण सुटत नाही. खोकून खोकून बरगडय़ा-पोटात दुखायला लागते. 


म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे कफपासून तुम्हाला सहज सुटका मिळू शकते. 


*जाणून घ्या 'कफ' वरील उपाय-*


▪️ *लिंबू :* लिंबामध्ये असणारे सी-व्हिटॅमिन आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. लिंबामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार होणारी सर्दी आणि कफ यांची समस्या कमी होण्यास उपयोग होतो.


▪️ *लसूण :* लसूण आहारातील एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. लसणामध्ये असणारे गुण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास वारंवार होत असेल तर तुम्ही आहारात लसूण आवर्जून ठेवा.


▪️ *आले :* आल्यामध्येही अनेक उपयुक्त गुणधर्म असतात जे कफ आणि सर्दीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. 


▪️ *गुळण्या करणे :* गुळण्या करणे हा घसा, सर्दी आणि कफासाठी एक उत्तम उपाय आहे. गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकून गुळण्या केल्यास घशाचा संसर्ग लवकर बरा होतो.



जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय होते वाचा.*

 *जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय होते वाचा.* 


खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे.


*हे आहेत दुष्परिणाम.* 


◼️ *चक्कर येणे.* 

भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते.


◼️ *ताण-तणाव.* 

भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो.


◼️ *लठ्ठपणा वाढतो.* 

भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केल्यास, वेळी-अवेळी खाल्लास, वजन वाढते, म्हणजे लठ्ठपणा वाढतो... वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते व फॅट्स शरीरात जमा होतात, यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. तेव्हा वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तरं, भूक लागेल तेव्हा वेळेवर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि किमान 20 मिनिटे व्यायाम करा...


◼️ *मेंदूचे कार्य बिघडते.* 

ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण करा. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी खालावते. लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते.


◼️ *चिडचिड.* 

भुकेमुळे जास्त चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो...


*सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया|*

*सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत्||*


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,




दिलखुलास कार्यक्रमात योग तज्ज्ञ सानिका बाम यांची मुलाखत

 दिलखुलास कार्यक्रमात योग तज्ज्ञ सानिका बाम यांची मुलाखत


            मुंबई, दि. 19 : आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवस हे दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरे केले जातात. माणसाला तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि संगीत खूप फायदेशीर ठरते. या दिनानिमित्त योग तज्ज्ञ सानिका बाम यांची विशेष मुलाखत 'दिलखुलास' कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.


            राष्ट्रीय स्तरावरील योग तज्ज्ञ सानिका बाम यांनी योग दिनाचा मुख्य उद्देश, योगाचे प्रकार, संगीत थेरपी अशा महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि.20 आणि बुधवार दि. 21 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


000

२६ नदी खोऱ्यात पूरनियंत्रण यंत्रणाउभारण्यासाठी १२ कोटींच्या निधीस मान्यता

 २६ नदी खोऱ्यात पूरनियंत्रण यंत्रणाउभारण्यासाठी १२ कोटींच्या निधीस मान्यता


कोकण पाटबंधारे विकास महामंडळ नियामक मंडळाची बैठक


 


            मुंबई दि. १९ :- उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८४व्या बैठकीत कोकण प्रदेशातील पूरनियंत्रणासाठी माहिती संपादन प्रणाली (Real Time data Acquisition system) ची सर्व २६ नदी खोऱ्यात उभारणी करण्यासाठी १२ कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            या बैठकीत कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी ३६ विषयांबाबत चर्चा होऊन मान्यतेचे निर्णय घेण्यात आले. गडनदी, गडगडी, तिलारी प्रकल्पांच्या भूसंपादन व प्रकल्पग्रस्तांना अनुदान, पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांची दुरुस्ती कामांना मान्यता देण्यात आली. पाली-भूतावली, कोर्लेसातंडी, तिडे बेर्डेवाडी इत्यादी प्रकल्पाच्या कामांवरील वाढीव आर्थिक दायित्व सुमारे ९० कोटी रुपयास मान्यता देण्यात आली.


-----000-

Featured post

Lakshvedhi