Monday, 30 January 2023

तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा

 तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा

- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील.

            मुंबई, दि. ३० : “तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मिती क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर प्रमुख देश म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर अधिक भर द्यावा”, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


             कापड उत्पादक असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर मध्ये आयोजित केलेल्या 76 व्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


            वस्त्रोद्योग मंत्री श्री.पाटील म्हणाले की, वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी कापूस खरेदी ते कापड निर्मिती असे सर्वसमावेशक नवीन वस्त्रोद्योग धोरण राज्य शासन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करणार आहे. तसेच सहकारी सूत गिरण्यांना प्रति युनिट 3 रुपये प्रमाणे सवलतीस पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईत वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.


            वस्त्रोद्योग मंत्री श्री.पाटील यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच उद्योजकांशी वस्त्रोद्योगातील अडचणी आणि उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली. याठिकाणी वेगवेगळ्या ब्रँडचे 937 स्टॉल लावण्यात आले आहेत.


            यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, कापड उत्पादक असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजेश मसंद, उपाध्यक्ष राजेश शाह, चेअरमन रोहित मुंजल सचिव संतोष कटारिया, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्री. खरात संबंधित अधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

राजधानीत हुतात्म्यांना आदरांजली.

 राजधानीत हुतात्म्यांना आदरांजली.

            नवी दिल्ली, 30 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आज महाराष्ट्र सदनात तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.


            कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती मेश्राम यांच्यासह सदनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.


महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली


            महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना मौन पाळून आदराजंली वाहण्यात आली. यावेळी प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी आणि अभ्यागत उपस्थित होते.            

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

 महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झळकला


        नवी दिल्ली, ३० : 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर आज झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक, तर उत्तर प्रदेश राज्याला तिसरा क्रमांक जाहीर झाला.


            केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात आली असून मंगळवारी दुपारी निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षी चित्ररथाची संकल्पना ‘नारी शक्ती’ वर आधारित होती.


            महाराष्ट्राने ‘नारी शक्ती व साडे तीन शक्तिपीठा’चा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून सादर केला होता. त्यात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता ही तीन पूर्ण शक्तीपीठे, तर वणीची सप्तश्रृंगी या अर्ध्या शक्तिपीठांचे दर्शन पथसंचलनात उपस्थितांना घेता आले. या चित्ररथात संबळ वाजविणारे गोंधळी, पोतराज, हलगी वाजवून देवीची आराधना करणारा भक्त, असे भक्त‍िमय वातावरण कर्तव्यपथावर चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविले गेले.


 चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. शुभ ॲड या संस्थेने चित्ररथाचे काम प्रत्यक्षात उतरविले होते. साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या गीताला संगीत संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहिले आहे. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समूह, ठाणे येथील होते.

डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

 डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

नाविन्यपूर्ण संकल्पना विद्यापीठाने राबवाव्यात

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई, दि. 30 : डॉ. होमी भाभा यांनी विज्ञानाच्या प्रगतीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. अणुशक्ती या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. या महान व्यक्तीचे नाव या विद्यापीठाला दिले. या नावाप्रमाणे विद्यापीठाने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून लौकिक होईल अशी शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.


            डॉ.होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी होमी भाभा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करून ई-लर्निंग स्टुडिओचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.


            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, विद्यापीठामध्ये उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात. गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थी अध्ययनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावी म्हणून प्रयत्न करावेत.


             उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, डॉ. होमी भाभा यांचे ऋण देशावर आहे. त्यांचे नाव या विद्यापीठाला देऊन महाराष्ट्रातील पहिले अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. नवीन शैक्षणिक धोरणात अधिकाधिक अभिमत विद्यापीठाची संकल्पना मांडली असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


०००

नवीन व्यापार धोरण बनवावे

 


  केंद्र व राज्यात स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण करून
नवीन व्यापार धोरण बनवावे - ललित गांधी

जीएसटी कररचना सुटसुटीत करण्याचीही मागणी

मुंबई ः देशातील व्यापार-उद्योगाला चालना मिळून भारतीय व्यापार्‍यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र व राज्य दोन्ही स्तरांवर स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण करून देशांतर्गत व्यापाराचे नवीन धोरण तयार करण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
अर्थसंकल्पाकडून व्यापार-उद्योग क्षेत्राच्या अपेक्षासंबंधी आपली भुमिका मांडताना ललित गांधी यांनी जीएसटी करप्रणाली चा पाच वर्षाचा आढावा घेऊन यातील कीचकट प्रणाली दुरूस्त करावी, करांचे दर तर्कसंगत पध्दतीने कमी करावेत व व्यापारी-उद्योजकांना गुन्हेगार ठरविण्याच्या तरतुदी रद्द कराव्यात अशी मागणी केली.
अर्थसंकल्पापूर्वी बैठकीमध्ये केंद्र सरकारकडे महाराष्ट्र चेंबरने केलेल्या प्रमुख मागण्यामध्ये बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा व त्याचे प्रत्यक्ष लाभ द्यावेत, ई-कॉमर्स धोरण जाहीर करून त्यासाठी नियामक आयोग गठीत करावे, व्यापार क्षेत्राला कर्जपुरवठा सुलभ उपलब्ध व्हावा, व्यापारी विवाद व चेक बाउन्सच्या खटल्यांसाठी फास्टट्रॅक कोर्टांची स्थापना, संपूर्ण देशात एकच वीजेचा दर, उद्योगांना निर्यातीसाठी प्रोत्साहन योजना या मागण्यांसह, महाराष्ट्रातील पायाभुत सुविधांवर विशेष लक्ष देण्याची मागणी करून विमानसेवा, रेल्वेसेवांचा विस्तार, औद्योगिक वसाहतींच्या धर्तीवर शहरालगत व्यापार झोन ची निर्मिती, महाराष्ट्रातील जळगांव, नांदेड, लातूर, गोंदीया या परिपुर्ण विमानतळांवरून नियमित विमानसेवेबरोबर कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद विमानतळावर कार्गो टर्मिनल अमरावती, रत्नागिरी विमानतळांच्या कामाची सुरूवात कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामासाठी निधि या प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत.
उद्योजक व व्यापारी हे देशाच्या विकासाचे मुख्य घटक असल्याने केंद्र सरकारने त्यांना प्रतिष्ठा व संरक्षण देण्याचे धोरण स्विकारावे अशी आग्रही मागणी करून ललित गांधी यांनी आयकर दर सुध्दा अजून कमी करण्याची आग्रही भुमिका मांडली आहे.  

Featured post

Lakshvedhi