‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी
-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
· विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार
मुंबई, दि. २७ : राज्यात शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास साधण्यासाठी राज्य शासनाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेच्या पुढील टप्प्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. विकसित महाराष्ट्र-२०४७ या दृष्टीकोनाशी सुसंगत असा हा निर्णय असून यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील शाळांची भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता सुधारून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समतोल व दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी म्हटले आहे.
यापूर्वी पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांची निवड करण्यात आली असून त्या शाळांमधील कामे अंतिम टप्प्यात आहेत. आता नव्याने निवडलेल्या ४०५ शाळांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि सुसज्ज शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
No comments:
Post a Comment