तोतया नौदल अधिकारी प्रकरणात कडक कारवाई
- गृह राज्यमंत्री योगेश कदम
· पीडितांना पैसे परत मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू
मुंबई, दि.१७ : मुंबईतील घाटकोपर परिसरात तोतया नौदल अधिकाऱ्याने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात कडक कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात सुमारे दोन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, पीडितांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत कारवाई केली जात असली, तरी आरोपींना सहज जामीन मिळत असल्याने अशा गुन्हेगारांवर तडीपारीसारख्या कडक उपाययोजना केल्या जात आहे, असे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले.
या विषयावर अबू आझमी यांनी प्रश्न उपस्थित केला होता, तर चर्चेत नाना पटोले यांनीही सहभाग घेतला.
राज्यमंत्री कदम म्हणाले की, अशा सर्व प्रकरणांमध्ये विद्यमान कायद्यांनुसार गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली जात आहे. या प्रकरणातही संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. फसवणुकीसाठी स्वतंत्र कायद्याची गरज नसून, सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गतच प्रभावी कारवाई केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
शासकीय नोकरी भरती प्रक्रिया ही पूर्णपणे अधिकृत पद्धतीने होत असते आणि कोणत्याही व्यक्तीमार्फत पैसे देऊन नोकरी मिळवणे शक्य नाही. मात्र, जागरूकतेचा अभाव असल्याने काही नागरिक अशा आमिषांना बळी पडतात. विशेषतः गरीब व माहितीअभावी असलेल्या घटकांमध्ये अशा प्रकारची फसवणूक अधिक दिसून येते, असेही राज्यमंत्री कदम यांनी नमूद केले.
राज्यात पोलीस भरती, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आदी काळात अशा फसवणुकीचे प्रकार वाढतात. त्यामुळे संशयितांवर पोलिसांची सतत नजर असून, संबंधित ठिकाणी विशेष पथकांमार्फत कारवाई केली जात असल्याचेही राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment