राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा;
60:40 सूत्र निश्चित
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
नागपूर, दि. 13 : राज्यातील विद्यापीठांमधील रखडलेल्या प्राध्यापक पदभरतीच्या प्रक्रियेस गती मिळाली असून गुणवत्तेच्या आधारे 60:40 या प्रमाणात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांनी प्राध्यापक पदभरतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य विक्रम काळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून, या पदभरती मागील दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रक्रिया रखडली होती. राज्यपालांच्या अधिकार व सूचनांनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, गुणवत्तेच्या निकषांवर आधारित 60:40 हे सूत्र निश्चित करण्यात आले आहे.
या सूत्रानुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, पीएच.डी., संशोधन लेख, अनुभव यावर आधारित गुणांकन करण्यात येणार आहे. तसेच मुलाखत समितीमार्फत आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून अध्यापन कौशल्याचे मूल्यमापन करण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे. यापूर्वी 80:20, 50:50 अशा विविध प्रस्तावांवर चर्चा झाली होती; मात्र आता अंतिमतः 60:40 हे प्रमाण लागू करण्याचा निर्णय झाला आहे.
प्राध्यापकांच्या भरतीसाठी नव्या निर्णयाचा सविस्तर अभ्यास करून पुढील दोन-तीन दिवसांत कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
प्राध्यापक भरतीतील ६०:४० गुणप्रणाली म्हणजे एकूण गुणांपैकी ६० टक्के गुण हे शैक्षणिक पात्रता, अध्यापन अनुभव आणि संशोधनासाठी असतील आणि ४० टक्के गुण हे मुलाखतीसाठी असतील.
०००००
No comments:
Post a Comment