हिंद दी चादर: धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच !
धर्म, राष्ट्र, आणि मानवतेसाठी जीव अर्पण करणाऱ्यांचे स्थान इतिहासात सदैव अमर राहते. अशा तेजस्वी व्यक्तींच्या जीवनातून मानवतेचा प्रकाश झळकतो. त्या अमर गाथांपैकीच एक प्रेरणादायी कथा म्हणजे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांची आहे. ज्यांना संपूर्ण जग ‘हिंद दी चादर’, म्हणजेच भारतभूमीचे कवच म्हणून ओळखते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान भारतीय संस्कृतीतील अतुलनीय अध्याय आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील गुरु हरगोबिंद साहिब हे शीख धर्माचे सहावे गुरु होते. त्यांच्या आईचे नाव माता नानकी देवी असे होते. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे बाल्यावस्थेतील नाव त्यागमल होते; पण युद्धभूमीवरील त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे वडिलांनी त्यांना तेग बहादुर म्हणजे ‘तलवारीसारखा धैर्यवान’ असे नाव दिले. बालपणापासूनच त्यांच्यात शौर्य, नम्रता आणि अध्यात्मिक चिंतन यांचा सुंदर संगम होता. त्यांनी सांसारिक किर्तीपेक्षा आत्मज्ञान आणि मानवसेवा हेच जीवनाचे खरे ध्येय मानले होते.
No comments:
Post a Comment