शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विकासकाला
सहा महिन्यांत थकीत भाडे देण्याचे आदेश
– मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. १६ : कल्याण, चिकणघर येथील शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रतिनिधींची आणि विकासका समवेत बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. या बैठकीत विकासकाने रहिवाशांना फक्त सन २०२१ पर्यंतचेच भाडे दिले असून उर्वरित थकीत भाडे सहा महिन्यांच्या आत देण्याचे आदेश देण्यात येतील. तसेच, पुनर्विकास कामास गती देण्याच्या दृष्टीनेही आवश्यक सूचना बैठकीत दिल्या जातील, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
विधान परिषदेत सदस्य योगेश टिळेकर यांनी यासंदर्भात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत प्रवीण दरेकर आणि ॲड.निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.
मंत्री देसाई म्हणाले, शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पास पूर्वी मंजूरी देण्यात आली होती. मात्र, संबंधित विकासकाकडून पुनर्विकासाच्या कामास विलंब होत असल्याच्या तसेच वेळेवर भाडे न मिळाल्याच्या तक्रारी शांतीदूत संस्थेकडून प्राप्त झाल्या होत्या.
शांतीदूत संस्थेच्या पुनर्विकासासाठी नियुक्त विकासक “मे. टायकुन” अवंती प्रोजेक्ट एल.एल.पी. (टायकुन रिअॅलिटी) यांनी बँकेकडून अधिकारबाह्य पद्धतीने कर्ज उचलले आहे. यासंदर्भात संस्थेने विकासकासोबत झालेला करारनामा रद्द करण्यासाठी न्यायालयात प्रकरण दाखल केले असून, नोंदणीकृत करारनाम्याच्या प्रकरणांमध्ये विकासकाची नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार सहकार न्यायालयास आहे.
०००
No comments:
Post a Comment