संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या
आधार लिंकसाठी शिबिरांचे आयोजन
मुंबई, दि. 17 : विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर (DBT) देण्यासाठी आधार लिंक अनिवार्य केले आहे. संजय गांधी निराधार योजनेसाठीही आधार जोडणी अनिवार्य आहे. लाभार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानपरिषदेत दिली.
सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री झिरवाळ बोलत होते. यावेळी सदस्य प्रज्ञा सातव, शशिकांत शिंदे, सदाशिव खोत, सचिन अहिर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
आतापर्यंत 40 लाख 48 हजार 988 लाभार्थ्यांचे आधार लिंक झाले असल्याचे सांगून मंत्री झिरवाळ म्हणाले की, उर्वरित अपूर्ण नोंदणीमुळे थेट लाभ मिळू शकलेला नाही. यामध्ये काही मृत व्यक्तींचाही समावेश आहे. विशेषतः कुष्ठरोगी, हातांनी काम करणारे श्रमिक, महिला यांचे थंब इम्प्रेशन उमटत नसल्याने आधार लिंक होत नाही. कलेक्टर, महसूल आयुक्त, NGOs यांच्यासोबत बैठक घेऊन आधार लिंक प्रक्रिया सोपी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
झोपडपट्टी, शहरी भाग व ग्रामीण भागातील गरजूंसाठी विशेष शिबिरे घेण्यात येणार असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
मंत्री झिरवाळ म्हणाले की, राज्य सरकारने केंद्र सरकारकडून निधी मिळण्यात होणाऱ्या विलंबावर तोडगा काढत स्वतःकडून विशेष सहाय्याने रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान या प्रकरणी केवायसी करताना २१ हजार रुपयांच्या उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो. या उत्पन्नाच्या दाखल्याची उत्पन्न मर्यादा वाढवल्यास केवायसी करणे सुलभ होईल. या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना सभापती प्रा. राम शिंदे यांनी चर्चेदरम्यान दिल्या.
No comments:
Post a Comment