जीबीएस आजाराबाबत व्यापक जनजागृती
राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन
- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. 5 : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. हा आजार कोरोनासारखा संसर्गजन्य नसून शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास होतो, असे आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या आजाराबाबत राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करण्यात आले असून मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
‘जीबीएस’ आजाराबाबत सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर, मनोज जामसुतकर,चेतन तुपे, सिद्धार्ध शिरोळे, नाना पटोले यांनीही सहभाग घेतला.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, राज्यात पुणे जिल्ह्यात 9 जानेवारी 2025 रोजी पहिला जीबीएस चा संशयित रुग्ण आढळला. 3 मार्च 2025 पर्यंत 222 संशयीत रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 193 रुग्णांचे निदान झाले आहे. सद्यस्थितीत जीबीएस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत नाही. जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हा आजार समाविष्ट करण्यात आला असून गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.
पुणे येथे नियमित सर्वेक्षण सुरू असून बाधित भागातील 89 हजार 514 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मी स्वतः पुणे जिल्ह्यात भेट दिली आहे. बाधित भागातील विहिरीच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. प्रभावित भागातील पाण्याचे क्लोरिनेशन करण्यात आले आहे. राज्यात विविध माध्यमांद्वारे या आजाराविषयी माहिती देण्यात येत असून, लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी केले.
No comments:
Post a Comment