सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक
राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे व गौरव वाढवणारे असले पाहिजे
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना
· सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक कामाचे सादरीकरण
मुंबई, दि. 17 :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या संस्थानाबाहेर जावून विकासकार्य केले. जात, धर्म, पंथ, प्रांताच्या सीमा ओलांडून देशभर पायाभूत सुविधांची निर्मिती केली. साडेतीनशे वर्षांपूर्वी राजकीय, प्रशासकीय, न्यायदानाच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. दूरदृष्टीच्या शासक, जगातल्या सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या म्हणून राजमातांनी केलेले कार्य अलौकिक आहे. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात उभारण्यात येत असलेलं स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे आणि गौरव वाढवणारे असले पाहिजे. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या. स्मारकाचे काम आकर्षक, दर्जेदार झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच स्मारकासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या राजमाता अहिल्यादेवींच्या स्मारकाचा आराखडा आणि कामाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस (व्हिसीव्दारे), विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे (व्हिसीव्दारे), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य रविकांत हुक्केरी, बाळासाहेब पाटील (बंडगर), बाळासाहेब शेवाळे, श्रावण भावर, स्मारक समितीचे कार्यकारी अभियंता गिरीश कुलकर्णी, वास्तुविशारद दिनकर वराडे, काशिनाथ वराडे आदींसह वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अलौकिक आहे. राजमातांनी देशभरात रस्ते बांधले घाट, मंदिरे, धर्मशाळा, पाणपोयी उभारल्या. जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी त्यांनी देशभरात उभारलेल्या बारवा, तलाव, विहिरी या स्थापत्य कलेचे आदर्श उदाहरण आहे. राजमाता अहिल्यादेवी या सर्वकालीन आदर्श स्त्री राज्यकर्त्या, दूरदृष्टीच्या प्रशासक आहेत. त्यांनी केलेले कार्य राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, पुढील पिढ्यांना प्रेरणादायी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सोलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेले स्मारक भावी पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करुन देईल. प्रेरणा देईल. हे स्मारक पुढील शेकडो वर्षे दिमाखात उभे राहिले पाहिजे. स्मारकासाठी वापरण्यात येणारे दगड, सामग्री ऐतिहासिक वास्तूंशी साधर्म्य सांगणारी असली पाहिजेत. स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करावी. स्मारकात उभारण्यात येणारा राजमाता अहिल्यादेवींचा पुतळा हा विद्यापीठाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरुन दिसेल असा उत्तराभिमूख उभारावा. स्मारकाची निर्मिती दर्जेदार पध्दतीने व्हावी, स्मारकाची निर्मिती करताना प्रत्येक बाब बारकाईने, काळजीपूर्वक नियोजनपूर्वक करण्यात यावी. स्मारक भव्य आणि आकर्षक असले पाहिजे. अहिल्यादेवींच्या अलौकिक कार्याचे प्रतिबिंब स्मारकात दिसले पाहिजे, असी अपेक्षा व्यक्त करतानाच या स्मारकासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली.
००००
फोटो ओळ :-
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या राजमाता अहिल्यादेवींच्या स्मारकाचा आराखडा आणि कामाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात आयोजित बैठकीत करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस (व्हिसीद्वारे), विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे (व्हिसीद्वारे), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य रविकांत हुक्केरी, बाळासाहेब पाटील (बंडगर), बाळासाहेब शेवाळे, श्रावण भावर, स्मारक समितीचे कार्यकारी अभियंता गिरीश कुलकर्णी, वास्तुविशारद दिनकर वराडे, काशिनाथ वराडे आदींसह वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
००००
फोटो ओळ :
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्यावतीने (फेस्कॉम) मुख्यमंत्री सहायता निधीसाठी चार लाख रूपयांचा धनादेश मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, मुख्यालय उपाध्यक्ष विजय औंधे, कोकण विभाग अध्यक्ष शा. गो. पाटील, मुंबई अध्यक्ष शरद डिचोलकर, संस्थेचे सचिव विवेक देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
००००
अमरावती खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तपदी विनय कुमार सिन्हा
मुंबई, दि. 17 : श्री. विनय कुमार सिन्हा यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या दालनात शपथविधी समारंभ झाला. राज्य शासनाने राज्य माहिती आयुक्त या पदावर श्री. विनय कुमार सिन्हा यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून 28 ऑक्टोबर 2021 च्या अधिसूचनेनुसार नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे राज्य माहिती आयुक्त, अमरावती खंडपीठ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
०००००
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत
मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरूवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब - https://www.youtube.com/
फेसबुक - https://www.facebook.com/
ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR
निवडणूक आयोग दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविते. हा कार्यक्रम नेमका काय, मतदाराने नाव नोंदणीचा अर्ज केल्यानंतर त्यावर निवडणूक कार्यालयाकडून साधारण काय प्रक्रिया केली जाते, हा पुनरिक्षण कार्यक्रम साधारण किती कालावधीचा असतो, दरवर्षी होणाऱ्या मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणाचे लोकशाही सक्षमीकरणात महत्व, तरुण मतदारांच्या जागृतीसाठी काय प्रयत्न केले जातात, 1 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या विशेष मोहिमेच्या निमित्ताने मतदारांना केलेले आवाहन आदी विषयांची माहिती श्री. देशपांडे यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमातून दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment