राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती कायदेशीर तरतुदीस अनुसरूनच
मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर करण्यात आलेली मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती ही प्रचलित कायदेशीर तरतुदीस अनुसरून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून तसेच वक्फ अधिनियमातील तरतुदीस अनुसरुनच करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागामार्फत करण्यात आले आहे.
या नियुक्त्या विहित प्रक्रिया पार न पाडता केल्या गेल्याचा आरोप झाल्याने तसेच यासंदर्भात माध्यमांमध्ये उलट-सुलट माहिती प्रसिद्ध झाल्याने वस्तुस्थिती मांडण्याच्या अनुषंगाने विभागामार्फत हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्ती विषयीच्या तरतुदी वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम २३ (१) अन्वये विहित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य वक्फ मंडळाने शिफारस केलेल्या विहीत दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांच्या नावांच्या पॅनलमधून एका अधिकाऱ्याची राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करावयाची असते. महाराष्ट्र वक्फ नियम २००३ मधील नियम क्रमांक ७ (१) (ब) मधील तरतुदीनुसार सेवानिवृत्तीच्या वेळेस उपसचिव दर्जापेक्षा कमी दर्जा धारण करीत नसलेल्या सुयोग्य सेवानिवृत्त अधिकाऱ्याची पुनर्नियुक्तीने मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्याची तरतूद आहे. वक्फ अधिनियम १९९५ व महाराष्ट्र वक्फ नियम २००३ मधील या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने त्यांच्या १५ मार्च २०२१ च्या पत्रान्वये सं. छ. तडवी, सहसचिव व अनिस शेख, सेवानिवृत्त उपसचिव या दोन नावांच्या पॅनलची महाराष्ट्र शासनास शिफारस केली होती. शिफारशीनुसार या दोन नावांच्या पॅनलमधून महाराष्ट्र शासनाने १९ मार्च २०२१ च्या शासन अधिसूचनेन्वये अनिस शेख, सेवानिवृत्त उपसचिव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुनर्नियुक्तीने ३ वर्षाच्या कालावधीकरिता नियमित नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती प्रचलित कायदेशीर तरतुदीस अनुसरुन, सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून व मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन करण्यात आली आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्तीबाबतही स्पष्टीकरण करण्यात आले आहे. राज्य वक्फ मंडळाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या राज्य शासनाच्या पूर्वमान्यतेने निश्चित करण्याचे वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम २४ (१) मधील तरतुदीनुसार राज्य वक्फ मंडळाला अधिकार प्राप्त आहेत. यामधील तरतुदीनुसार राज्य वक्फ मंडळाला महाराष्ट्र शासनाचे पूर्वमान्यतेने राज्य वक्फ मंडळाच्या कर्मचाऱ्यांची १०६ इतकी संख्या निश्चित केली असून या १०६ पदांमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा देखील समावेश आहे. राज्य वक्फ मंडळाने या १०६ पदांचे सेवाप्रवेश नियम त्यांच्या २७ जून २०१८ च्या अधिसूचनेन्वये राजपत्रात प्रसिद्ध केले आहेत. या नियमातील तरतुदीनुसार उप जिल्हाधिकारी किंवा तत्सम दर्जाच्या किमान पाच वर्षे इतका अनुभव असलेल्या व उर्दू भाषेचे पुरेसे ज्ञान असलेल्या मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करता येते. श्री. फा. नु. पठाण, कक्ष अधिकारी, अल्पसंख्याक विकास विभाग हे ही पात्रता धारण करणारे अधिकारी आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक विकास विभागाच्या 28 ऑगस्ट २०२० रोजीच्या शासन आदेशान्वये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. ही नियुक्ती प्रचलित कायदेशीर तरतुदींस अनुसरून व सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून करण्यात आली आहे, अशी माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.
००००
जिल्हास्तर युवा पुरस्काराकरीता
प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई दि. 18 : क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सन 2019-20 आणि सन 2020-21 या वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरीता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक-युवती आणि सामाजिक युवकांसाठी अर्ज करणाऱ्या संस्थांनी पुरस्काराकरीता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांनी केले आहे. जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरीता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन 2019-20 व सन 2020-21 या दोन वर्षाकरीता 2 युवक, 2 युवती आणि 2 संस्था असे एकुण 6 पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पुरस्कार पात्रांचे निकष खालीलप्रमाणे आहेत
(अ) युवक व युवती पुरस्कार -
(1) पुरस्कार वर्षाच्या 1 एप्रिल रोजी पुरस्कार्थीचे वय 13 वर्ष पूर्ण असावे तसेच 31 मार्च रोजी वय 35 वर्षाच्या आत असले पाहिजे.
(2) अर्जदार हा मुंबई शहर जिल्हात सलग 5 वर्षे वास्तव्यात असला पाहिजे.
(3) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृतपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफित व फोटो अर्जासोबत जोडावेत.
(4) केंद्र, राज्य, निमशासकिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
(ब) संस्था युवा पुरस्कार
(1) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था पुढील पाच वर्षे कार्यरत पाहिजे.
(2) संस्था सर्वजनिक विश्वास्त अधिनियम 1860 मुंबई किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अँक्ट १९५० अंतर्गत नोंदणीबद्ध असावी.
(3) गुणांकणाकरीता संस्थेने केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे,
चित्रफित व फोटो जोडावेत.
वरील प्रमाणे पुरस्काराकरीता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि. 15 डिसेंबर 2021 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालय वेळेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, 2 रा मजला, धारावी बसडेपो जवळ, धारावी (प), मुंबई-400017 येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 8459585841 यावर संपर्क साधावा, असे मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
'दिलखुलास' कार्यक्रमात
नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण विनायक महामुनी यांची मुलाखत
मुंबई, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित "दिलखुलास" या कार्यक्रमात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण विनायक महामुनी यांची 'नागरी सेवेतील महाराष्ट्र' या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व 'न्यूज ऑन एअर' या अॅपवर शनिवार, दि. २० नोव्हेंबर आणि सोमवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
यंदाच्या नागरी सेवा परीक्षेत विनायक महामुनी यांनी देशात ९५ वा क्रमांक प्राप्त केला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी कोचिंग क्लास हा यशस्वी होण्यासाठी किती फायदेशीर, अभ्यासासाठी पुस्तकांचा वापर, राज्यातच राहून परीक्षेची तयारी आणि परीक्षेसाठी इंग्रजी हा घटक, मुलाखतीची तयारी, मुलाखतीचा अनुभव आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. महामुनी यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.
000
No comments:
Post a Comment