Saturday, 17 June 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना योजना, सेवांच्या लाभाचे वाटप

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील

नागरिकांना योजना, सेवांच्या लाभाचे वाटप






शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत 'शासन आपल्या दारी' अभियान सुरू राहील


- मुख्यमंत्री


            पुणे, दि. 16 : 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून शेवटच्या नागरिकाला विविध योजनांचा लाभ मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. पुणे जिल्ह्यात 2 लाख 86 हजार 278 लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत राज्यात 35 लाख नागरिकांपर्यंत शासन पोहोचले आहे. 104 शिबिराच्या माध्यमातून 286 कोटी रुपयांचा लाभ नागरिकांना देण्यात आला आहे. या अभियानामुळे कोणीही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही.


मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अनेक जनहिताचे निर्णय


            मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, महिला भगिनींसाठी महत्वाचे निर्णय घेतले. ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत व महिलांसाठी प्रवास शुल्कात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयांचा सर्वसामान्य जनतेला लाभ होत आहे.


‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेनुसार राज्य शासनही 6 हजार रुपये भर घालणार असल्याने 12 हजार इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. राज्यातील 18 हजार कोटी रुपयांच्या 29 सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली, त्यामुळे 6 ते 7 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट निधी देण्याचा आणि सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देता यावी यासाठी 1 हजार 500 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


पिंपरी चिंचवड परिसर विकासासाठी महत्वाचे निर्णय


            पिंपरी चिंचवड विकासासाठी अनेक निर्णय घेतले. 2018 ते 2023 पर्यंतचे विकास आणि बांधकामाचे अतिरिक्त विकास शुल्क 100 टक्के माफ करण्याचा निर्णय. एप्रिल 2023 पासून क्षेत्रनिहाय तपासून आकारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडीच एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील अनधिकृत बांधकामासाठीचा 460 कोटी रुपयांचा शास्तीकर माफ करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या भूसंपादनामुळे बाधित झालेल्या भूमिपूत्रांचा प्रश्न सोडविण्यात येईल, असेही ते म्हणाले.


जिल्ह्याच्या विकासाला गती


            पालखी मार्ग आणि पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. चांदणी चौकातील कामही पूर्ण होत आहे. जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आणि वढू बुद्रुक येथे संभाजी महाराज स्मारक काम लवकरच सुरू करण्यात येईल. यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी 5 कोटी रुपये देण्यात येतील. पुण्यातील नद्यांमधील पाणी निर्मळ राहावे यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जलशुद्धीकरणासाठी निधी देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


महिला सक्षमीकरणासाठी महत्वाची पाऊले


            ‘लेक लाडकी लखपती’ ही योजना महिला व मुलींच्या विकासासाठी सुरु करण्यात आली आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनाने बचत गटाच्या उत्पादनांना बाजार उपलब्ध करून देण्याचा आणि फिरता निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल. राज्यात 2 कोटी पेक्षा अधिक महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे. संजय गांधी निराधार योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची मुदत 5 वर्ष करण्यात येईल, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.


राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना


            लोकांचे जीवन सुखी, आनंदी करणे आणि त्यांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. म्हणूनच सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी घेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्यात पायाभूत सुविधांचे अनेक मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम स्थानावर असून गेल्या सुमारे 11 महिन्यात 1 लाख 18 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


शिबिरांतर्गत नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ


            मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप, महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभांचे वितरण तसेच विविध दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत महापालिकेच्यावतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेतील सहा इमारतींमधील 252 सदनिकांचे वाटप यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आले. कोविड संकटाच्या काळात महानगरपालिकेमार्फत नियुक्त केलेल्या मयत कामगारांच्या वारसांना कोरोना विषाणू विमा कवच योजनेच्या प्रत्येकी 25 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. शेवटी कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.


शिबिरात विविध योजनांची माहिती


            या कार्यक्रमासाठी थेरगाव येथील पदमजी पेपर मिलजवळ भव्य मंडपात विविध कक्ष तयार करण्यात आले होते. नागरिकांना याठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यात आली. उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, रहिवासी दाखला, सातबारा, आठ अ, हवेली तालुक्यातील रहिवाशांकरिता जातीचा दाखला, वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला, 33 टक्के महिला आरक्षण दाखला, ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला देण्याची सुविधा करण्यात आली होती. आधार कार्डमधील नवीन दुरूस्ती व अद्यावत करणे, मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करणे, शिधापित्रकेवरील नाव कमी करणे, रेशनकार्डवरील नाव वाढविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा दाखला, नॉन क्रिमीलिअर, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा दाखला देणे आदी सेवाही यावेळी देण्यात आल्या.


****



 

वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी: लोकसभा अध्यक्ष ओम बिरला

 वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी: लोकसभा अध्यक्ष ओम बिरला


वालचंद हिराचंद यांनी तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला: राज्यपाल रमेश बैस


राज्यपालांच्या हस्ते नूतन अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांचा दिमाखदार पदग्रहण सोहळा संपन्न


मुंबई : भारत ही संत, शूरवीर योद्धे आणि समाज सुधारकांची जशी भूमी आहे, तशीच ती महान उद्योजकांची देखील भूमी आहे. वालचंद हिराचंद यांनी बिकट परिस्थितीत उद्योग उभारणीसह नवीनता व संशोधनाचे काम केले. उद्योग विकासाची दूरदृष्टी असलेल्या वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे उद्गार ओम बिरला यांनी याप्रसंगी काढले.


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे सुवर्णमहोत्सवी पुष्प शुक्रवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये गुंफण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्री, अ‍ॅग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांचा सन्मानपूर्वक पदग्रहण समारंभ झाला.

लोकसभा अध्यक्ष ओमजी बिरला म्हणाले, आज देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळातून प्रवास करीत असताना भारत प्रत्येक क्षेत्रात नवीनता व संशोधन करीत आहे. कोविड लसीकरण मात्रा जगाला उपलब्ध करुन भारताने जगाला वाचवण्याचे काम केले आहे. तंत्रज्ञान व जागतिक हवामान बदल आदी क्षेत्रांमध्ये देखील भारत जगाला दिशा देण्याचे काम करीत असल्याचे सांगून सामूहिक प्रयत्न केल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होईल.  

राज्यपाल रमेश बैस म्हणाले, स्वयंचलित वाहन निर्मिती, विमान निर्मिती, जहाज निर्मिती यांसह अनेक पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी पृथ्वी, जल, आकाश अश्या तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला. देश पारतंत्र्यात असताना प्रतिकूल परिस्थितीत उद्योगविश्व निर्माण करणाऱ्या हिराचंद यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहावे इतके मोठे आहे.

आपण शाळेत असताना 'मेड इन जर्मनी'च्या वस्तूंचा बोलबाला होता; पेनाची निब सुद्धा जर्मनीची असायची. कालांतराने 'मेड इन जपान'चा काळ आला व अलीकडे 'मेड इन चायना'चे दिवस आले. परंतु एकविसावे शतक 'मेड इन इंडिया'चे असेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. आज भारत आत्म-निर्भर देश होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्याचे मोठे श्रेय वालचंद हिराचंद यांचेकडे जाते, असे राज्यपालांनी सांगितले. वालचंद हिराचंद यांनी जहाज वाहतूक क्षेत्राला संजीवनी दिली. त्यांनी सुरु केलेल्या महाराष्ट्र चेंबरने उद्योग व वाणिज्य या शिवाय कृषिक्षेत्राला महत्व दिले असे सांगून चेंबरने फलोत्पादन, फुलशेती, भरडधान्य शेती यांसह सेंद्रिय शेतीला चालना द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.    

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, शेठ वालचंद हिराचंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. देशाच्या उद्योग, व्यापार वाढीसाठी आणि तरुणांना व्यावसायिक बनण्याकडे प्रोत्साहन देत आहे.

शेठ वालचंद हिराचंद यांच्या कुटुंबातील सदस्य हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन को. लि. चे अध्यक्ष अजित गुलाबचंद, प्रिमिअर ऑटो इलेक्ट्रीक लि. चे माजी अध्यक्ष अरविंद दोशी, वालचंदनगर इंडस्टीज लि. चे कार्यकारी संचालक व सीईओ चिराग दोशी, पद्मश्री सरयु दोशी, पल्लवी झा यांचा सत्कार करण्यात आला. दि शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक कॅप. बिनेशकुमार त्यागी, अतिरीक्त मुख्य सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र सर्कल चे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किशन कुमार शर्मा, कौन्सिल दि रॉयल कॉन्सुलेट जनरल ऑफ सौदी अरेबियाचे सुलेमान इद एस अल्ताइबी, कौन्सिल जनरल कॉन्सुलेट जनरल ऑफ मलेशियाचे अहमद झुआरी युसुफ, कौन्सुल जनरल ऑफ कॉन्सुलेट जनरल ऑफ बेलारूसचे अन्टॉन पशकोव्ह, चार्ज डी अफेअर्स दि कॉन्सुलेट जनरल युएई चे हमीद अलधाभाई यांचाही सत्कार झाला. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे पेट्रोन मेंबर्स नितिन धूत, रमाकांत मालू, संगिता पाटील, प्रकाश शहा, मुकेश राध्येशाम खाबणी यांचा सन्मानपूर्वक सत्कार झाला.

दरम्यान महाराष्ट्र चेंबरच्या वतीने नाशिक येथे 6 ते 9 ऑक्टोबर, 2023 रोजी होत असलेल्या ‘मायटेक्स एक्स्पो या औद्योगिक प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चेंबरचे ट्रस्ट बोर्ड चे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रविंद माणगावे, उपाध्यक्ष तनसुख झांबड, उत्तर महाराष्ट्र चेअरमन कांतीलाल चोपडा, सेक्रेटरी जनरल सागर नागरे आदींनी संयोजन केले. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद दोशी यांनी आभार मानले.

पंचाम्रुताचे फायदे

 💢..... पंचाम्रुताचे फायदे...

१) स्मरणशक्ति वाढते

२) शरिर निरोगी राहते

३) अँसिडिटि साठि उत्तम उपाय

४) शक्तिवर्धक आहे.

       ------

     घटक

 साखर १ चमचा

  मध १ चमचा 

 ताजे दहि २ चमचे 

 साजूक तूप २ चमचे

 कोमट दूध ५ चमचे

( वरिल प्रमाणात आणि वरील क्रमाने)

  हे रोझ घेतल्यास शरिर शक्ति, स्फूर्ति, स्मरणशक्ति वाढते. , कांति उजळते, ह्रुदय, मेंदू यांचे पोषण होते.

..... वात, पित्त, कफ, ह्या त्रिदोषांचे संतुलन होते.

  या पंचाम्रुत मध्ये चिमुटभर केशर घातल्यास अजून फायदेशिर.. केशर रक्तधातू वाढवणारे आणि रक्तशुद्वि करणारे आहेत.

   * पंचाम्रूत* 

 पंचाम्रूत म्हणजे दहि, दूध, तूप, मध, आणि साखर अथवा गूळ समप्रमाणात एकत्र घेणे. फक्त तूप किंवा मध समप्रमाणात घेउ नये. दोहोंपैकि एकाचे प्रमाण थोडेसे जास्त घ्यावे.

    ##दूधः  

 गाईचे दूध सर्वात श्रेष्ठ. ते पचायला हलके, गोड, पित्ताचा नाश करणारे, बळ देणारे आहे. शेळिचे दूध हे हि पथ्यकर आहे., म्हशिचे दूध पचायला हलके असते.

  दूध तापवून प्यावे. दूध कुठल्याहि आंबट फळाबरोबर, मासे, खार्या पदार्थांसोबत, घेउ नये. त्यामूळे शरिरात विषारि घटक उत्पन्न होतात.

       ##दहीः

 दहि खातांना थंड असले तरि पचल्यानंतर उष्ण गुणाचे होते, गोड, व्यवस्थित लागलेले दहि पुष्टिकर असते. अर्धवट लागलेले दही किंवा आंबट दहि रक्त दूषित करून त्वचाविकार निर्माण करते. सूज वाढवते.

 -- दहि गरम करू नये......- दहि रात्रि खाउ नये.....

-- सर्दि, खोकला, असतांना दहि खाउ नये....

      ##तूपः

 तूप भूक वाढवणारे, स्म्रूती, बुद्धि वर्धक, त्वचेचे कांतिवर्धन करणारे असते. डोळ्यांचि आग होणे, दुखणे, 

 चष्म्याचा नंबर यासाठी उपयुक्त.

 -- अजिर्ण असताना खाउ नये..

 -- पोट साफ होण्यासाठि रात्रि झोपताना गरमदूध+ तूप घ्यावे..

  -- नाक लाल होउन रक्त येत असेल तर नाकात तूप सोडावे..

   -- डोळ्यांसाठी तूप, मध, साखर रोज खाल्याने फायदा होतो..

      ##मधः

  मध गोड, रूक्ष, कफावर कार्य करणारा आहे.

 -- मध गरम करून अथवा उष्ण पदार्थासह खाऊ नये.

 -- डोळ्यात मध घातल्यास डोळ्यांना फायदा होतो.

 -- मध पाण्याने वारंवार लागणारी तहान शमते.

 -- तोंड आले असता मध घालून पाण्याच्या गुळण्या कराव्या.

     ##साखरः

 साखर/ गुळ. तहान कमि होते.

 खडिसाखर सर्वश्रेष्ठ असते.

  * पंचाम्रुताचे फायदे*

  -- शरिर पुष्ट करते

  -- पोटात आग पडणे, जळजळ थांबवते.

   -- मानसिक शांति देते.

   -- मनावरचा ताण कमि होतो.

   -- बुद्धिवर्धक

   -- वजन वाढवते

   -- सकाळि उठल्याबरोबर घेतले अधिक चांगले फायदे मिळतात.....

...........💢💢💢......


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी "बीटरूट" उत्तम !!*

 *कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी "बीटरूट" उत्तम !!* 


बीटरूट ही प्रत्येक हंगामात उपलब्ध असलेली भाजी आहे. लोक ते सॅलड किंवा ज्यूसच्या स्वरूपात खातात. त्यात फोलेट आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात असते, जे आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. तर फोलेट आपल्या मेंदूसाठी फायदेशीर आहे. याशिवाय बीटरूटमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही आजपर्यंत या भाजीचे सेवन केले नसेल तर आजच या भाजीचा आहारात समावेश करा. आम्ही तुम्हाला इथे सांगतो की बीटरूट खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत ?


◼️ *बीटरूट खाण्याचे फायदे :-


*मेंदूला तीक्ष्ण बनवते :* 


बीटरूटमध्ये नायट्रेट्स असतात जे वाढलेले रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. एवढेच नाही तर रोज बीटरूटचे सेवन केल्यास हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. दुसरीकडे, बीटरूट खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो आणि तीक्ष्ण बनतो.


*रक्ताची पातळी शरीरात ठीक राहते :* 


बीटरूटमध्ये लोह आणि खनिजे आढळतात, जे शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात. दुसरीकडे, जर तुम्ही दररोज बीटरूटचे सेवन केले तर हिमोग्लोबिनची कमतरता नाही. ज्यामुळे तुमची ऑक्सिजनची पातळी आणि रक्ताची पातळी शरीरात ठीक राहते.


*कोलेस्टेरॉल :* 


बीटचा ज्यूस रोज प्यायल्याने खराब कोलेस्टेरॉल निघून जाते, त्यामुळे ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होत नाही आणि लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित समस्यांपासून वाचतो.


*चेहऱ्यावर ग्लो येतो :* 


दररोज बीटरूटचा रस प्यायल्याने त्वचा निरोगी होते. एवढेच नाही तर चेहऱ्यावर ग्लो येतो.


संकलन-

डॉ. प्रमोद ढेरे,


_*

मूड चांगला राहण्यासाठी काही उपाय*

 *मूड चांगला राहण्यासाठी काही उपाय*


*उदास आहात का ?


मग serotonin या हार्मोनच्या अगदी थोड्या प्रमाणामुळे देखील चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. कारण या हार्मोनमुळे चिंता कमी होऊन मूड चांगला होण्यास मदत होते, भूकेवर नियंत्रित येतं व आनंदी राहण्याचं उत्तेजन मिळतं. म्हणून जर उदास वाटत असेल तर मेंदूत हा हॅपी हार्मोन स्त्रवण्यासाठी खालील उपाय नक्की ट्राय करा.


*मसाज-* मसाज घेतल्याने खूप मोकळं वाटतं. त्यामुळे प्रत्येकालाच मसाज घेणे आवडते. तसेच मसाज घेतल्याने serotonin च्या वाढीस चालना मिळते व त्यामुळे दुःख दूर होऊन प्रसन्न वाटतं, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.


*दूध-* दूधपिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे दुधात असलेल्या α-lactalbumin मुळे serotonin ची निर्मिती होते. α-lactalbumin युक्त कोणत्याही आहाराने मूड सुधारण्यास मदत होते.


*झोप-* अपुरी झोप घेऊ नका. अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे, झोपेचा व serotonin चा संबंध असतो. त्यामुळे मूड चांगला ठेवण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप घ्या.


*हळद-* यामध्ये असलेल्या Curcumin यात अँटीडिप्रेसन्ट गुणधर्म असतात. म्हणून कोमट दुधात हळद घालून घेतल्याने चटकन मूड सुधारतो.


*काळामिरी-* यामध्ये Piperin नावाचे ऍक्टिव्ह कंपाऊंड असते. ते serotonin च्या निर्मितीस अडथळा आणणारे एंझ्याइम्स ब्रेक करते.


*व्यायाम-* serotonin स्त्रवण्याचा उत्तम उपाय म्हणजे व्यायाम करणे. म्हणून नियमित व्यायाम करा आणि प्रसन्न रहा.


*डॉ. प्रमोद ढेरे*


*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*



आधिक मासाविषयी*वर्षी १८ जुलै ते १६ आॕगस्ट असा श्रावण महिना हा "अधिकमास" आला आहे.*

 *आधिक मासाविषयी*


*या वर्षी १८ जुलै ते १६ आॕगस्ट असा श्रावण महिना हा "अधिकमास" आला आहे.*

__________________

  

*अधिकमास म्हणजे काय? व त्याला एवढे महत्व कां?*


 *सण हे चंद्रावर अवलंबून आहेत.आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत.आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा उत्तम असा मेळ घातलेला आहे. या गणितावरुन येणारा जास्तचा जो महिना असतो तो म्हणजे "अधिक मास" व कमी झालेला जो महिना असतो त्याला "क्षयमास" असे म्हटले जाते.* 


 *सूर्य एका राशीमधे असताना. जर दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला, तर पहिला येणारा महिना जो असतो तो अधिकमास असतो व दुसरा तोच असणारा महिना हा* 

*निजमास असतो.* 


 *ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास .* 


*या आधिक मासात ३३ या संख्येला विशेष महत्व (प्राधान्य) आहे.*


*अधिक महिन्याचा आणि ३३ अंकांचा संबंध काय?*


*तर एका चांद्रवर्षात ३६० तिथी असतात.* 


*आणि एका सौर वर्षात ३७१ तिथी असतात.*


  *म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ तिथीने लहान आहे.* 


 *आता प्रत्येक वर्षात ११ तिथी जर कमी झाल्या. तर ११ या संख्येप्रमाणे तिन वर्षात ३३ तिथी कमी* *होतात.*


*आणि ३३ तिथी ज्या कमी होतात. त्या कमी तिथींचा योग्य मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येतो. आणि त्या वाढीव येणाऱ्या महिन्यालाच*

*अधिक महिना (अधिकमास, धोंडामास) म्हणतात.* 


*दोन अधिकमासात कमीतकमी २७ महिने व जास्तीतजास्त* 

*३४ महिने अंतर असते.* 


*आता अधिकमासात कोणती कर्मे करावीत ? कोणती कर्मे करू नयेत ?*


*तर अधिकमासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत म्हणजेच नामकरण, अन्नप्राशन इत्यादी कर्मे करावी. परंतू देव प्रतिष्ठापना, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांत, गृहारंभ इत्यादी कर्मे करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे.*


 *अधिकमासाला पुरुषोत्तममास असे का म्हणतात ?*


 *याविषयी एक कथा सांगितली जाते. अधिकमासाला धोंड्यामहिना,अथवा मलमास असेही म्हटले जाते.* 


*या महिन्यात शुभ कार्ये केली जात नाहीत. फक्त नैमित्तिक कार्येच होतात. याचे या अधिकमासाला खूप वाईट वाटले. म्हणून एकदा हताश, निराश,दु:खी*

 *झालेला अधिकमास हा श्रीविष्णूंकडे गेला*

*व आपली निराशा* *सांगितली*


*श्रीविष्णूने अधिकमासाला श्रीकृष्णाकडे पाठवले.*

 

*श्रीकृष्णाने मात्र अधिकमासाचे स्वागत करुन त्याचे "पुरुषोत्तम मास"*

*असे नांव ठेवले. आणि सांगितले हा सर्वोत्तम मास आहे. लोक या महिन्यात जास्त दानधर्म करतील. व त्या मुळे हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल.* 


*म्हणून याला अधिकमास अथवा ‘ पुरुषोत्तममास ‘ असे नांव प्राप्त झाले.*


 *अधिकमासात ‘ विष्णूपूजनाला प्राधान्य आहे. तसेच अपूप दान ‘ देण्याची पद्धत आहे. अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ. उदा.* 

*(अनारसे, बत्तासे, मेसूर)*


*वेदकालातही* 

 *"न पूयते विशीयंति" इति -अपूप ‘ असे वर्णन आहे.*


 *गहू किंवा तांदूळाच्या पिठात तूप व गूळ मिसळून केलेला विशेष पदार्थ (अपूप) म्हणजे "अनरसा"* 


*अधिकमासात ३३ अनरशांचा नैवेद्य विष्णूला अर्पण करावा. व ३३ अनरसे दान करावेत असे सांगण्यात आले आहे.*


*विवाह समारंभात कन्यादानाचे वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरुप मानून माता,पिता त्यांना नमस्कार करतात. त्यामुळे जावई हा विष्णूसमानच असतो.*  


*म्हणून विष्णूरुपी जावयाला ३३ अनरसे दान देण्याची पद्धत पडली आहे.*


*किती महिने अधिक येतात?*

*सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात.* 


*चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे ९ महिने अधिक येतात.* 


 *मार्गशीर्ष व पौष हे २ महिने क्षयमास होतात.*


 *राहिला उर्वरीत माघ महिना. हा मात्र कधीच क्षय किंवा अधिक होत नाही.*


*आता क्षयमास म्हणजे काय?*

   

*(कधी कधी एका चांद्रमहिन्यात सूर्य दोन राशीत प्रवेश करतो. तो क्षयमास असतो.*  


 *आणि एक क्षयमास आला की त्यावर्षी दोन अधिकमास येतात.)*  

 __________________

*संदर्भ– श्री दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक.*

प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिताप्रवेश प्रक्रिया सुरु

 प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिताप्रवेश प्रक्रिया सुरु


 


            मुंबई, दि. १६ : शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी २० जुलै २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन अधीक्षक शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


              दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत असलेल्या शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत १६ ते ४५ वर्ष या वयोगटातील, इयत्ता ६ वी (वरिष्ठ) उत्तीर्ण, कोणताही गंभीर आजार नसलेले व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किमान ४० टक्के कर्णबधीर असलेल्या मुलांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर सुतारकाम, जोडारी, तारतंत्री यासंबंधी एक वर्षीय प्रशिक्षण विभागांमध्ये देण्यात येते.


            प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क वगळता निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य विनामूल्य पुरविण्यात येते.


            प्रवेश अर्जाचे वाटप कामकाजाचे दिवशी शासकीय सुट्ट्या वगळून कार्यालयीन वेळेत शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र, शांती भवन, निजधाम आश्रम समोर, तहसिल कार्यालयाजवळ, गांधीरोड ५. उल्हासनगर, जि. ठाणे या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. टपालाने अर्ज मागवावयाचे असल्यास वरील पत्त्यावर रु.१०/- चे पोस्टाचे तिकीट लावलेले व स्वतःचा संपूर्ण पत्ता असलेला (पिनकोडसह) लिफाफा पाठवावा. अर्ज व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे दिले जातील. असे अधीक्षक शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर- ५ यांनी कळविले आहे. (संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक- ९२८४९३७८१३, ९०२१४०३९३८, ८६०००११४८९)


*****

Featured post

Lakshvedhi