शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे उर्वरित काम सप्टेंबरपर्यंत
पूर्ण करण्याचे नियोजन
-उद्योग मंत्री उदय सामंत
नागपूर दि. १२ : शिवडी-वरळी उन्नत मार्गाच्या एकूण कामापैकी ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे उर्वरित काम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वरळी आणि शिवडी दरम्यानचा प्रवास अधिक जलद होईल. तसेच वरळी ते अटल सेतू प्रवासात वेळेची बचत होण्यास मदत होईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी वरळी येथून जाणाऱ्या शिवडी जोडरस्त्याच्या कामास गती मिळणेबाबत विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भाई जगताप, सुनील शिंदे, प्रविण दरेकर आणि सचिन अहिर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
मंत्री सामंत म्हणाले, या रस्त्याचे कामास शिवडी रेल्वे स्टेशनजवळील प्रकल्प बाधित लोकांच्या तसेच एल्फिस्टन परिसरातील प्रकल्प बाधित लोकांच्या पुनर्वसन प्रक्रियेच्या कामामुळे विलंब झाला.
या रस्त्याच्या कामामुळे ८३ कुटुंब बाधित होत असून त्यापैकी ३ कुटुंबांना त्यांच्या मागणीनुसार आर्थिक मोबदला देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या उर्वरित कुटुंबांचे त्याच परिसरात म्हाडाकडून एमएमआरडीएकडे प्राप्त होणाऱ्या सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment