छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक
मुंबई, दि.12:- आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, ती वास्तू महाराष्ट्र शासन अधिग्रहित करून तेथे स्मारक उभारले जाणार आहे. यासाठी आग्रा येथील या जागेचे अधिग्रहण व संबंधित प्रक्रिया राबविण्याकरिता उत्तर प्रदेश शासनाशी समन्वय साधण्यासाठी 'समन्वयक' म्हणून पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला 395 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आग्रा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, त्या ऐतिहासिक स्थळावर महाराष्ट्र शासनामार्फत भव्य स्मारक उभारले जाणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, असेही सांगितले होते.
या स्मारकाच्या उभारणीसाठी पर्यटन विभागाला नोडल विभाग म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच आग्रा येथील शिवरायांच्या मुक्कामाच्या जागेचे अधिग्रहण व संबंधित प्रक्रिया राबवण्यासाठी उत्तर प्रदेश शासनाशी समन्वय साधण्यासाठी राजजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रा येथील मुक्काम हा स्वराज्याच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना आहे. त्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक उभारले जाणार आहे.
No comments:
Post a Comment