उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
- उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचे वितरण
मुंबई, दि. 13 : महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी ‘एक नंबर’ वर ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल, ती सर्व ताकद उद्योजकांना देण्याची राज्य शासनाकडून तयारी आहे, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
2022 - 23 आणि 2023- 24 या वर्षांकरिता "महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार 2025" चे वितरण मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या पुरस्कार वितरण समारंभात उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोना, उद्योग सचिव डॉ. पी अन्बळगन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त वैभव वाघमारे तसेच पुरस्कार विजेते निर्यातदार उद्योजक उपस्थित होते.
उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत म्हणाले की, राज्याच्या निर्यातीचे गुणोत्तर दहा पटीने वाढवण्यासाठी 12 नवीन धोरणे आणली जात आहेत. यात एव्हीजीसी, जीसीसी, बांबू, लेदर, एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स यासारखी धोरणे लवकरच येणार आहेत. या धोरणांमुळे उद्योजकांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दावोस, जर्मनी, जपान यासारख्या परदेश दौऱ्यांतील कराराद्वारे महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक वाढल्याचे सांगत उद्योग मंत्री डॉ.सामंत म्हणाले की, दावोस येथे पहिल्या वर्षी 1.70 लाख कोटी, दुसऱ्या वर्षी 7 लाख कोटी तर तिसऱ्या वर्षी 16 लाख कोटी रुपयाचे विक्रमी सामंजस्य करार झाले. या सामंजस्य कराराच्या 80 टक्के अंमलबजावणीसह महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचा अभिमान त्यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment