उद्योग मंत्री डॉ.सामंत यांनी उद्योजकांना आवाहन केले की, पुरस्कार स्वीकारताना आपण महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करत आहात, त्यामुळे भूमिपुत्राला रोजगार कसा मिळेल, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातील उद्योजकांनी नवी मुंबईतील आगामी प्रकल्पासाठी पहिले ट्रेनिंग सेंटर रत्नागिरीत सुरू करून स्थानिक तरुणांना किमान 40 हजार रुपये वेतन मिळवून देण्याचे कौतुकास्पद काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योग स्थापनेनंतर स्थानिक रोजगार आणि भूसंपादन या दोन कारणांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी उद्योजकांनी स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि उद्योजक संघटनांनी यात नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त करून मैत्री पोर्टल आणि मिलाप प्रणालीमुळे उद्योजकांची कामे अधिक गतीने व पारदर्शकपणे होत आहेत.
राज्याच्या विकासात उद्योजकांचे मोठे योगदान असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत मागील तीन वर्षांत 57 हजार0 उद्योजक तयार झाले आहेत. महाराष्ट्रातील उद्योजकांना विस्तारासाठी आता 'रेड कार्पेट' दिल्यामुळे मोठी गुंतवणूक फक्त महाराष्ट्रात होत आहे. त्याचप्रमाणे, मागील दोन वर्षांत 1.5 लाख बेरोजगार युवकांना उद्योजकांनी रोजगार मिळवून दिल्याबद्दल उद्योग मंत्री डॉ.सामंत यांनी आभार व्यक्त केले.
उद्योगांकरिता तयार करण्यात येणाऱ्या धोरणांचा फायदा उद्योजकांपर्यंत कसा पोहोचवायचा, यावर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याची सूचनाही उद्योग मंत्री डॉ.सामंत यांनी विभागाला केली.
यावेळी उद्योग मंत्री यांच्या हस्ते ‘एक्सपोर्ट कन्व्हर्शन बुकलेट’चे प्रकाशन करण्यात आले. तसेच निर्यात वाढीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या रत्नागिरी, नागपूर, गडचिरोली आणि लातूर जिल्हाधिकाऱ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी विभागाच्या कामांची विस्तृत माहिती प्रास्ताविकपर भाषणात मांडली. तसेच उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोना, उद्योग सचिव डॉ.पी.अन्बळगन यांनीही विचार मांडले.
No comments:
Post a Comment