शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी करणार
- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
- गैरव्यवहार आढळल्यास प्रमाणिकरण संस्थांचा अहवाल केंद्र शासनाला पाठवणार
 - फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
 
मुंबई, दि. १५ : राज्यातील सेंद्रीय प्रमाणित व नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. केंद्र शासन प्रमाणित संस्थाकडून राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार असून या तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास अशा संस्थांचा अहवाल केंद्र शासनाला पाठवणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
मंत्रालय येथे सेंद्रिय प्रमाणीकरण संस्था संदर्भात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार राहुल मोटे, ‘आत्मा’चे संचालक सुनिल बोरकर, उपसचिव संतोष कराड, दूरदृश्यप्रणालीद्वारे ग्रीनसर्ट बायोसोल्युशन प्रा.लि. पुणेचे प्रतिनिधी सुनिल केसरे, ब्युरो व्हेरीटस प्रायव्हेट लिमिटेडच्या सुचिता यादव, वनसर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड जयपूरचे आशिष दळवी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment