स्वच्छता मोहीमेत जनजागृतीबरोबरच जनतेचा सहभाग महत्त्वाचा
- मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. १७ : राज्यात स्वच्छता मोहीम राबवितांना जनजागृती बरोबरच गाव स्वच्छतेसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
"स्वच्छता ही सेवा २०२५"या संकल्पनेचा अंगीकार करत राज्यभरात सुरु होणाऱ्या "स्वच्छतोत्सव" २०२५ चा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे अतिरिक्त मिशन सचिव शेखर रौंदळ यांच्यासह दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, गावातील नागरिक, महिला बचत गटातील कार्यकर्त्या अशा व्यक्तींना गावातील 'ब्रँड अॅम्बेसिडर' म्हणून नामनिर्देश करून त्यांना या मोहिमेत सामावून घ्यावे. स्वच्छता मोहिमेकरिता शासनाने सर्व पातळ्यांवर सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या असून जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
"स्वच्छता ही सेवा २०२५" फक्त एक मोहिम नसून, संपूर्ण राज्याने एकत्र येऊन गाव-गावात, घराघरात स्वच्छतेचा दीप प्रज्वलित करण्याची संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “स्वच्छ भारत अभियान”ला बळ देत, महाराष्ट्राने पुन्हा पथदर्शी काम करावे.
या कार्यक्रमात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना २ ऑक्टोबर रोजी सन्मानित करण्यात यावे. स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था, महिला बचत गट, युवक यांचा समावेश करून लोकसहभाग वाढवावा, हेच या मोहिमेचे यश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment