बदलत्या सकारात्मक विचारधारेचा
युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १० : विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने सुधारित युवा धोरणाची आखणी करावी. नव्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश युवा धोरणात केल्यास परिवर्तन शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधानभवन येथे राज्याच्या सुधारित युवा धोरणासाठी गठित समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मिटकरी, श्रीकांत भारतीय, संतोष दानवे, राजेश पवार, आशुतोष काळे, प्रवीण दटके, देवेंद्र कोठे, सुहास कांदे, डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रकाश सुर्वे, वरुण सरदेसाई, रोहित पाटील, युवा बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह, आयुक्त शीतल तेली तसेच राज्य व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, युवकांचे विचार, त्यांच्या अपेक्षा समजून घेत धोरण आखले गेले तर ते समर्पक ठरेल. शहरी व ग्रामीण भागातील युवकांना समान संधी मिळावी यासाठी प्रशिक्षण, सुविधा आणि योजनांचा समावेश असलेले समतोल धोरण तयार करणे आवश्यक आहे. युवक कल्याण विभागाबरोबरच अन्य विभागांनीही हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये, सोशल मीडिया आणि सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनाही धोरणात सहभागी करून त्यांच्या सूचना समाविष्ट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आज दिले.
बैठकीत आमदार आणि निमंत्रित सदस्यांनीही सूचना मांडत समृद्ध धोरणासाठी योगदान दिले.
No comments:
Post a Comment