हक्काच्या घरामुळे गरिबांना स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचा आधार मिळाला
-उपमुख्यमंत्री अजित पवार
ग्रामविकास विभागाचा हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादीत नूसन आपल्या ग्रामविकास क्षेत्रात सामुहीक यश आणि प्रयत्नांचा उत्सव असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आपले घर ही फक्त वास्तू नसून स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचा आधार असतो, हा आधार राज्यातील लाखो नागरिकांना मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत यावर्षी देखील लाखो नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे. देशात 3 कोटी नागरिकांना घर देण्याचे उद्दीष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. महाआवस अभियान राज्य शासनाचे अभिनव पाऊल होते. यात घरासोबत वीज, शुद्ध पाणी, रस्ता, गॅस जोडणी, स्वच्छता गृह आणि मनरेगा अंतर्गत रोजगार आदी मिळत असल्याने घर समृद्ध आणि राहण्याजोगे बनले आहे.
महाराष्ट्राला केंद्र सरकारने 20 लाख घरकुलांचे उद्दीष्ट दिल्याबद्दल केंद्रीय ग्रामविकास मंत्री श्री.चौहान यांना धन्यवाद देऊन श्री.पवार पुढे म्हणाले, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी क्षमतेने काम केल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. यापुढेदेखील या प्रयत्नात सातत्य ठेवून वेगाने घरकुले उभारावे लागतील. घरकुलासाठी गायरान जमीन देण्याचा क्रांतीकारी निर्णय शासनाने घेतल्याने अनेकांचे घराचे स्वप्न पुणे होईल. ग्रामीण गृहनिर्माण अभियान यशस्वी करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. कष्टकरी सर्वसामान्य माणसाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
घरकुलांची उद्दीष्टपूर्ती होण्यासाठी भरीव प्रमाणत निधी उपलब्ध करून देण्यात आला असून प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अटल बांधकाम आवास योजना, पारधी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास योजनांसारख्या योजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या प्रकल्पांची ग्रामीण भागात वेगाने अंमलबजावणी करावी, असे आवाहन श्री.पवार यांनी केली. राज्याच्या ग्रामविकास विभागाने देशपातळीवर चांगली कामगिरी करून राज्याचा लौकीक उंचावला असून घरकुलाचे उद्दीष्ट पूर्ण करून या लौकीकात भर घातली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामविकास मंत्री श्री.गोरे म्हणाले, सर्वांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करीत असतांना गेल्या ७ वर्षात राज्याला प्रधानमंत्री आवास योजनेचे १३ लाख ५७ हजार उद्दीष्ट मिळाले होते. यावर्षी २० लाख घरांचे विक्रमी उद्दीष्ट मिळाल्याने या योजनेच्या अंमलबजावणीला गती येईल. या घरांना मंजूरी देण्याचे काम ४५ दिवसात करण्यात आले आणि मंजूरी पत्र एकाच दिवशी देण्यात आले. घर बांधत असतांना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी घरकूलासाठी ५० हजाराचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला.
घर बांधण्यासाठी वाळूची अडचण दूर करण्यासाठी मोफत ५ ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूमिहीन लाभार्थ्याला घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून गायरान, गावठाण जमीन उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पं.दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी १ लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५० हजाराहून अधिक घरे पूर्ण केली असून पुढील वर्षभरात सर्व २० लाख घरे उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या वर्षभरात ५० लाख 'लखपती दिदी' करण्यात येतील, असेही श्री.गोरे म्हणाले.
यावेळी ‘अमृत ग्राम महा आवास अभियान-महाराष्ट्राची गौरवगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत पुरस्कार विजेत्यांची यशोगाथा देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच प्रतिनिधीक स्वरूपात महा आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांच्या चावीचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० लाख घरांचे उद्दीष्ट पत्र सुपूर्द करण्यात आले.
No comments:
Post a Comment