ठाणे येथील खाडी किनारा मार्गाच्या निविदा प्रक्रियेत
कोणतीही अनियमितता नाही
-मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 18 : ठाणे येथील खाडी किनारा मार्गाच्या कामाच्या ढोबळ अंदाजपत्रकाच्या तुलनेत कामाच्या संख्येत वाढ झाल्याने सविस्तर अंदाजपत्रकात वाढ झाली असून या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नाही, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, निरंजन डावखरे, सचिन अहिर आदींनी सहभाग घेतला.
मंत्री श्री. देसाई म्हणाले, ठाणे येथील बाळकुम ते गायमुख या १३.४५ कि.मी लांबीच्या खाडी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी कोस्ट गार्ड, नौदल, केंद्रीय पर्यावरण विभाग आदींच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन प्रारंभी प्राधिकरणाच्या १६ नोव्हेंबर २०२१ च्या बैठकीत १३१६.१८ कोटींचे ढोबळ अंदाजपत्रक सादर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर ठाणे परिसरातील आठ ठिकाणी भुयारी मार्गांचे काम, कास्टिंग गार्ड, पादचारी पूल, तात्पुरता पूल, वाढलेले जीएसटीचे दर आदींमुळे २०२४ मध्ये सविस्तर अंदाजपत्रक तयार करताना प्रकल्प खर्चात ३३६४.६२ कोटी रुपये अशी वाढ झाली. याप्रकरणी कोणतीही अनियमितता झालेली नसल्याने एसआयटी स्थापन करण्याची आवश्यकता नाही तथापि सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन चालू अधिवेशन संपण्यापूर्वी सभापतींच्या दालनात संबंधित सदस्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे मंत्री श्री देसाई यांनी सांगितले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या प्रश्नाच्या उत्तरात प्रकल्पाबाबतची माहिती दिली.
00000
No comments:
Post a Comment