ठाणे मनपा क्षेत्रातील शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्वांगीण आराखडा
- मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. ८: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिका शाळांच्या दुरुस्तीबाबत सर्वांगीण आराखडा तयार करण्यात येईल. सर्वोच्च प्राथमिकता असणाऱ्या शाळांची प्राधान्याने दुरुस्ती केली जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर शाळांची दुरुस्ती करण्यात येईल. यासाठी महानगरपालिकेकडे निधीची कमतरता असेल, तर जिल्हा नियोजन मंडळाकडून त्यासाठी निधी मिळण्याबाबत पालकमंत्र्यांना विनंती करण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य संजय केळकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण ९३ इमारती / संरचनेत एकूण १९४ शाळा व बालवाड्या भरत आहेत. शिक्षण विभागामार्फत ३४ शाळा व ११ बालवाडी दुरुस्ती करण्याकरिता केलेल्या मागणीच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेमार्फत माहे मार्च, २०२३ पासून या शाळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या शाळांच्या इमारती (शाळा व बालवाडीसह) ऑडिट करण्याकरीता प्रस्ताव तयार करण्यात आला असून महानगरपालिकेच्या तालिकेवर नियुक्त असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर्स मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे ते म्हणाले.
ठाणे महानगरपालिकेच्या शाळांपैकी सद्य:स्थितीत शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ३४ शाळा व ११ बालवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करुन त्यास मंजुरी घेऊन निविदा मागविण्यात आल्या. सद्य:स्थितीत ही कामे महानगरपालिकेच्या विविध प्रभागामध्ये सुरु असून, सुमारे ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले असल्याचे ठाणे महानगरपालिकेने कळविले असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा इमारतीच्या दुरुस्तीची निकड व उपलब्ध आर्थिक तरतूद या बाबींचा विचार करून शाळा इमारती दुरुस्तीचे कामे महानगरपालिका हाती घेत आहे. तसेच या शाळांच्या इमारतींची तपासणी व सुरक्षा उपाययोजना इ. बाबी लक्षात घेता, शाळांचे दुरुस्ती व नुतनीकरण प्राधान्याने करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
0000
No comments:
Post a Comment