“वेडात मराठे वीर दौडले #सात”
जेष्ठ साहित्यीक कविवर्य #कुसुमाग्रजांच्या ओजस्वी लेखणीतून साकारलेल्या या रक्त सळसळणाऱ्या ओळी वाचल्या की ओळख होते कर्तबगार मराठ्यांच्या अतुलनीय शौर्याची.हि कविता कानावर पडली की जवळ जवळ प्रत्येकालाच स्फुरण येतं अन् मराठ्यांचा ज्वलंत इतिहास डोळयासमोर उभा राहतो. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी १६७४ साली शौर्य गाजवलेला स्वराज्याच्या इतिहासातील एक सुवर्ण पान.
छत्रपती शिवाजी महाराज, यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यात अनेक मातब्बर सरदार आणि लढवय्ये मराठा शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते.
त्यात हिरे ,मोती ,माणिक अशी मानवी रत्नांची खाण होती…या लढवय्या सैनिकांचे सरनोबत होते प्रताप राव गुजर यांचे खरे नाव कुडतोजी गुजर होते पण त्यांच्या असीम पराक्रमा बद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना प्रतापराव ही पदवी दिली.
#प्रतापराव !
प्रताप राव गुजर खरोखरच एक कुशल रणनीतिकारक आणि कुशल सेनापती होते. त्यांनी मुघल व विजापुरी सुलतानांविरूद्ध अनेक महत्त्वपूर्ण व कित्येक निर्णायक युद्ध विजयांचे ते नायक होते.
शिवराज्याभिषेकापूर्वी काही महिने, महाराज पन्हाळगडावर स्थित होते.याचकाळात अदिलशाही सरदार बहलोलखान हत्ती-घोड्यांचे वीस हजारी सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला.
याची खबर लागताच प्रतापराव गुजर आणि इतर मान्यवर सरदारांना शिवाजीराजांनी गडावर बोलावले आणि आज्ञा दिली की “खान वळवळ भारी करतो, त्यास मारोन फते करणे.महाराजांची आज्ञा घेऊन प्रतापराव आपल्या सैन्यानिशी बहलोलखानावर चालून गेले. बहलोलखानाचा मुक्काम डोण नदीजवळ उमराणी गावी होता.
मराठ्यांनी सर्वप्रथम एका बाजूने खानाला पाण्यापासून तोडले आणि दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला चढवला. त्यानंतर झालेल्या तुंबळ लढाईत खानाला मराठ्यांनी धूळ चारली.पाण्याशिवाय आणि मराठी सैन्याच्या हल्ल्याने कासावीस झालेल्या खानाला शरणागती पत्करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही. त्याने प्रतापरावांकडे गयावया करीत अभयदान मागितले प्रतापरावांचे मन द्रवले.खानाला असा हिसका दाखवल्यानंतर तो पुन्हा फिरून येणार नाही अशी खात्री त्यांना वाटली आणि त्यांनी प्रार्थनेचा स्वीकार करून खानाला अभय दिले. इतकेच नाही तर त्याला कैद न करता, मुक्काम हलवण्यास वाट करून दिली.या लढाईची बातमी महाराजांना कळल्यावर ते साहजिकच चिडले. महाराजांच्या स्पष्ट आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परतून येईल अशी शंका त्यांना होतीच.त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून सला काय निमित्य केला? असा जाब विचारला. तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले.महाराजांच्या अंदाजाप्रमाणेच बहलोलने हल्ले पुन्हा सुरू केले. शिवराज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली होती. यांत होणारे बहलोलखानाचे हल्ले महाराजांना पचण्यासारखे नव्हते.
त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले, हा बहलोल वरचेवरी येतो. यांसी गर्दीस मेळवून फत्ते करणे.अन्यथा आम्हांस तोंड न दाखवणे.
महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. महाराजांचे लष्कर प्रतापरावांच्या मदतीला पोहोचलेले नव्हते. प्रतापराव या सुमारास गडहिंग्लज परिसरात होते. खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही खबर त्यांना लागलीआणि हाताशी असणाऱ्या सहा शिलेदारांसह ते खानावर चालून गेले.
पंधरा हजार सैन्यावर हल्ला करण्यासाठी ज्यात होते, विसाजी बल्लाळ, दिपाजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोटजी, आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुजरत्यातल्या एकाचेही पाय डगमगले नाहीत.पराकोटीची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापोठी या सात वीरांनी स्वत:स मरणाच्या हवाली केले. ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतीव दु:ख झाले. या सात वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले.तसेच राजारामांचा विवाह प्रतापरावांची एक कन्या जानकीबाईंशी लावला.
No comments:
Post a Comment