Thursday, 7 April 2022

 बाईक टॅक्सी या अवैधरित्या प्रवासी वाहतूक देणाऱ्या वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करू नये.

            मुंबई, दि 6 : प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बाईक टॅक्सी व अवैधरित्या प्रवासी वाहतूक देणाऱ्या दुचाकी वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करू नये,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,मुंबई (पश्चिम) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

            राज्यातील रिक्षा संघटना, नागरीक तसेच विविध माध्यमांतून “बाईक टॅक्सी" संदर्भात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे राज्यात खाजगी दुचाकीचा बेकायदेशीर वापर काही संस्था अॅप आधारीत प्रणालीमधून करीत असल्याचे निदर्शनास आले आहे व त्याठिकाणी संबंधीत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई केलेली आहे.

            महाराष्ट्र राज्य शासनाने अथवा राज्य परिवहन प्राधिकरणाने “बाईक टॅक्सी" अशा प्रकारचा कोणताही परवाना कोणालाही अद्याप जारी केलेला नाही. नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, प्रवाशांची फसवणूक होऊ नये व तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बाईक टॅक्सी व अवैधरित्या प्रवासी वाहतूक देणाऱ्या दुचाकी वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करू नये. तसेच अशा अॅपचा वापर करू नये. अशा वाहनांचा वापर मोटार वाहन कायद्याप्रमाणे बेकायदेशीर असून अशा वाहनांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,मुंबई (पश्चिम) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे

0000



 

 राज्यातील बलुतेदार संस्थांच्या सक्षमीकरणासाठी शासन सकारात्मक.

- बाळासाहेब पाटील.

          मुंबई दि 6 : राज्यातील बलुतेदार संस्थांच्या अडचणी सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असून या संस्थांच्या सक्षमीकरणासाठी मदत करण्यात येईल, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

          महाराष्ट्र राज्य बलुतेदार ग्रामीण कारागीर सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करण्यासंदर्भात सहकार व पणन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे,महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा, मेधा वाफे, श्री.हिरमुखे उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगांवकर, सहकार विभागाचे उपसचिव श्री.अंबिलपुरे संघर्ष समितीचे शिवाजी आदमाने,हनुमंत सुतार,सचिव काळूराम सपकाळ, जत तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन सुरेश व्हनखंडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

          बलुतेदार संस्थांमध्ये सचिवांची संख्या कमी आहे या सचिवांच्या नेमणूका लवकरच करण्यात येतील. परंतु सचिवांच्या नेमणुका होत नाहीत म्हणून कामकाज बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे कामकाज लवकर सुरू करावे अशा सूचनाही सहकार मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

          दि.31 मार्च 2008 अखेर संस्थांना थकीत कर्जमाफीसाठी सभासदांना कर्जमाफीची रक्कम मंजूर केली परंतु बँकांना रक्कम सन 2016 मध्ये मिळाली. त्यामुळे बँकांनी 2008 ते 2016 पर्यत व्याज आकारणी केली आहे. यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून सन 2008 ते 2016 पर्यंतची व्याज आकारणी संदर्भात सहकार आयुक्त यांनी माहिती घेऊन अहवाल सादर करावा असे निर्देशही सहकार मंत्री श्री.पाटील यांनी दिले.

          000







 महाराष्ट्रासाठी आवंटनाप्रमाणे खते उपलब्ध व्हावी

 कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

            मुंबई, दि 6 : खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते वेळेवर उपलब्ध होण्यासाठी व प्रधानमंत्री पीक वीमा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी मंत्रालय येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

            कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते वेळेवर उपलब्ध होण्यासाठी व प्रधानमंत्री पीक वीमा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची नवी दिल्लीत भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, रक्षाताई खडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, उपस्थित होते.  

            खरीप हंगामासाठी शेतक-यांना पीककर्ज वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी बॅकांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. खते आणि बियाणांचा काळा बाजार करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, खरीप हंगामाचे क्षेत्र 1 कोटी 45 लक्ष हेक्टर आहे. खरीप हंगामात सोयाबीन व कापूस पिकाचे 85 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी पेरणीच्या वेळीच खते द्यावी लागतात. येत्या खरीप हंगाम 2022 साठी एकूण 52 लक्ष मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये युरिया, डिएपी, एसओपी,NPK, SSP यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने 45 लक्ष मेट्रिक टन आवंटन मंजूर केले आहे. मंजूर आवंटन वाढवावे व आवंटनानुसार प्रामुख्याने एप्रिल, मे, जून मध्ये खते उपलब्ध व्हावे अशी विनंती 

करण्यात आली आहे. खतांची कमतरता भासणार नसून महाराष्ट्राच्या आवंटनाप्रमाणे खते उपलब्ध करुन दिली जातील असे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले असल्याचेही कृषीमंत्री श्री .भुसे यांनी सांगितले.

            पिक विमा कंपन्यांसाठी नफा व तोटा यामध्ये संतुलन राखणारे बीड मॉडेल (80 :110) प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. येत्या खरीप हंगामात ते राबविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. सन 2020-21 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, परंतु कोविड काळात शेतकरी विमा कंपन्यांना पूर्वसुचना देवू शकले नाहीत. NDRF अंतर्गत शासनाने शेतकऱ्यांना मदत केली. ते पंचनामे गृहित धरुन खरीप 2020 मधील नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत विनंती करण्यात आली असल्याचेही कृषीमंत्री श्री .भुसे यांनी सांगितले.

            एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत कांदाचाळी, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज इ. बाबींचा लाभ देण्यात येतो. या बाबींचे मापदंड 2014 मध्ये निश्चित झाले आहेत. सध्या सर्वत्र कच्च्या मालाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचा कांदाचाळी, वेअरहाऊस, कोल्डस्टोरेज इत्यादी उभारण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे याचे मापदंड वाढविण्यासाठी केंद्रीय कृषि मंत्री यांना विनंती करण्यात आली असल्याचे श्री .भुसे यांनी सांगितले.

            कृषीमंत्री श्री दादाजी भुसे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये फळबागा मोठया प्रमाणात आहेत. फळांना चांगला भाव मिळण्यासाठी हंगामापूर्वी व किंवा नंतर फळांचे उत्पादन घेणे, फळांचा दर्जा वाढविणे, उत्पादन वाढविणे, नैसर्गिक संकटापासून फळांचे संरक्षण करणे यासाठी शेतकऱ्यांकडून प्लॅस्टिक कव्हर व नेट (जाळी) साठी अनुदान मिळण्यासाठी मागणी होत आहे. द्राक्ष, डाळींब व इतर फळबागांसाठी शेतकरी याचा वापर करतात ही बाब खर्चिक आहे. काही प्रयोगशील निवडक शेतकरी या बाबींचा अवलंब करतात व त्याचा चांगला उपयोग होतो. या बाबींचा वापर वाढावा व शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी प्लॅस्टिक कव्हर व नेट (जाळी) यांचा समावेश एकात्मिक फलोत्पादन अभियानामध्ये करण्याबाबतही केंद्रीय कृषि मंत्री यांना विनंती करण्यात आली असल्याचे कृषीमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

            बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत कांदा खरेदी तत्काळ सुरु करावी, यासाठी महाराष्ट्राला कोटा वाढवून द्यावा व कांद्याची निर्यात वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे अशी विनंती करण्यात आली असल्याचे कृषीमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले

            राज्यामध्ये डाळींब व केळी पिकाचे मोठे क्षेत्र आहे. सद्यस्थितीत डाळींबावरील खोडकीड व केळीवरील करपा या रोगाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे पिके धोक्यात येत आहेत. या रोगांच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत जादाचा निधी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती करण्यात आली असल्याचे कृषीमंत्री श्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

-----०००-----


 


 





  🎈 *समाधानाची व्याख्या* 🎈

बंद पडलेली कार रस्त्यावर लावून, मी बस मधे चढलो तर खरं. पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली .पुढचा एक जण सहज तेथे बसू शकत होता ....

पण त्याने ती सीट मला दिली.  

पूढच्या stop. वर पुन्हा तेच घडले. पुन्हा आपली सीट त्याने दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा घडला.बर हा माणूस अगदी सामान्य दिसत होता, म्हणजे कुठे तरी मजदूरी करून घरी परत जात असावा ,आता शेवटच्या stop. वर आम्ही सर्वच उतरलो. 

तेंव्हा उत्सुकता म्हणून मी त्याच्याशी बोललो. विचारले की प्रत्त्येक वेळी तुम्ही तुमची सीट दुसऱ्या ला का देत होता ?? तेंव्हा त्याने दिलेले उत्तर हे असे •••••

*मी शिकलेला नाही हो. अशिक्षित आहे मी .एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो . आणि ,पण माझ्या जवळ कोणाला द्यायला काहीच नाही. ज्ञान नाही , पैसा नाही.*

 *तेंव्हा मी हे अस रोजच करतो. हेच मी सहज‌ करू शकतो.*  

दिवसभर काम केल्यानंतर ‌ अजून थोड्या वेळ उभं राहणं मला जमत.

  मी तुम्हाला माझी जागा दिली. तुम्ही मला धन्यवाद म्हणाला ना त्यात मला खूप समाधान मिळाले मी कोणाच्या तरी कामी आलो ना त्याचे .•••कोणाला कायतरी दिल्याच. असं मी रोज करतो *••.माझा नियमच झाला आहे•••* आणि रोज मी आनंदाने घरी जातो.•••उत्तर ऐकून मी थक्कच झालो. त्याचे विचार. व समज बघून याला  

अशिक्षित म्हणायचे का? 

काय समजायचे ?

 कोणाकरिता काही तरी करायची त्याची इच्छा ,

••••ती पण स्वतः ची परिस्थिती अशी असताना . *•••मी कशा रीतीने मदत करू शकतो??*

त्यावर शोधलेला उपाय बघून देव सुध्दा आपल्या या निर्मीती वर खुष असेल 

.माझ्या सर्वोत्तम कलाकृती पैकी ही एक कलाकृती . 

असं दिमाखात सांगत असेल .••••••

        त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या स्वतः ला हुषार शिक्षित समजणारा मी त्याच्या समोर खाली मान घालून स्वतः चे परिक्षण करू लागलो. *किती सहज त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली.* देव त्याला नक्कीच पावला असणार..

मदत ही खूप महाग गोष्ट आहे कारण मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात .•••••

सुंदर कपडे ,हातात पर्स , मोबाईल , डोळ्यांवर गॉगल, चार इंग्लिश चे शब्द येणे म्हणजेच सुशिक्षत का ? हीच माणसाची खरी ओळख का ?

 मोठं घर ,मोठी कार , म्हणजे मिळालेले समाधान का ?? 

 कोण तुम्हाला केंव्हा काय शिकवून जाईल????? व तुमची धुंदी उतरवेलं सांगता येत नाही .•••

   या माणसाच्या संगतीने माझे विचार स्वच्छ झाले. 

   म्हणतात ना •••

    *" कर्म से पहचान होती है इंसानों की ।*

     *वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में "।*

🙏🙏🙏🙏🙏🙏

: देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना, तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात . माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातुनच खरा कळतो.

         चांगले कर्म , चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी एक वेळेस चालेलं . पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही .

        आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत, हे फक्त दोघानांच माहीत असते ..एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा ! त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका , एक "मनाचं बालपण " आणि दुसरे "अंतःकरणातील देवपण "! हे *संपलं कि माणूस संपला !*

Wednesday, 6 April 2022

 मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा आढावा

डेब्रिज काढण्याची आणि नालेसफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

            मुंबई, दि. 6 : येत्या पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती उद्भवणार नाही, यासाठी महानगरातील सर्व राडारोडा (डेब्रिज) काढण्याची कामे आणि नालेसफाईची कामे संबंधित यंत्रणांनी 31 मे 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

            मुंबई महानगरातील पावसाळापूर्व कामांचा विशेषतः राडारोडा (डेब्रिज) व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी आज बैठक घेण्यात आली. बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त श्रीनिवासन, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मुंबई मंडळाचे महाव्यवस्थापक शलभ गोयल, पश्चिम रेल्वेचे जीव्हीएल सत्यकुमार, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्यासह महानगरपालिका, एमएमआरडीए, पोलीस, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मुंबई महानगरात पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एमएमआरडीए, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पोलीस या विविध विभागांनी कामांना गती द्यावी. मुंबई महानगरात राडारोडा (डेब्रिज) तयार होण्याच्या 450 जागा असून 31 मे पर्यंत हे डेब्रिज साफ करण्याची कार्यवाही एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिकेने करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या. कांदिवली भागात मेट्रोची जी कामे सुरु आहेत, त्याठिकाणी अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यात यावी. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गामधील 47 कल्व्हर्ट तसेच मुंबई महानगरातील रेल्वे ट्रॅकवरील 40 कल्व्हर्ट स्वच्छ करुन घेण्याची कार्यवाही युद्धपातळीवर पूर्ण करुन घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनाला दिले. डास, मच्छरांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यावर विशेष भर द्यावा, असे सांगून ज्या भागांमध्ये मेट्रोसह इतर सार्वजनिक कामे सुरु असतील त्या भागात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेऊन डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी संबंधित कंत्राटदारांना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले. संभाव्य वादळ, अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता उंच इमारतींवर बांधकामासाठी लावण्यात आलेल्या क्रेन्समुळे दुर्घटना घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी संबंधित विकासकांना सूचना द्याव्यात असे सांगून अतिवृष्टीच्या काळात किनारपट्टी भाग, कोळीवाड्यातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास त्यासाठी अगोदरच सुविधा उपलब्ध करुन ठेवण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

            मुंबईत पावसाळापूर्व कामांसाठी विविध विभागांनी केलेल्या नियोजनाचे आणि सुरु असलेल्या कामांचे महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी सादरीकरण केले.

००००




Featured post

Lakshvedhi