संपूर्ण निवडणूक कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा व अधिकारी-कर्मचारी, कामगार अहोरात्र कार्यरत होते. यासोबतच मुंबई पोलीस दलातील सुमारे ३० हजार अधिकारी व अंमलदार प्रत्यक्ष बंदोबस्तात कार्यरत होते. तसेच केंद्र शासन, राज्य शासन, विविध प्राधिकरणे, बँका आणि निमशासकीय संस्थांमधील अधिकारी-कर्मचारी यांनीही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान दिले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकारी व कर्मचारी, कामगार यांनी आपली जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडली.
मतदान प्रक्रियेत सहभागी झालेले निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांनी दाखविलेल्या शिस्तबद्ध व समर्पित कामगिरीबाबत महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे. सर्व संबंधित यंत्रणांमधील समन्वयामुळे मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली, असे त्यांनी नमूद केले.
लोकशाहीचा हा महत्त्वाचा उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्व घटकांनी दाखविलेल्या जबाबदारीमुळेच निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह व प्रभावी ठरली आहे. भविष्यातही प्रशासकीय कामकाजात सर्वच घटकांचे अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षित असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment