राष्ट्र प्रथम’अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यापक उपक्रम;
शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व जीवन कौशल्य यावर भर
-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
मुंबई, दि. 27 : 'राष्ट्र प्रथम' या संकल्पनेतून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षण, मूलभूत सैनिकी प्रशिक्षण, प्रबोधन, योग प्रशिक्षण आणि आरोग्य समुपदेशन हे पाच उपक्रम ‘आनंददायी शनिवार’ मध्ये विविध तासिकांमधून राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
'राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण आणि जीवन कौशल्य' मिशन संदर्भात मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, एनसीसी राज्य समन्वयक अधिकारी संतोष धाम आणि भोसले, ग्रँड मास्टर शिफूजी भारद्वाज, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रतिनिधी राहुल पाटील, समाज प्रबोधनकार अक्षय महाराज भोसले आणि सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे उमेश महाराज बागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, केवळ पुस्तकी ज्ञान न देता, येणारी पिढी शारीरिकदृष्ट्या सुदृढ, मानसिकदृष्ट्या सक्षम आणि संस्कारांनी समृद्ध असावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे अभियान राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवण्यात येणार असून यामुळे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाला एक नवी दिशा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेअंतर्गत हे अभियान राबविले जाणार आहे.
No comments:
Post a Comment