कनेक्टिव्हिटीवर भर
नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाची वेळ आठ तासांवर येणार असून या महामार्गामुळे मराठावाड्याचे चित्र पालटणार आहे. तसेच नवीन प्रस्तावित मुंबई-कल्याण-लातूर जन कल्याण द्रुतगती महामार्ग जाहीर करण्यात आला आहे. यामुळे लातूर ते मुंबई प्रवास केवळ 4.5 तासांवर येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात मेट्रो आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यात आली असून सध्या मुंबईत ९१ किलोमीटर लांबीची मेट्रो सेवा कार्यरत आहे. या मार्गांवरून दररोज सुमारे ९ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. पुढील दोन वर्षांत या कार्यरत लांबीमध्ये आणखी १३२ किलोमीटरची भर पडणार असून पुण्यात ३३ किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू असून त्याचा लाभ दररोज २.२३ लाख प्रवासी घेत आहेत. पुण्यात आणखी ४५ किलोमीटरचे काम प्रगतीपथावर असून त्यातील २७ किलोमीटर पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नागपूरमध्ये ४० किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण झाला असून रोज १.१० लाख प्रवासी त्याचा वापर करत आहेत, तर ४३ किलोमीटरचा नवा टप्पा पुढील दोन वर्षांत पूर्ण केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment