डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत..
मुंबई, दि. 20 : या वर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मिरा-भाईंदरवासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असणार आहे. तब्बल 14 वर्षाच्या पाठपुराव्याला यश येत असून मिरा-भाईंदरवासियांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाचा पाहणी दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या सोबत ‘महामेट्रो’ चे अधीक्षक अभियंता व त्यांची तंत्रज्ञ सल्लागार कंत्राटदार टीम उपस्थित होती.
मंत्री सरनाईक म्हणाले की, सन 2009 मध्ये जेव्हा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, त्यावेळी येथील नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. गेल्या 14 वर्षांमध्ये सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येताना दिसत आहे. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशीमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरीपर्यंत जाऊ शकतील. तसेच एअरपोर्ट टी-1 स्थानक वरून मेट्रो 3 चा वापर करून थेट कुलाब्यापर्यंत देखील जाऊ शकतील.
त्याचबरोबर, नवीन वर्षात मिरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध असणार आहे.
No comments:
Post a Comment