या खेळाडूंनी भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले असून तिरंग्याचा सन्मान वाढवला आहे, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. अंतिम सामन्यात निर्णायक विजय मिळवत भारतीय मुलींनी दृष्टिबाधित क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिद्ध केले. या विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण असून इतिहासात दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेटचे पहिले चॅम्पियन म्हणून भारताचे नाव कोरले गेले आहे. इतिहासात या विजयाची नोंद होईल. या यशामागे खेळाडूंनी घेतलेले अपार कष्ट, सातत्यपूर्ण सराव आणि अनेक अडचणींवर मात करण्याची जिद्द आहे. प्रत्येक खेळाडूची स्वतःची संघर्षकथा असून प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता त्यांनी सराव सुरू ठेवला. “कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती” हे वाक्य या संघाने प्रत्यक्षात उतरवले आहे.
संघाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. तसेच खेळाडूंना सरावासाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी मैदान व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत क्रीडा आयुक्तांमार्फत चर्चा करून योग्य कार्यवाही केली जाईल. कोणतीही आर्थिक किंवा कौटुंबिक अडचण खेळातील प्रगतीस अडथळा ठरू नये, यासाठी लागेल ती मदत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment