इंडिया मेरीटाईम वीकसाठी केंद्राने मुंबईत कायमचे केंद्र उभारावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ चे आयोजन
मुंबई, दि. १४ : भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंडिया मेरीटाइम वीक २०२५’ या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने मुंबई येथे कायमचे केंद्र उभारावे. महाराष्ट्र या केंद्राचा जागतिक स्तरावर विकास करण्याबरोबर इंडिया मेरीटाईम वीक ही थीम जागतिक स्तरावर निर्माण करेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केला. मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ च्या आयोजनाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, उपमुख्यमंत्री अजित पवार, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान नेस्को एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे इंडिया मेरीटाईम वीक २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. तर केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
मुंबईमध्ये आर्थिक विकासाच्या मोठ्या संधी असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या विकासात महाराष्ट्राचा वाटा नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. इंडिया मेरीटाईम वीक २०२५ च्या निमित्ताने देशासह राज्याच्या सागरी विकासात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. सागरी गुंतवणुकीसाठी राज्यात पोषक वातावरण असून या ‘मेरीटाईम वीक’ मुळे त्यास आणखी चालना मिळेल. जागतिक सागरी क्षेत्रामध्ये देश आणि महाराष्ट्र एक नवी ओळख निर्माण करत आहे. जहाजबांधणी धोरणामुळे राज्यात या क्षेत्रात नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशाच्या सागरी क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्र नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल. महाराष्ट्र सागरी क्षेत्रात एक नवा अध्याय लिहित आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॅरिटीने क्षमतावाढ केली आहे. तर नवीन वाढवण बंदरामुळे विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.
No comments:
Post a Comment