पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला
पूरग्रस्त भागातील पशुधन हानीचा व सुरक्षिततेचा आढावा
· पूरग्रस्त भागात फिरती पशुवैद्यकीय पथके सक्रिय ठेवून तत्काळ सेवा द्या
· जनावरांना औषधे व लसींसाठी प्राधान्य द्यावे
· साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी निर्जंतुकीकरणावर भर द्या
मुंबई, दि. 26 : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पशुधनाच्या झालेल्या हानीचा व त्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज आढावा घेतला. अतिवृष्टी व पुरामुळे मृत जनावरांच्या मालकांना योग्य ती शासकीय मदत मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने महसूल विभागाशी समन्वय साधावा, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. तसेच अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात जनावरांसाठी फिरती पशुवैद्यकीय पथके सक्रिय करून तत्काळ सेवा उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. घराबरोबरच जनावरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन पशुसंवर्धन विभागाला महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव रामास्वामी एन, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे उपस्थित होते. तसेच पूरग्रस्त भागातील प्रादेशिक सह आयुक्त, उपायुक्त हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
या आढावा बैठकीत बाधित भागातील जनावरांचे संरक्षण, मृत जनावरांची नोंद, तसेच आवश्यक मदत पुरवण्याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
No comments:
Post a Comment