कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी
कालमर्यादेत सर्वेक्षण करा
- मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. 20 :- कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेतला. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची कामे निविदेत दिलेल्या कालमर्यादेत करावीत, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे, जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेला महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्प (एमआरडीपी) मदत व पुनर्वसन विभागाकडून जलसंपदा विभागातील कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे हस्तांतरित करणे आणि पवना धरण पर्यटन सादरीकरण संदर्भात जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा 'मित्रा' चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, या प्रकल्पातील कामांचेही सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) जलदगतीने करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. सर्वेक्षणाचे काम गतीने झाल्यास पुढील कामांची निविदा प्रक्रिया राबविणे सुलभ व सोयीस्कर होणार आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून अधिकचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.
No comments:
Post a Comment