मना-मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज शांत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. २६ :- रसिकांच्या मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज आज शांत झाला, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘चिठ्ठी आयी है..चिठ्ठी आयी…” या सदाबहार गझलच्या माध्यमातून पंकजजींनी रसिकांच्या मनांचा ठाव घेत, गझल गायनाच्या क्षेत्रात अधिराज्य गाजवले. गझलांमधील तरल भावनांना सुरेल आवाज देणारा हा कलावंत तितकाच विनम्र होता. त्यांच्या जाण्यामुळे भारतीय गझल गायकीला घरा-घरात आणि मना-मनात पोहचवणारा आवाज शांत झाला आहे. ते स्वररुपात अजरामर राहतील. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्र एका ज्येष्ठ मार्गदर्शकालाही मुकले आहे, असे शोकसंदेशात नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
०००००
वृत्त क्र. 760
रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला
ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली
मुंबई, दि. 26 : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. हृदयात थेट पोहचणारी अशी त्यांची गायकी होती, त्यांच्या निधनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, पंकज उधास यांनी अनेक चित्रपटांसाठी विविध प्रकारची गाणी गायली. त्यांनी गायिलेल्या गजलांनी तीन पिढ्यांच्या हृदयावर राज्य केले. आजही ‘चिठ्ठी आयी है’ हे गाणं लागतं तेव्हा मन कातर होतं. त्यांची गाण्याची वेगळी शैली होती. मैफीलीत त्यांचे गाणे अधिक खुलून यायचे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असून कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
००००
No comments:
Post a Comment