तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट,
योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी
-सचिव सुमंत भांगे
मुंबई ,दि.१३: राज्यातील तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट असून त्यासाठी लोकाभिमुख प्रशासन राबवून योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यात "सामाजिक न्याय पर्व" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज दि १३ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री.भांगे यांनी राज्यातील समाज कल्याण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला त्याप्रसंगी बोलत होते.
समाजाप्रती चांगलं कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर आहे. येणाऱ्या काळात "खात्याची ओळख", "रयतेचा दरबार" यासारखे अभिनव उपक्रम राज्यातील जनतेसाठी विभागाच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी श्री भांगे यांनी सांगितले. तसेच विभागात अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त असलेली पदे लक्षात घेता लवकरात लवकर भरती प्रक्रिया होण्यासाठी विभागाच्या आकृतीबंधास शासन मान्यता घेणेबाबतचे निर्देश त्यांनी समाज कल्याण आयुक्त यांना यावेळी दिलेत.
यावेळी राज्याचे समाज कल्याण आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सामाजिक न्याय पर्वा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुण्याचे सुनिल वारे, सहसचिव दिनेश डिंगळे, लीडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये, सामाजिक न्याय विभागअंतर्गत विविध महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक, आयुक्तालयातील सर्व उपायुक्त, सर्व प्रादेशिक उपायुक्त उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद उपस्थित होते. राज्यात राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांचा लेखाजोखा यावेळी क्षेत्रिय अधिकारी यांनी सादर केला.
००००
वृत्त क्र. 1274
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशासन,
लोककल्याणकारी विचारांवर वाटचाल
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जयंतीच्या पूर्वसंध्येला दिल्या जनतेला शुभेच्छा
मुंबई, दि. १३:- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशासन, लोककल्याणकारी विचारांना आदर्श मानून वाटचाल करत राहू. यातून राज्याच्या विकासाचा मार्ग आणखी प्रशस्त करू, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या बळावर आज आपला देश जगात एक सशक्त लोकशाही म्हणून उभा आहे. यामुळे आपला देश आणि महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य म्हणून काम करत आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या वंचितांच्या कल्याणाचा, समानतेचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून काम करत आहोत. समाजातील सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विविध संस्था काम करत आहेत. या विभागाच्या योजनांकरिता भरीव निधीची तरतूद देखील केली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुशासनाचे आणि कल्याणकारी राज्याचे समाधान नागरिकांना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून बाबासाहेबांच्या विचाराने आम्ही वाटचाल करत राहू, याची ग्वाही देखील देतो.
00000
वृत्त क्र. 1273
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जागर करा
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १३ : स्वातंत्र्य, समता, बंधुता या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारांचा जागर हीच त्यांना खरी आदरांजली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करीत राज्यातील जनतेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, नवभारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अमूल्य आहे. राज्य घटनेचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, हा त्यांचा दृष्टीकोन ठेवूनच राज्य सरकार काम करत आहे. बाबासाहेबांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, तसा संकल्प या जयंतीदिनी आपण करू, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
००००
No comments:
Post a Comment