पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या
श्रीधर चामरे यांच्या कुटुंबियांस राज्य सरकारकडून 5 लाखांचे सहाय्य
- मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती
मुंबई, दि. 9 : भारत-पाकिस्तान हद्दीजवळ मच्छिमार नौकेतून मासेमारी करीत असताना पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीकडून झालेल्या गोळीबारात मृत पावलेल्या श्रीधर चामरे (रा. वडराई जि. पालघर) यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
गुजरात राज्यातील ओखा (जि. वेरावळ) येथील ‘जलपरी-४’ ही मच्छिमार नौका ७ खलाशांसह २५ ऑक्टोबर रोजी ओखा येथे मासेमारीसाठी गेली होती. भारत-पाकिस्तान हद्दीनजिक मासेमारी करीत असताना दि. ६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीकडून झालेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई येथील श्रीधर रमेश चामरे हे मृत पावले तर अन्य एक खलाशी जखमी झाला. या घटनेत मृत पावलेल्या श्रीधर चामरे यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करुन त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. दरम्यान, ठाणे- पालघरच्या सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी श्रीधर चामरे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.
००००
जवाहर बालभवनच्या नूतनीकरणाच्या कामास
तातडीने तांत्रिक मान्यता द्यावी
- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश
मुंबई, दि. 9 : मुंबईतील जवाहर बाल भवन इमारत जीर्ण झाली असून त्याचे नूतनीकरण आणि मजबुतीकरण करणे गरजेचे आहे. यासंबंधी कामाच्या अंदाजपत्रकास तातडीने तांत्रिक मान्यता देऊन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मागील काही वर्षांपासून बाल भवनची इमारत जीर्ण झाली असून त्याचे तातडीने मजबुतीकरण आणि नूतनीकरण करणे गरजेचे असल्याने शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बाल भवन इमारतीचे उद्घाटन झाले होते. गेली 50 वर्षे विद्यार्थी आणि लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, करमणूक साधने, ग्रंथालय आदी माध्यमातून ही इमारत उपयोगी सिद्ध झाली आहे. येथे चित्रकलेसह विविध स्पर्धाही आयोजित केल्या जातात. या ऐतिहासिक इमारतीचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने या इमारतीच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
००००
No comments:
Post a Comment