पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई, दि. 17 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधानांना निरोगी, दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वसमावेशक विकास घडो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, भारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान होण्याचं भाग्य आपल्याला दोनदा लाभलं आहे. स्वतंत्र भारतात जन्म झालेले आपण देशाचे पहिले पंतप्रधान आहात. पंतप्रधानपदी झालेली फेरनिवड ही देशवासियांच्या विश्वासाचं, अपेक्षांचं प्रतिक आहे. देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करुन त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचं बळ आपणास मिळो. पंतप्रधान म्हणून आपल्या नेतृत्वाखाली देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व, संविधान, लोकशाही व्यवस्था अबाधित राहो. देशातील महागाई, बेरोजगारी, कोरोनासह आर्थिक, सामाजिक संकटांवर यशस्वीपणे मात करुन देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात आपणास यश मिळो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्याही पंतप्रधान म्हणून आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्तता होईल. महाराष्ट्राला तसेच समस्त देशवासियांना समान न्याय, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याचं काम आपल्याकडून होईल, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे.
000
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्राच्या भूमीत विज्ञानवादी, सुधारणावादी विचार रुजवणारे क्रांतिकारी नेते, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आघाडीचं नेतृत्वं स्वर्गीय केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन केलं आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे हे सुधारणावादी विचारांचे कृतीशील नेते होते. समाजातील वाईट रुढी, परंपरा, जातीव्यवस्था, अस्पृश्यतेवर त्यांनी प्रहार केला. बालविवाह, केशवपन, हुंडाप्रथेसारख्या रुढींविरुद्ध प्रखर लढा दिला. ते खऱ्या अर्थानं ‘प्रबोधन’कार होते. लेखक, पत्रकार, इतिहास संशोधक म्हणूनही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील आघाडीचं नेतृत्वं म्हणून त्यांचं योगदान खुप मोठं आहे. त्यासाठी ते महाराष्ट्राला नेहमीच आदरणीय राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली.
०००
मराठवाडा मुक्ती संग्रामातील’ वीरांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिना’निमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 17 :- ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ हा मराठवाड्याच्या त्यागाचा, शौर्याचा, संघर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. स्वामी रामानंदतीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं महत्वं देशाच्या स्वातंत्र्यलढ्याइतकंच आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या, त्याग केलेल्या वीर सुपुत्रांचा देश नेहमीच ऋणी राहील. मी त्यांना वंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांचे स्मरण करुन राज्यातील जनतेला मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘मराठवाडा मुक्ती संग्रामदिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यासह राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या मराठवाड्यातील नागरिकांबद्दल, स्वातंत्र्यसैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मराठवाड्याचा इतिहास संघर्षाचा राहिला आहे. हा संघर्षाचा वारसा कायम ठेवून भविष्यकाळात मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून आपण सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेला केलं आहे.
००००
No comments:
Post a Comment