Friday, 23 June 2023

रास्त भाव दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बॅंका, पोस्ट,खासगी बँकाच्या सेवाही उपलब्ध करणार

 रास्त भाव दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बॅंका, पोस्ट,खासगी बँकाच्या सेवाही उपलब्ध करणार


- अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण


            मुंबई, दि. २२ : राज्यातील रास्त भाव दुकानांमधून नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, टपाल विभाग, संचार मंत्रालय, भारत सरकार व रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कायद्यानुसार सूचीबद्ध खासगी बँकांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यामध्ये सुमारे ५३ हजार पेक्षा अधिक रास्त भाव दुकाने असून त्याचा फायदा शहरासह ग्रामीण भागातील जनतेला होणार असल्याचेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.


            दि. १ सप्टेंबर, २०१८ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात सुलभ, परवडणारी, आणि विश्वासार्ह बॅंक बनविण्याच्या दृष्ट‍िकोनातून इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकची सुरुवात केली. धन हस्तांतरण, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), बिल भऱणा, आरटीजीएस आदी सुविधा या बॅंकेतर्फे देण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर रास्त भाव दुकानांमध्ये बँकामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच या माध्यमातून रास्त भाव दुकानदारांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रास्त भाव दुकानदारांमध्ये जागरुकता निर्माण करुन जेथे शक्य असेल तेथे बँकेच्या सेवा सुरु करण्यात येणार आहे.


            शिधावाटप /रास्त भाव दुकानदारांना ऐच्छिकरित्या बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार आहे. रास्त भाव दुकानदारांच्या उत्पन्न वाढीसाठी तसेच शहरासोबत ग्रामीण भागातील नागरिकांनाही या उपक्रमातुन लाभ होणार आहे.


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या संकल्पनेतून दि. 9 डिसेंबर, 2020 रोजी देशातील नागरिकांसाठी सुरु केलेल्या ‘पीएम-वाणी’ या उपक्रमाची राज्यातील शिधावाटप/रास्त भाव दुकानांमधून अंमलबजावणी करण्यास दि.११ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरुवात करण्यात आली आहे. पीएम-वाणी उपक्रमाच्या माध्यमातून रास्त भाव दुकानापासून 150 ते २०० मीटरच्या परिघात येणाऱ्या सर्व जनतेला रास्त दरात वाय-फाय सुविधेचा लाभ मिळणार आहे.


            तसेच बॅंकिंगच्या या सुविधा प्रत्यक्ष दुकानांमध्ये सुरु करण्यापूर्वी या सुविधेच्या वापराबाबत रास्त भाव दुकानदारांना संबंधित बॅंकेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित बँकेमार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी, सुविधा व समन्वयासाठी राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगित

ले.


महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार

 महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार


राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान


नवी दिल्ली, 22 : आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थवृत्तीने सेवा देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी सन 2022 आणि सन 2023 च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात सन 2022 मध्ये महाराष्ट्रातील 1 आणि सन 2023 मध्ये 2 परिचारिकांचा समावेश आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस.पी.सिंग बघेल, विभागाचे सचिव राजेश भुषण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, आरोग्य क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते.


यावेळी वर्ष 2022 मध्ये 15 आणि वर्ष 2023 मध्ये 15 असे एकूण 30 परिचारिका आणि परिचारक यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. वर्ष 2022 साठी मिळालेल्या पुरस्कारांमध्ये पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, निर्मल उपकेंद्र, भुईगांव येथील सहायक परिचारिका (दाई) सुजाता पीटर तुस्कानो, वर्ष 2023 साठी मिळालेल्या पुरस्कारांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालयाच्या सार्वजनिक आरोग्य परिचारिका पुष्पा श्रावण पोडे आणि दक्षिण कमांड (वैद्यकीय ) मुख्यालय पुण्याच्या ब्रिगेडियर एम.एन.एस.अमिता देवरानी यांचा समावेश आहे.


सुजाता पीटर तुस्कानो यांचा सहायक परिचारिका (एएनएम) म्हणून 35 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी निमवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत अनेकांना आरोग्य सेवा प्रदान केलेली आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील आरोग्यविषयक कार्यशाळेत त्या नेहमीच सहभागी होतात. व्यापक समाजकार्यासाठी यापूर्वी तुस्कानो यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.


पुष्पा श्रावण पोडे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हा रूग्णालयात सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणून मागील 21 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्या त्यांच्या कामाप्रती अत्यंत वचनबद्ध व मेहनती परिचारिका आहेत. पोडे यांनी लक्ष्यपूर्तीसाठी सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांनी दिलेल्या आरोग्य सेवेतील लक्षणीय योगदानाबद्दल त्यांना स्थानिक पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.


ब्रिगेडियर अमिता देवरानी, सध्या पुणे येथे दक्षिण कमांड (वैद्यकीय)च्या मुख्यालयात ब्रिगेडियर एम. एन. एस. म्हणून कार्यरत आहेत. ब्रिगेडियर देवरानी यांनी 37 वर्ष लष्करात परिचारिका म्हणून सेवा बजावली आहे. त्या उत्तम शिक्षक आणि प्रशासक आहेत. लष्कराच्या दक्षिण कमांड अंतर्गत येणाऱ्या भूदल, नौदल आणि हवाई दलाच्या 50 रूग्णालयांचे कामकाज त्या पाहतात. कोविड-19 संकटकाळात त्यांनी केलेले काम प्रशंसनीय आहे. आरोग्य क्षेत्राशी संबधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. काँगो रिपब्लिक या देशात संयुक्त राष्ट्राने राबविलेल्या मोहिमेत संकटग्रस्त परिस्थितीत मृतदेहांचा शोध आणि व्यवस्थापन यासाठी बजावलेल्या कामगिरीबद्दल संयुक्त राष्ट्राने त्यांचे विशेष कौतुक केलेले आहे. ब्रिगेडियर देवरानी यांना लष्करी शुश्रुषेसाठी अनेक पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र मिळालेली आहेत.


वर्ष 1973 पासून राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांची सुरूवात करण्यात आलेली आहे. आतापर्यंत एकूण 614 परिचारिका आणि परिचारकांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. पदक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Thursday, 22 June 2023

पालेभाज्याचे शरीरासाठी महत्व.

 पालेभाज्याचे शरीरासाठी महत्व.

आयुर्वेदात जिवंती ही सर्वश्रेष्ठ पालेभाजी मानली आहे. मोहरीची पालेभाजी सर्वात कनिष्ठ मानली आहे. पथ्यकर पालेभाज्या-

अळू: अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे 'रक्त' वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा. अळूच्या पानांचा रस व जिरेपूड असे मिश्रण पित्तावर उत्तम गुण देते. फुरसे किंवा अन्य विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चोथा थापावा व पोटात रस घ्यावा. वेदना कमी होतात. गळवे किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठे वाटून त्याजागी बांधावी. गळू फुटतात.

अंबाडी: अंबाडी ही पालेभाजी रुचकर आहे. पण डोळ्याचे विकार, त्वचारोग, रक्ताचे विकार असणाऱ्यांनी वापरू नये. अंबाडी खूप उष्ण आहे, तशीच ती फाजील कफही वाढवते.

करडई : करडई पालेभाजी खूप उष्ण आहे. चरबी वाढू नये म्हणून याच्या तेलाचा उपयोग होतो. तसेच याची पालेभाजी वजन वाढू देत नाही. कफ प्रकृतीच्या लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी फार उपयुक्त आहे. या पालेभाज्यांच्या रसाने एकवेळ लघवी साफ होते. मात्र डोळ्यांचे व त्वचेच्या विकारात करडई वापरू नये. करडईच्या बियांच्या तेलाची प्रसिद्धी 'सफोला' या ब्रँडनावामुळे झाली आहे. त्यांत तुलनेने उष्मांक कमी असतात.

कुरडू: कुरडूच्या बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहेत. तशीच त्याची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे. कुरडूच्या पालेभाजीमुळे कफ कमी होतो. जुनाट विकारात कुरडूच्या पालेभाजीचा रस प्यावा. कोवळ्या पानांचा रस किंवा जून पाने शिजवून त्याची भाजी खावी. दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यात उपयुक्त आहे.


https://chat.whatsapp.com/IGqdOIrrEqOIxJvdxCZ5DM

कोथिंबीर: कोथिंबीर भाजी का तोंडी लावणे हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवू या. कोथिंबिरीचा वापर हा प्रामुख्याने खाद्य पदार्थाची चव वाढवायला म्हणून प्रामुख्याने केला जातो. चटणी, कोशिंबीर, खिचडी, पुलाव, भात, विविध भाज्या, आमटी, सूप या सर्वाकरिता कोथिंबीर हवीच. बहुधा सर्व घरी, सदा सर्वदा, सकाळ-सायंकाळी पोळी, भाकरी, भात सोडून सगळ्या पदार्थात कोथिंबीर वापरली जातेच. कोथिंबीर ताजीच हवी. तरच त्याचा स्वाद पदार्थाची खुमारी वाढवतो. कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रूची टिकवणारी आहे. जेवणात अधिक तिखट जळजळीत पदार्थ खाणाऱ्यांना उष्णता, पित्त याचा त्रास होऊ नये, याची काळजी कोथिंबीर घेते. जेव्हा विविध स्ट्राँग औषधांची रिअ‍ॅक्शन येते, अंगावर पित्त, खाज किंवा गळवांचा त्रास होतो, त्यावेळेस कोथिंबीर स्वच्छ धुवून वाटावी, त्याचा रस पोटात घ्यावा, चोथा त्वचेला बाहेरून लावावा. बिब्बा, गंधकमुक्त औषधे, स्ट्राँग गुग्गुळ कल्प यांच्या वापरामुळे काही उपद्रव उद्भवल्यास कोथिंबीरीचा सहारा घ्यावा. रक्तशुद्धी, रक्तातील उष्णता कमी करणे, तापातील शोष हा उपद्रव कमी करायला ताज्या कोथिंबिरीच्या रसाचा वापर करावा. कोथिंबिरीची भाजी ही पथ्यकर भाज्यांत अग्रस्थानी आहे.

घोळ: घोळाची भाजी बुळबुळीत असली तरी औषधी गुणाची आहे. त्यात एक क्षार आहे. चवीने ओशट असलेली घोळाची भाजी थंड गुणाची असून अन्नपचनास मदत करते. यकृताचे कार्य सुधारते. रक्ती मूळव्याध, दातातून रक्त येणे, सूज, अंगाचा दाह, मूत्रपिंड व बस्तीचे विकारांत उपयुक्त आहे. विसर्प किंवा धावरे, नागीण विकारांत पाने वाटून त्याचा लेप लावावा.

चाकवत: चाकवत ही पालेभाजी देशभर सर्वत्र सदासर्वदा मिळते. पालेभाज्यात आयुर्वेद संहिताकार जिवंती श्रेष्ठ मानतात. पण ही वनस्पती संदिग्ध व वादग्रस्त आहे. व्यवहार पाहता चाकवताला श्रेष्ठत्व द्यावे. ज्वर, अग्निमांद्य किंवा दीर्घकाळच्या तापामुळे तोंडाला चव नसणे, कावीळ, छातीत जळजळ अशा नाना तक्रारीत ही भाजी वापरावी. शक्यतो किमान मसालेदार पदार्थाबरोबर ही पातळ पालेभाजी तयार करावी. व्यक्तिनुरूप व प्रकृतीप्रमाणे लसूण, आले, जिरे, धने, हिंग, ताक, सैंधव, मिरी, तूप, खडीसाखर, गूळ हे पदार्थ अनुपान म्हणून वापरावे. आंबट नसलेल्या ताकातील चाकवताची पालेभाजी हा उत्तम पदार्थ होय. शक्यतो पालेभाज्यांचे ज्यूस घेऊ नयेत.

चुका : बाराही महिने मिळणारी चुक्याची भाजी जास्त करून श्राद्धाकरिता आळूच्या भाजीबरोबरच वापरली जाते. चुक्याची चव आंबट आहे. पाने छोटी व त्याचे देठ पातळ भाजीकरिता वापरतात. चुका उष्ण, पाचक व वातानुलोमन करणारा आहे. त्याचबरोबर त्याच्या संग्राहक गुणामुळे चुक्रसिद्ध तेलाची पट्टी योनीभ्रंश, अंग बाहेर येणे याकरिता वापरली जाते. पचायला कठीण असणाऱ्या पदार्थाबरोबर चुक्याची पाने वापरावी.


प्रमोद पाठक.



किल्ले, गड माहिती




परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 5 जुलै पर्यंत मुदतवाढ

 परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 5 जुलै पर्यंत मुदतवाढ.

            मुंबई, दि. 21 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिता अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून दि. ५ जुलै २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.


            अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सदर करण्याची अंतिम मुदत ही दिनांक २० जून २०२३ पर्यंत होती, परंतू विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुदतवाढ देण्यात आली असून दि. ५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत.


            या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जाती प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking) 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रांसह, समाज कल्याण आयुक्तालय 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001 या पत्यावर अर्ज करावेत.


            या योजनेसाठी पात्र असण्याऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी.

पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठीविठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना"

 पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठीविठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना"


शासन निर्णय जारी


            मुंबई, दि. 21 :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे १५ ते २० लक्ष वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना" सुरु करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून विमा छत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


            या निर्णयानुसार “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना" या योजनेची अंमलबजावणी, संनियंत्रण तसेच विमाहप्ता भरण्याची कार्यवाही शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येणार आहे. या संदर्भात आज वित्त विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.


 विमा योजनेचे स्वरुप


            विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेंतर्गत दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत / अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये शासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.


            याव्यतिरिक्त, खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीच्या सहाय्याने विमा योजना राबविण्यात येणार आहे. दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास विमा कंपनीकडून प्रतिव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येईल. दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात/पाय व एक डोळा निकामी झाल्यास एक लाख रुपये तर एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.


            वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी ३५ हजार रुपये किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येईल, असे या योजनेचे स्वरुप असणार आहे.


            या विमा योजनेसंबंधीच्या अटी, शर्ती व अन्य तरतुदी शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत.


            या विमा योजनेबाबत आवश्यकतेनुसार विमा संचालनालयाचा सल्ला घेण्यात येईल, असे वित्त विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


००००

प्रतिबंधात्मक उपचारासाठी नियमित योग अनेक व्‍याधींवर परिणामकारक

 प्रतिबंधात्मक उपचारासाठी नियमित योग अनेक व्‍याधींवर परिणामकारक        


– धीरज कुमार


आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयात जागतिक योग दिन साजरा


               मुंबई, दि. 22 : “मानवी जीवनात असंसर्गजन्‍य आजारांचे वाढत असलेले प्रमाण चिंताजनक आहे. या आजारांवर नियंत्रणासाठी योगासारख्‍या अखर्चिक व किमान संसाधनांची आवश्‍यकता असलेल्‍या प्रतिबंधात्‍मक उपचारांचा वापर होणे आवश्‍यक आहे. मेडिटेशन, योग यासारख्‍या थेरपींमध्‍ये सातत्‍य व नियमीतपणा ठेवला, तर अनेक आजारांपासून दूर राहणे शक्‍य आहे. परदेशामध्‍ये ज्‍या प्रमाणात योगोपचाराचा वापर केला जात आहे, त्‍या प्रमाणात आपल्‍या देशात प्रसार होणे गरजेचे आहे. शारीरिक आजारांव्‍यतिरिक्‍त क्रोध, मानसिक व्‍याधींवर नियंत्रण मिळवण्‍याचे सामर्थ्‍य योगामध्‍ये असल्‍यामुळे सर्वांनी आपल्‍या दिनचर्येतील काही वेळ योगासाठी व्‍यतीत करावा”, असे मनोगत आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी व्यक्त केले. 


             आरोग्‍य विभागाच्‍यावतीने आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयात जागतिक योग दिनाच्‍यानिमित्‍ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्‍य सेवा आयुक्‍त धीरज कुमार यांच्या हस्‍ते झाले. वित्‍त संचालक जयगोपाल मेनन, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड आदींसह आयुक्‍तालयातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ‘सचित्र योगक्रम’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्‍यात आले.


              सहायक संचालक डॉ. सुभाष घोलप यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जागतिक योग दिवसाची पार्श्‍वभूमी व महत्त्व विषद केले. उद्घाटन समारंभानंतर ‘ताण तणावापासून मुक्‍तीसाठी योग’ या विषयावर लोणवळयाच्‍या कैवल्‍यधामचे सहायक प्राध्‍यापक डॉ.सतीश पाठक, ‘असांसर्गिक रोगांमधील योगाचे महत्त्व’या विषयावर कैवल्‍यधामचे प्राध्‍यापक डॉ. शरदचंद्र भालेकर आणि ‘अष्‍टांग योग-समज/ गैरसमज’ या विषयावर सायन येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्‍यापक डॉ. गोरक्षनाथ आव्‍हाड यांची व्‍याख्‍याने झाली. तसेच डॉ. साक्षी हडप व डॉ. निकेश अंधारे यांनी उपस्थितांकडून योगाची प्रात्‍यक्षिक करवून घेतली.    


            कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रसाद भंडारी यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. सुभाष घोलप यांनी केले.


 

Featured post

Lakshvedhi