सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 28 February 2023
आभाळ माया
एकदा प्रविण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले की तुम्ही तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरलेयत... दोन्हींचाही अर्थ पहायला गेला तर एकच आहे... मग असे दोन वेगळे शब्द का ..?
शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा..
त्या म्हणाल्या...चुकतोयस तू प्रविण...
जे निरभ्र असते ते आकाश..आणि.. ..जे भरून येते ते आभाळ..!!
आणि म्हणूनच त्या निसर्गाच्या... त्या भगवंताच्या असीम कृपेला, त्याच्या मायेला आकाशमाया नाही तर आभाऴमाया म्हणतात ..!!
#मराठी_भाषा_दिन
वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा वनाचे रक्षण व संवर्धन करण्यात सिंहाचा वाटा – ना. सुधीर मुनगंटीवार
वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा वनाचे रक्षण व संवर्धन करण्यात सिंहाचा वाटा – ना. सुधीर मुनगंटीवार
वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थिती.
नागपूर,दि.२८ : वनपरिक्षेत्र अधिकारी (आर.एफ.ओ.) हा वनखात्याचा अतिशय महत्वाचा भाग आहे. यांच्यामुळेच वनांचे रक्षण व संवर्धन होण्यास मदत होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन, महाराष्ट्र द्वारे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना ना. मुनगंटीवार यांनी वरील वक्तव्य केले. प्रत्येक आर.एफ.ओ. कडे वनविभागाची पूर्ण जबाबदारी असते व ती जबाबदारी पूर्ण गांभीर्याने प्रत्येक आर.एफ.ओ. पार पाडत असतो याचे मला समाधान आहे, असेही बोलताना पुढे ते म्हणाले.
कार्यक्रमाला फॉरेस्ट रेंजर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष कांतेश्वर बोलके, अरूण तिखे, असोसिएशनचे सरचिटणीस निलेश गावंडे, नागपूरचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नायकडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद देशमुख, संस्थेचे माजी सरचिटणीस किशोर मिश्रीकोटकर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी आर्यनमन विजेता विशाल बोदडे यांचा ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रास्ताविक करताना असोसिएशनचे सरचिटणीस निलेश गावंडे यांनी आर.एफ.ओ. च्या विविध अधिकार व समस्यांवर सादरीकरण केले. यामध्ये मुख्यतः कर्मचारीवर्गांची कमी असल्यामुळे काम करण्यास अडचणी येतात तसेच वेतनश्रेणीवर सुध्दा त्यांनी सादरीकरणात सांगीतले.
याप्रसंगी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की,
फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या एका अहवालानुसार महाराष्ट्राचे हरीत क्षेत्र २५५० स्वेअर किमीने वाढले आहे. तसेच मॅनग्रोज चे क्षेत्र सुध्दा वाढले आहे. वनक्षेत्राशी संबंधित ज्या गोष्टी चांगल्या होत आहेत. त्यामध्ये तुमचा तसेच वनविभागाच्या सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्या काही वर्षात विदर्भात वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यांचे संवर्धन व संरक्षण ही जबाबदारी सुध्दा तुम्ही सर्वजण उत्तम पध्दतीने करता ही आनंदाची गोष्ट आहे. वनविभागाच्या संवर्धनामध्ये तुमच्यासहीत सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे व महाराष्ट्र वनविभाग देशात नंबर एकवर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले.
या कार्यक्रमात आपण अनेक विषय आपण मांडलेत. यात ब-याच मागण्या सुध्दा आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेन असे आश्वस्त ना.
क्रिडा क्षेत्रात उत्तम काम करणारी संस्था म्हणजे क्रिडा भारती
क्रिडा क्षेत्रात उत्तम काम करणारी संस्था म्हणजे क्रिडा भारती – ना. मुनगंटीवार
क्रिडा भारतीच्या विदर्भ प्रांत अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती.
नागपूर,दि.२८: व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्याबरोबर शारीरिक स्वास्थ्य उत्तम असणे ही आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी कुठल्यातरी क्रिडा प्रकाराशी प्रत्येकाने संलग्न असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने क्रिडा भारती क्रिडा क्षेत्रामध्ये लोकांना जोडणारे काम करीत आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे व त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. विजय मुनीश्वर, प्रमुख अतिथी म्हणून क्रिडा भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री प्रसाद महानकर, अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, स्वर्णिम गुजरात क्रिडा विद्यापीठाचे कुलगुरू श्री. अर्जुनसिंग राणा, अखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य श्रीमती मधु यादव, क्रिडा भारतीची विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. योगेश सालफळे, शहर अध्यक्ष शरद सुर्यवंशी, संजय लोखंडे उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले की,हे वर्ष देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आहे. त्यामुळे यावर्षी क्रिडा भारतीने जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत पोहण्याचा प्रयत्न करावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना खेळासाठी उद्युक्त करावे. मी राज्यात सांस्कृतीक विभागाचा मंत्री आहे. येणारे वर्ष हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य अभिषेकाचे ३५० वे वर्ष असणार आहे. जुन २०२३ ते मे २०२४ पर्यंत या निमीत्ताने राज्यामध्ये निरनिराळे कार्यक्रम विभागातर्फे आयोजित केले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंब तलवार व अफजल खानाचा वध करणारी वाघनखे इंग्लंडमधील संग्रहालयात ठेवलेली आहेत. मी इंग्लंडच्या पंतप्रधानांशी पत्रव्यवहार करून या वस्तु भारताला परत करण्यासंदर्भात विनंती केली आहे. इंग्लंडच्या सरकारने या संदर्भात सकारात्मक भुमीका घेतली असून यासंदर्भात लवकरच चांगला निर्णय होईल याची मला खात्री आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट सिंथेटीक ट्रॅक हे फक्त तीन ठिकाणी आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होतो की हे तिन्ही ट्रॅक चंद्रपूर जिल्हयात आहेत. सैनिक स्कुल, बल्लारपूर स्टेडियम व चंद्रपूर स्टेडियम या ठिकाणी हे ट्रॅक आहेत. यामुळे खेळाडूंना सराव करण्यास मदत होते व ऑलिम्पीक स्तरावर जाण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन मिळते, असे ना. मुनगंटीवार याप्रसंगी म्हणाले.
‘बुंद बुंद से सागर बनता है और व्यक्ती व्यक्ती से देश बनता है’ हे सुत्र ठेवून क्रिडा भारती काम करीत आहे याचा मला अतिशय आनंद आहे. अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय खेळाडू या संस्थेशी जुळले आहेत व पुढेही नवनविन सदस्य या संस्थेशी जुळतील याची मला खात्री आहे असे याप्रसंगी ना. मुनगंटीवार म्हणाले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी निरनिराळी प्रात्यक्षीके सादर केली तसेच जुन्या काळातील शस्त्रातांचे प्रदर्शनही यावेळी ठेवण्यात आले. कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातुन क्रिडा भारतीचे पदाधिकारी, क्रिडा शिक्षक तसेच विविध क्रिडा प्रकारातील खेळाडू उपस्थित होते.
कृषि महोत्सवात कृषि विभागाच्या अफलातून नियोजनाचा लखलखाट यशश्वी
कृषि महोत्सवात कृषि विभागाच्या अफलातून नियोजनाचा लखलखाट यशश्वी
कृषी महोत्सवात झाला शेतकऱ्यांचा सन्मान; हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा कृषि महोत्सवाची सांगता
बीड प्रतिनिधी : बीड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच लाखो शेतकऱ्यांच्या साक्षीने अभूतपूर्व कृषि महोत्सव हर्षात संपन्न झाला. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या समारोपदिनी जिल्ह्यातील 1965 पासून महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित केलेल्या शेतकऱ्यांचा सोहळा आयोजित केला होता. दरम्यान आदर्श शेतकऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कृषि महोत्सवात आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवेंच्या अफलातून नियोजनाचा लखलखाट यशश्वी झाल्याचे चित्र दिसत होते.
शेतकऱ्यांच्या आयुष्यात आधुनिक शेती आणि नवतंत्रज्ञपूरक शेती व्यवसायात उजेड पडणारा ऐतिहासिक महोत्सव साजरा करून बीडच्या कृषी विभागाने एक इतिहास रचला आहे. दरम्यान या शेवटच्या निरोपाच्या कार्यक्रमाच्या सत्राच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती त्रिवेणी भोंदे, संचालक उमेद, बाबासाहेब जेजुरक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड, सुभाष साळवे, प्रकल्प संचालक आत्मा, दत्ता बारगजे इन्फंट इंडिया, एस. एस. मडके उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव, बी. आर.गंडे प्रकल्प उपसंचालक बीड, गरांडे जिल्ह्या गुण नियंत्रण अधिकारी, बनकर ,सेंद्रिय शेती कृषी भूषण शिवराम घोडके, अभिमान अवचार, बाबासाहेब पिसोरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक बी. आर.गंडे प्रकल्प उपसंचालक आत्मा बीड यांनी केले. पुरस्कार प्राप्त शेतकरी जीवनराव बजगुडे यांनी पूर्वीची शेती आणि आजची शेती यामधील यव्यवस्था याविषयी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब पिसोरे यांनी मनोगत व्यक्त करताना अतिशय उत्कृष्ट्या रित्या कृषी महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल कृषी विभाग व आत्मा यांचे विशेष अभिनंदन केले. विशेष करून आत्माचे सुभाष साळवे यांचे शेतकऱ्यांमधून कौतुक झाले. तसेच शेतकऱ्यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. प्रल्हाद गवारे यांनी मनोगत व्यक्त करताना भविष्यात शेती आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये काळानुरूप बदल करून नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे सांगितले. सेंद्रिय शेती कृषी भूषण शिवराम घोडके यांनी मनोगत व्यक्त करताना कृषी विभाग सदैव शेतकऱ्याच्या सोबत राहतो, शेतकऱ्यांसाठी कृषि विभाग अनेक प्रकारच्या योजना राबवत असून शेतकऱ्यांची वेळोवेळी दखल घेतली जाते अशा भावना व्यक्त करत शेतकऱ्यांचा योग्य सन्मान केला जातो असे सांगितले. अभिमान अवचार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्याला संबोधित करताना जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी शेतकऱ्यांनी मांडलेले प्रश्न आणी समस्या सोडवल्या जातील असे सांगितले. तसेच कृषी विभाग आपल्या पाठीशी असून सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहच करण्याचा प्रयत्न केलेजात आहेत. पुरुषाच्या बरोबरीने महिलांना सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे कारण महिला शेतीमध्ये जास्त काम करतात. शेती हा व्यवसाय म्हणून केली पाहिजे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेती परवडते. सेंद्रीय शेती केली तर उत्पादन खर्च कमी करून आपले आरोग्य अबाधीत राखले जाते. सध्या महिला बचतगटाच्या महिला आपले उत्पादनाची विक्री स्वतः करतात त्यामुळे त्याना चांगला फायदा होत आहे. भविष्यात गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती केली तर शासनाच्या अनेक योजना आपल्यापर्यंत पोहचू शकतात. कृषी महोत्सवात उमेद गटाची मोठया प्रमाणात विक्री झाली असे जेजुरकर यांनी सांगितले. यावेळी जिल्याह्यातील सर्व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कृषी महोत्सवाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबर नागरिकांनी मोठया प्रमाणावर प्रतिसाद दिला. कार्यक्रम माचे सूत्रसंचालन जुबेर पठाण तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बीड यांनी केले. आभार गोरख तरटे तालुका कृषी अधिकारी आष्टी यांनी केले.
भवताल’चा फेब्रुवारी २०२३ चा अंक प्रसिद्ध!
भवताल’चा फेब्रुवारी २०२३ चा अंक प्रसिद्ध!
नमस्कार.
भवताल मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक प्रसिद्ध झाला आहे. तो सोबत शेअर करत आहोत.
अंकात पुढील लेखांचा समावेश आहे.
· यंदाच्या पावसावर ‘एल-निनो’चा प्रभाव किती?
· रस्त्यावर प्राणी मरू नयेत म्हणून...
· बकऱ्यांच्या कळपातील काळवीट
· पर्यावरणविषयक घडमोडींचे ‘इको-अपडेट्स’
· विविध उपक्रमांचे ‘भवताल बुलेटीन’
आपण अंकासाठी नावनोंदणी केल्यामुळे आपणाला हा अंक देत आहोतच. जोडीला अंकाचे कव्हर आणि नावनोंदणीची लिंक देत आहोत. ती आपल्या संपर्कात पोहोचवून लोकांना नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.
तसेच, आपणही वर्गणीसह अंकाची नावनोंदणी करून ‘भवताल’ च्या कार्याला पाठबळ द्यावे, ही विनंती.
नावनोंदणीसाठी लिंक:
https://www.bhavatal.com/connectus/masik-nondani-information
- संपादक, भवताल मासिक
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
महाराट्रतले फेमस मंकी कॅचर *
महाराट्रतले फेमस मंकी कॅचर *हकीम शेख व टीम* हे आपल्या चौल, रेवदंडा, नागाव, वांनरांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न आणि पर्यायी मार्गदर्शन करण्या साठी आपल्या कृषी प्रदर्शनात ( चौल मुखरी मंदिर )येथे
दि.5/3/23 रोजी ठीक 10:30 वा. येणार आहेत
तसेच सापांची माहिती व समज गैरसमज वर चर्च्या सत्र कर्यक्रम
आयोजन केले आहे.
(ज्याला शक्य होईल त्याने उपस्थित राहणे )
🙏🏻🙏🏻🙏🏻
*अधिक माहिती साठी*
*संपर्क*
कृषक कल्याणकारी संस्था
अध्यक्ष :-
रवींद्र पाटील:-8975932044
प्राणी मित्र (निसर्ग प्रेमी )
राकेश काठे :-9271170881
_पश्चिम आकाशातील खेळ_
*_पश्चिम आकाशातील खेळ_*
*20 फेब्रुवारी 2023*
सध्या पश्चिम आकाशात एक सुंदर खगोलीय खेळ रंगला आहे.
सूर्यास्तानंतर अतीशय तेजस्वी *_शुक्र_* सहज लक्ष वेधून घेतो आहे. त्याच्या वरच काही अंतरावर *_गुरू_* पण लगेच दिसतोय. खर म्हणजे शुक्र एवढा तेजस्वी आहे की तो सूर्य आकाशात असतानाही दिसतो. थोडा प्रयत्न करून शोधला तर एक वेगळा आनंद मिळेल. शुक्र आपल्या आकाशातील सूर्य, चंद्र यांच्या खालोखाल तेजस्वी असणारा ग्रह आहे.
उद्या म्हणजे 21 फेब्रुवारी 2023 ला सूर्यास्तानंतर लगेच पश्चिम क्षितिजावर फाल्गुन महिन्याची प्रतिपदेची सुंदर कोर दर्शन देईल. ती सुद्धा सूर्यास्तानंतर लगेचच शोधायचा प्रयत्न करा. ती सापडली तर तो आनंद अवर्णनीय असतो.
22 फेब्रुवारीला चंद्र - शुक्र युती आहे. म्हणजे ते अगदी जवळ जवळ असतील.
23 फेब्रुवारीला चंद्र गुरुच्या दिशेने सरकेल आणि त्याच्याबरोबर युती करेल. खरतर ही विधान युती आहे पण आपल्या इथून ती युती दिसेल.
24,25,26,27 फेब्रुवारी या काळात मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण निश्चित सूर्यास्तानंतर गुरु, शुक्र पहाणार. कारण त्यांच्यातलं अंतर रोज कमी कमी होत जाईल. ते दृश्य पहाण्याचे टाळणे केवळ अशक्य ठरेल.
या काळात चंद्र शुक्र, गुरू या दोघांना मागे टाकून मंगळाच्या दिशेने सरकलेला असेल.
28 फेब्रुवारीला विज्ञान दिन आहे. याच दिवशी चंद्र मंगळ पिधान युती आहे. म्हणजे मंगळ चंद्राच्या मागे काही काळाकरता झाकला जाईल. पण भारतातून ही पिधान युती दिसणार नाही. चंद्र मंगळ फक्त युती दिसेल.
1,2 मार्च 2023 या संध्याकाळी संपूर्ण जगातले अनेक लोक गुरु शुक्र युती अनुभवत असतील. हे अतिशय दुर्मिळ दृश्य असेल. कारण यानंतर असे दृश्य 2047 मध्ये म्हणजे 24 वर्षांनी अनुभवता येईल.
त्यामुळे या दुर्मिळ घटनांचा आनंद घ्या.
* - * -* - * -* - * -* - *
या सगळ्या घटना एकत्रितपणे पुढे देतो आहे. त्यांचा आनंद जरूर घ्या.
21 फेब्रुवारी 2023 - फाल्गुन शुद्ध प्रतिपदा चंद्र दर्शन
22 फेब्रुवारी 2023 - चंद्र - शुक्र युती
23 फेब्रुवारी 2023 - चंद्र - गुरू पिधान युती (आपल्या इथून युती दिसेल)
28 फेब्रुवारी 2023 - चंद्र - मंगळ पिधान युती (आपल्या इथून युती दिसेल)
1,2 मार्च 2023 - शुक्र - गुरू युती
*राम जोशी, खगोलवेध, अलिबाग*
अर्थसंकल्पीय अधिवेशनमा.राज्यपाल अभिभाषण :
अर्थसंकल्पीय अधिवेशनमा.राज्यपाल अभिभाषण :
अर्थव्यवस्थेला गती, युवकांना नोकऱ्या ही शासनाची प्राथमिकता
शेतकरी कर्जमुक्ती, आपला दवाखाना योजना, रोजगार मेळावे,
पायाभूत सुविधांची निर्मिती यासह अनेक योजनांना राज्यात गती
- राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 27 :- महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य राज्य आहे. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत अनेक योजना, उपक्रम राबविण्यात येत असून 1 लाख 25 हजार रोजगार निर्मितीसाठी 45 कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत. अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ‘ याअंतर्गत 50 हजार रूपये प्रोत्साहनपर लाभ दिला आहे. मुंबईत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत 72 दवाखाने सुरू केले आहेत. नागपूर - शिर्डी दरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरुन 31 जानेवारीपर्यंत 7 लाख 84 हजार 739 वाहनांनी प्रवास केला आहे. कोविडनंतर राज्याची अर्थव्यवस्था पुनरूज्जीवित करणे आणि युवकांना नोकऱ्या देणे ही शासनाची प्राथमिकता असून त्याची सुरुवात म्हणून 75 हजार शासकीय नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच 600 रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत अग्रभागी असलेले आपले स्थान कायम रहावे म्हणून राज्य सतत प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात राज्यपाल श्री.बैस यांचे अभिभाषण झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, कार्यक्रम यांचा सविस्तर ऊहापोह राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात घेतला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान द्रष्टे व समाजसुधारक यांसारख्या महान व्यक्तींनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचे महाराष्ट्र शासन सतत अनुसरण करीत आहे. शासनाने 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्यगीत म्हणून “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत स्वीकारले आहे. त्यामुळे राज्यगीताची आपली अपेक्षा पूर्ण झाली आहे. माझे शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवादासंबंधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या मूळ दाव्यात महाराष्ट्राची बाजू ठामपणे मांडत आले आहे आणि यापुढेही मांडत राहील. सीमावर्ती भागामध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेसाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे व त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
राज्यपाल म्हणाले की, सन 2022-23 या वर्षामध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी राज्याला विशेष सहाय्य म्हणून 8 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे नियतवाटप केल्याबद्दल प्रधानमंत्री व केंद्र सरकार यांच्याप्रती राज्य कृतज्ञता व्यक्त करते. आजपर्यंत 5 हजार 884 कोटी रूपये इतकी रक्कम यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहे आणि प्रकल्प सुरू झालेले आहेत.
राज्यात चोवीस प्रकल्पांच्या 87 हजार 774 कोटी रूपये इतक्या रकमेच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे, त्यातून 61 हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. शासनाने जानेवारी 2023 मध्ये दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेमध्ये 19 कंपन्यांशी 1 लाख 37 हजार कोटी रूपये इतक्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केलेले आहेत.
शासनाने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत 4 लाख 85 हजार 434 युवकांच्या आणि 2 लाख 81 हजार 541 शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाचे यशस्वीरीत्या आयोजन केले आहे. शासनाने, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये युवकांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी 2 औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केल्या आहेत. 1 हजारपेक्षा अधिक आयटीआय निदेशकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रगत निदेशक प्रशिक्षण विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
शासनाने स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या पती-पत्नींच्या निवृत्तिवेतनात दरमहा 10 हजार रूपयांवरून 20 हजार रूपये इतकी दुप्पट वाढ केली आहे. याचा लाभ राज्यातील 5 हजार 406 स्वातंत्र्यसैनिकांना होणार आहे. शासनाने महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादात हुतात्मा झालेल्यांच्या कायदेशीर वारसांचे निवृत्तिवेतन देखील दरमहा 10 हजार रूपयांवरून 20 हजार रूपये इतके दुप्पट केले आहे. माझ्या शासनाने “आणीबाणीच्या काळात लढा दिलेल्या व्यक्तींचा सन्मान” करणारी योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेत एकूण 4 हजार 438 लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य औद्योगिक राज्य आहे. भारताच्या एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 14.2 टक्के इतका आहे आणि भारताच्या एकूण निर्यातीच्या 17.3 टक्के इतक्या वाट्यासह निर्यातीत देखील महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत अग्रभागी असलेले आपले स्थान कायम रहावे म्हणून राज्य सतत प्रयत्नशील आहे. माझे शासन सन 2026-27 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर इतकी साध्य करण्याच्या प्रधानमंत्री यांच्या ध्येयाशी सुसंगत अशी राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर इतकी साध्य करण्यासाठी कटिबध्द असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.
मा.राज्यपालांच्या भाषणातील उर्वरित भाग सोबतप्रमाणे :-
शासनाने मुंबईमध्ये 13 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत जी - 20 परिषदेच्या पहिल्या बैठकीचे आणि पुणे येथे 16 व 17 जानेवारी 2023 रोजी जी - 20 परिषदेच्या पायाभूत सुविधांच्या कार्यगटाच्या बैठकीचे यशस्वीरीत्या आयोजन केले. सहभागी प्रतिनिधींनी परिषदेचे भरभरून कौतुक केले. शासनाने, उद्योगांमध्ये व्यवसाय सुलभता आणण्याच्या दृष्टीने उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या 119 सेवा या “मैत्री” नावाच्या एक खिडकी प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. वस्त्रोद्योगाला बळकटी आणण्याच्या उद्देशाने माझे शासन “एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-2028” तयार करीत आहे. नवीन कापूस प्रक्रिया केंद्र उभारणे आणि वस्त्रोद्योग उद्योगात सौर उर्जेच्या वापरातून रेशीम उत्पादकांना मूल्यवर्धित लाभ प्रदान करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट असेल. त्यामुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील, असे राज्यपाल म्हणाले.
शासनाने मुंबई मेट्रो मार्ग-11 वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या 13 किलोमीटर लांबीच्या दोन उन्नत व आठ भुयारी स्थानकांचा समावेश असलेल्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. गती शक्ती वर भर देण्याच्या दृष्टीने शासनाने तीन शहरांमध्ये मुंबई येथे 30 किलोमीटर, नागपूर येथे 40 किलोमीटर व पुण्यात 32 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू केले आहेत. शासनाने “स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0” च्या धर्तीवर “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0” सुरू केले आहे. मुंबईत सर्वसमावेशक आरोग्य सुविधा देण्याकरिता “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे-आपला दवाखाना” योजनेअंतर्गत 72 दवाखाने सुरू केले आहेत आणि मार्च 2023 पर्यंत मुंबईत 123 दवाखाने तसेच 18 नवीन बहुविध चिकित्सालये व रोगनिदान केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
शासनाने खाजगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागातून राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साध्य करण्याकरिता नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉरमेशन - मित्र ही संस्था स्थापन केली आहे. मित्र ही संस्था राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देण्याकरिता एक विचार गट असेल. शासनाने आर्थिक व अन्य आनुषंगिक बाबींवर राज्य शासनाला सल्ला देण्यासाठी “आर्थिक सल्लागार परिषदेची” देखील स्थापना केली आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर व शिर्डी यांना जोडणाऱ्या 521 किलोमीटर लांबीच्या मुंबई-नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग एक्सप्रेस वेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनापासून 31 जानेवारी 2023 पर्यंत या महामार्गावरून एकूण 7 लाख 84 हजार 739 इतक्या वाहनांनी प्रवास केला आहे. वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याकरिता माझे शासन कटिबध्द आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना भांडवली खर्चाकरिता विशेष सहाय्य योजना, आशियाई विकास बँकेकडून उपलब्ध झालेले कर्ज आणि हायब्रीड ॲन्यूटी योजना यांमधून राज्यातील रस्ते बांधणी कार्यक्रम जलदगतीने सुरू आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आतापर्यंत 26 हजार 731 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
माझ्या शासनाने विविध योजनांच्या एकत्रीकरणातून सुमारे 5 हजार गावांमध्ये “जलयुक्त शिवार अभियान 2.0” राबविण्याचे ठरविले आहे. जलसाठा क्षमता वाढविण्याकरिता तसेच शेतजमिनीच्या मातीचा दर्जा सुधारण्यासाठी “गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” योजना सुरू ठेवणार आहे. शासनाने केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत 27 प्रकल्पांना आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. पूर्ण झालेल्या प्रकल्पांमधून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत 3 लाख 27 हजार हेक्टर सिंचन क्षमता आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 1 लाख 73 हजार हेक्टर सिंचनक्षमता निर्माण करण्यात आली आहे. आजपर्यंत 2 लाख 95 हजार 127 हेक्टर लाभक्षेत्रावर बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणालीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. शासनाने 33 हजार 400 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चाच्या 29 पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या 29 प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यानंतर 5 लाख 86 हजार 439 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी माझ्या शासनाने, “मिशन-2025” कार्यक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत पुढील तीन वर्षात 30 टक्के कृषी वीज वाहिन्यांचे सौर उर्जीकरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पाच लाखांपेक्षा अधिक घरकुले बांधून पूर्ण करण्याच्या उद्देशाने “प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण” आणि राज्य पुरस्कृत “राज्य ग्रामीण गृहनिर्माण योजना” यांची अंमलबजावणी करण्यासाठी “अमृत महाआवास अभियान” सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या ‘प्रत्येकाच्या डोक्यावर छत’ या ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रधानमंत्री आवास योजनेची ग्रामीण आणि नागरी या दोन्ही भागात जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी माझे शासन कटिबध्द आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना पुरेशी निवासस्थाने उपलब्ध करून देण्यासाठी शासन दीर्घकालीन, मध्यमकालीन व तात्काळ उपाययोजना करत आहे. तसेच शासनाने म्हाडाच्या मदतीने मुंबईमधील पोलीस निवासस्थानांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2011 पर्यंत बीडीडी चाळीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या वारसांना 15 लाख रूपये इतक्या बांधकाम खर्चात पुनर्विकसित 500 चौरस फूट क्षेत्रफळाचा गाळा मालकी तत्त्वावर वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने राज्यामध्ये जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागात 1 कोटी 5 लाख 73 हजार घरगुती नळजोडण्या पुरविल्या आहेत. शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी 1 हजार 442 गावांमध्ये “अटल भूजल योजना” राबविण्यात येत आहे.
शासनाने वन विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचा वनांचे किंवा वन्यजीवांचे संरक्षण करतेवेळी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू ओढवल्यास त्यांच्या वारसांना 25 लाख रूपये आणि कायमचे अपंगत्व आल्यास 3 लाख रूपये इतके आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास त्याबाबतीत प्रदान करावयाच्या आर्थिक सहाय्याच्या रकमेत 15 लाख रूपयांवरून 20 लाख रूपये इतकी वाढ करण्यात आली आहे.
रामसर परिषदेने ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून “रामसर क्षेत्र” घोषित केले आहे. यामागे या क्षेत्रातील पाणथळ क्षेत्राचे व वन्यजीवांचे संवर्धन करणे हा हेतू आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अन्वये शासनाच्या मालकीच्या क्षेत्रात वन्यप्राण्यांचे आणि वनस्पतींचे व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या प्रयोजनार्थ राज्यात 11 नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे अधिसूचित केली आहेत. शासनाने राज्यातील हळद पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रासाठी 100 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संयुक्त राष्ट्राने सन 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. माझ्या शासनाने शेतकऱ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्ये लोकप्रिय करण्यासाठी आणि पौष्टिक तृणधान्यांचे क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी 200 कोटी रूपयांची तरतूद करून “महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान” सुरू केले आहे. हैद्राबाद येथील भारतीय पौष्टिक तृणधान्य संशोधन संस्थेच्या सहकार्याने सोलापूर येथे “पौष्टिक तृणधान्यांकरिता उच्चतम गुणवत्ता केंद्र” उभारण्यात येणार आहे. शासनाने संपूर्ण कोकण विभाग तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा तालुक्यांमध्ये काजू फळ पीक विकास योजना राबविण्याकरिता मान्यता दिली आहे. या प्रयोजनासाठी 5 वर्षांकरीता 1 हजार 325 कोटी रूपये इतकी रक्कम प्रस्तावित करण्यात आली आहे.
शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर लाभ दिला आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 4 हजार 683 कोटी रूपये इतकी रक्कम एकूण 12 लाख 84 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली आहे. शासनाने, 34 हजार 788 शेतकऱ्यांनी 29 भूविकास बॅंकांकडून घेतलेल्या 964 कोटी रूपये इतक्या थकीत कर्जाची रक्कम देखील माफ केली आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या घरी जाऊन गोवंशीय पशुधनाचे संपूर्णत: मोफत प्रतिबंधात्मक लसीकरण केले आहे. लम्पी चर्मरोगामुळे पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना व पशुधन मालकांना आर्थिक सहाय्य दिले आहे. या साथरोगाचा सामना करण्यासाठी औषधे, लस, उपकरणे यांसाठी ...
मराठी भाषा सर्वांना सामावून घेणारी भाषा
मराठी भाषा सर्वांना सामावून घेणारी भाषा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानमंडळात 'साहित्याची ज्ञानयात्रा' उत्साहात संपन्न.
मुंबई, दि. 27 :- “जी भाषा जात-पात विसरून सर्वांना सामावून घेते तीच विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण मराठी भाषेत आहेत. या भाषेचा वापर अधिकाधिक करून मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी आवर्जून मराठी बोलले, लिहिले पाहिजे,” असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात 'मराठी भाषा दिनानिमित्त' महाराष्ट्र विधानमंडळ आयोजित 'साहित्याची ज्ञानयात्रा' या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठी भाषा ही प्राचीन आणि समृद्ध आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, कवी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, डॉ.भालचंद्र नेमाडे असे ज्ञानपीठ विजेत्यांचे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी योगदान आहे. याचबरोबर विजय तेंडुलकर, जयंत पवार ते अगदी आत्ताचे प्रणव सखदेव, प्रवीण बांदेकर असे वास्तवाला भिडणारे अनेक लेखक मराठीत आहेत. या मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शब्दांची देवाणघेवाण झाली पाहिजे. अशा देवाणघेवाणीमुळे भाषा प्रवाही व जिवंत राहते. महाराष्ट्राला गौरवशाली साहित्य आणि संस्कृतीची परंपरा लाभली आहे. आपले साहित्य एक अमूल्य ठेवा आहे. राज्य शासनाने अलिकडेच शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजा बढे यांनी लिहिलेल्या "जय जय महाराष्ट्र माझा" या गीताला राज्य गीताचा दर्जा दिला आहे. साहित्य, मराठी भाषा आणि राज्याचा अभिमान यांना एकत्र आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मराठी भाषा ही 2500 वर्षांपूर्वीची आहे. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देता येणार आहे. साहित्य संमेलनासाठी साहित्यिकांच्या समस्या शासन सोडवेल आणि मदत करेल. मराठी भाषा भवनाचे काम लवकरच गतीने पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,
मराठी भाषेचा व्यवहारात वापर झाला पाहिजे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मराठी माणसाने नेहमी जगाचा विचार केला आणि त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वाला पसायदान दिले. मराठी भाषेने आजवर अनेक आव्हाने पेलली आहेत. कुसुमाग्रज यांच्या शब्दांतून खऱ्या अर्थाने शिव म्हणजे सर्व विश्व आहे हा विचार मांडला आहे. मराठी ही प्राचीन भाषा आहे. अनेक काळापासून अनेकांनी ही भाषा समृद्ध केली आहे, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जगातील अनेक भाषा संपल्या पण मराठी भाषा ही संपणार नाही. मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाईल मराठी भाषेचा व्यवहारात वापर झाला पाहिजे, ती ज्ञान भाषा झाली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणात उच्च व वैद्यकीय शिक्षण मराठीत घेता येणार असून उच्च शिक्षणात गेल्यानंतर भाषेशी तुटणारे नाते जोडण्याचा प्रयत्न होत आहे. जगात सर्वात चांगले इंजिनिअर जर्मनीत आहेत, ते तेथील मातृभाषेत शिक्षण घेत असल्यामुळे हे घडत आहे. आम्हीच वर्षानुवर्षे इंग्रजीचा आग्रह धरून ठेवला. आता केंद्र सरकारनेही नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्याचा निर्णय स्वीकारला आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
मराठी भाषेची गौरव पताका जगभरात फडकतेय
- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्यिकांसाठी अपूर्व अशी मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या प्रेरणादायी साहित्यांमुळे मराठी भाषेची गौरव पताका जगात फडकत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यातील विविध भागातील बोलीभाषा एकाच व्यासपीठावर उपलब्ध होतात. ही आपल्या राज्याची बलस्थाने आहेत. बहुभाषिक, बहुसंस्कृती असणारा महाराष्ट्र राज्यासारखे जगात राज्य नसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या राज्यातील राज्यातील भाषेचा विकास करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. तसेच मराठी भाषेचा इतिहास, देशातील भाषा, मराठी भाषेचे वैशिष्ट्ये अशी सविस्तर माहिती त्यांनी यावेळी सांगितली.
मराठी भाषेसाठी सर्वजण एकत्र येतात - उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'साहित्याची ज्ञानयात्रा' हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि उपस्थित मान्यवरांनी मनापासून दिलेली दाद आणि वेळ देखील खूप महत्वाचा आहे. मराठी भाषेचा प्रश्न असो अथवा मराठी भाषेच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येतात. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून २७ फेब्रुवारी २००२ मध्ये दोन्ही सभागृहात ठराव मांडला. इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आज समाजमाध्यमे आणि मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे देखील मराठीचा चांगला वापर करतात. नव्याने होणाऱ्या मराठी भाषा भवनमध्ये येणारी सर्व कार्यालये एकत्र असावीत. जेणेकरून एकाच ठिकाणी मराठी विषय सर्वांना अभ्यास करणे सोपे होईल, असे ही त्या म्हणाल्या.
नवीन मराठी भाषा भवन अभ्यासाचे केंद्र बनेल : मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर
मराठी भाषा मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मराठी भाषेचा मराठी माणसाला अभिमान आहे.मराठीला आपण आई मानतो. त्या मराठीचा आज गौरवाचा दिवस आहे. शालेय शिक्षण विभाग व मराठी भाषा भवनचा भूखंड एकत्रित करून मरिन लाईन्स येथे आदर्शवत, सुसज्ज वास्तू उभारणार आहे. यामध्ये संमेलन, चर्चासत्र, संशोधन केले जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.मराठी विश्वकोश ही एक देणगी आहे.मराठी विश्वकोशाचे कार्यालय भाड्याच्या जागेत होते.यावर्षी नवीन प्रस्ताव तयार केला असून वाई येथे सुसज्ज इमारत उभारणार आहे. परदेशात शनिवारी व रविवार मराठी भाषा शाळा चालवतात.मराठी भाषा टिकावी यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आमदार यामिनी जाधव यांनी यावेळी स्व-रचित जीवनविषयक कविता सादर केली. अभिनेते डॉ. गिरीश ओक व लीना भागवत यांनी अभिवाचन केले.गायक नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे, अभिषेक नलावडे यांनी मराठी भाषेचे महत्त्व असलेल्या गीतांचे गायन केले. या कार्यक्रमांची संहिता उत्तरा मोने यांची होती. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित या कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान साचिव राजेंद्र भागवत यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अनुश्री फडणीस यांनी केले.
0000
महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा
नवी दिल्ली , 27 : महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ आज साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या ग्रंथालयात कवी ‘कुसुमाग्रज’ यांच्या प्रतिमेस जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
शासनाच्यावतीने ‘कुसुमाग्रज’ यांची जयंती ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरी केली जाते. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर व उपस्थित कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले.
‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘कुसुमाग्रज’
कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान आहे. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ‘कुसुमाग्रज’ या नावाने त्यांनी काव्य लेखन केले. प्रसिध्द साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या नंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक ठरले.
कवी कुसुमाग्रज यांचे एकूण २४ कविता संग्रह , ३ कादंब-या, १६ कथा संग्रह, १९ नाटके आणि ४ लेखसंग्रह आदी साहित्य प्रसिद्ध आहे. १९६४ मध्ये गोव्यात आयोजित ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये कुसुमाग्रज लिखित ‘नटसम्राट’ या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.
0000
मराठीमध्ये विश्वाची भाषा बनण्याचे गुण
मराठीमध्ये विश्वाची भाषा बनण्याचे गुण
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुरस्कार प्रदान.
मुंबई, दि. 27 : जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी जनांना एका धाग्यात जोडण्याचे काम माय मराठी करते. जी भाषा सर्वांना जोडते, सामावून घेते, माणुसकी शिकवते तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची भाषा बनते. हे सर्व गुण मराठी भाषेत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वनीचित्रमुद्रीत संदेशाद्वारे शुभेच्छा देताना केले.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा विभागातर्फे या वर्षी हा कार्यक्रम “यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान” मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ध्वनीचित्रमुद्रीत संदेशाच्या माध्यमातून ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीधर दीक्षित, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, भाषावार प्रांत रचनेनंतर महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन मराठी ही राजभाषा झाली. शासनाने मराठीच्या जतन व संवर्धनासाठी स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापन केला. त्यामुळेच लोकभाषा, ज्ञानभाषा, राजभाषा म्हणून मराठी गौरवाने प्रस्थापित झाली आहे. बोली भाषा संवर्धनासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. साहित्य प्रसार, भाषा विकास आणि संशोधनासाठी, साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक दर्जाचे मराठी भाषा भवन मुंबईत साकारण्यात येत आहे. हे भवन महाराष्ट्राचा मानबिंदू ठरेल, असा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम होत आहेत. यामुळे मराठी भाषा समृद्धीला हातभार लागत असून अशा महोत्सवाच्या माध्यमातून मराठी भाषा जागतिक स्तरावर नेण्यासाठी यंदा प्रथमच विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे तसेच जगभरातील मराठी जनांचा याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
राज्य शासनाने राज्यगीत म्हणून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत स्वीकारले आहे, याचेही सर्वत्र कौतुक होत असल्याचे सांगून या गीताप्रमाणेच महाराष्ट्र हा भाषेच्या पातळीवरही सर्वत्र गर्जत राहील, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषा विभागाच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा व्यक्त करून विभागामार्फत पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि संस्थांचे त्यांनी अभिनंदन केले.
नवीन शैक्षणिक धोरणामुळे मातृभाषेतून शिक्षण - चंद्रकांत पाटील
कविता, नाटक, पोवाडे, गीते आदी विविध माध्यमांतून मराठी भाषा जन सामान्यांपर्यंत पोहोचली आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त झालेल्या तसेच अन्य साहित्यिकांच्या योगदानामुळे मराठी भाषा समृद्ध होत असल्याचे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘मातृभाषेतून शिक्षण’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे नवीन शैक्षणिक धोरण यावर्षीपासून राज्यात लागू करण्यात येत असून इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आता मराठीत उपलब्ध असणार असल्याचे सांगितले. मराठीतून अभ्यासक्रम शिकण्यासाठी यावर्षी 67 टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामुळे केवळ इंग्रजीतूनच उच्च शिक्षण घेता येते हा प्रघात संपेल आणि मराठी भाषा वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
युवा साहित्यिकांना प्रोत्साहन देणार - दीपक केसरकर
युवा साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका असून मराठी युवक मंडळ ही नवी संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री श्री.केसरकर यांनी दिली. तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी या मंडळांना दहा हजार रुपये अनुदान देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी कार्य करणाऱ्या मान्यता प्राप्त मंडळांना दहा लाख रुपये अर्थसाहाय्य देण्यात येईल. त्यानुसार महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी अर्थसाहाय्य देणार आहे. महाराष्ट्राबाहेर होत असलेल्या साहित्य संमेलनांना 25 लाख रुपये देणार असल्याचीही माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.
मराठी भाषा विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर यांनी दिली.
या कार्यक्रमात मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्य विकासासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांना दिले जाणारे विविध साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावर्षी विविध महानगरपालिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी वाचन प्रेरणा दिन मराठी स्पर्धेतील तीन विजेत्या महानगरपालिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने काढलेल्या 35 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी देण्यात आलेले पुरस्कार
• सन २०२२ चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. प्रा. नलगे यांनी कथा कादंबरी, एकांकिका, चित्रपट लेखन इत्यादी विविध प्रकारात लेखन केले. त्यांच्या प्रकाशित ग्रंथाची संख्या ९० आहे. त्यांना यापूर्वी विविध पुरस्कार, आदर्श शिक्षक तसेच राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
• श्री. पु. भागवत पुरस्कार २०२२ चा पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनला प्रदान करण्यात आला. ३ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रकाशित ग्रंथांची संख्या १ हजार २४०, सतत ४८ वर्ष कार्यरत असलेल्या ग्रंथालीने विविध विषयात प्रकाशने, पुस्तक प्रदर्शने, ग्रंथ चर्चा, वाचक चळवळ इत्यादी उपक्रम राबविले आहेत.
• डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ (व्यक्तींसाठी) दिला जाणारा पुरस्कार डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला. त्यांच्या वतीने मुलगा अभिजित वाघ याने पुरस्कार स्वीकारला. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. विठ्ठल वाघ यांनी वऱ्हाडी म्हणी, वऱ्हाडी बोलीचे संशोधन, देश विदेशात काव्य वाचनातून समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, कविता, कांदबऱ्या, संशोधन अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले आहे.
• कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२२ (व्यक्तींसाठी) श्री. द. ता. भोसले यांना देण्यात झाला. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ग्रामीण बोलीचा शब्दकोश, लोपलेल्या सुवर्णमुद्रा ही बोली भाषेवरील महत्वाची पुस्तके, खेड्यातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी २५ हून अधिक वर्षे ते कार्यरत आहेत.
• डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ (संस्थेसाठी) दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांना दिला आहे. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेची स्थापना १९०६, मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकास व प्रचारासाठी कार्यरत, विविध साहित्य प्रकारातील ४० हून अधिक पुरस्कार या संस्थेद्वारे प्रदान करण्यात येतात. लेखन कार्यशाळा सारखे उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतात.
• कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२२ (संस्थेसाठी) हा पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांना देण्यात आला आहे. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेची स्थापना १९९९, मराठी भाषा साहित्य संस्कृतीसाठी कार्यरत साहित्य संमेलने | लेखक वाचक संवाद लेखन कार्यशाळा असे विविध उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतात.
• माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि तृतीय क्रमांक भिंवडी-निजामपूर महानगरपालिका यांना प्रदान करण्यात आला.
Monday, 27 February 2023
मायटेक्स" एक्स्पोला लाखांवर नागरिकांची भेट, कोट्यावधी रुपयांची ऊलाढाल
मायटेक्स" एक्स्पोला लाखांवर नागरिकांची भेट, कोट्यावधी रुपयांची ऊलाढाल
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि राज्य सरकारतर्फे भव्य एक्स्पो संपन्न
मुंबई : राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा तर्फे ब्रांदा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे झालेल्या "महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो ला एक लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. या एक्स्पोमध्ये कोट्यावधी रुपयांची ऊलाढाल झाली. महाराष्ट्र चेंबरने आयोजित केलेल्या एक्स्पोचे कौतुक नागरिकांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मायटेक्स एक्स्पोचा भव्य शानदार सोहळा संपन्न झाला होता. देशात गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’ झाले आहे. राज्य सरकार उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक झाली. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले उदघाटन प्रसंगी केले होते.
एक्स्पोच्या समारोपाप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्यातील व्यापार आणि उद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. देशभरातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांना व्यापारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी मायटेक्स एक्स्पो ही एक पर्वणीच ठरली आहे. महाराष्ट्र चेंबरतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध उद्योगांतील सहभागींना एकाच छताखाली आणून ग्राहकोपयोगी वस्तूंपासून ते यंत्रसामग्रीपर्यंतचे प्रदर्शन पाहण्यास मिळाले. प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि विक्री करणे हे व्यापार प्रदर्शनाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी आणि रिटेल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठच लाभले.
मायटेक्समुळे महाराष्ट्रातील उद्योग, व्यापाराचा प्रचार, प्रचार होऊन पोषण वातावरण निर्माण होऊन देशात एक नंबरचे राज्य बनविण्यात महत्वपूर्ण ठरेल. राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी आणि रिटेल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठच मिळाले, अशा प्रतिक्रिया प्रदर्शनाला भेट दिलेल्या नागरिकांनी दिल्या. या एक्स्पोमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि राज्य, देश आणि परदेशातील व्यापारी उद्योजक सहभागी झाले.
महाराष्ट्र चेंबरचे चीफ पेट्रन कांतीलाल चोपडा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक प्रवीण राघवेंद्र, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, महाराष्ट्र चेंबरच्या विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, शुभांगी तिरोडकर, सुधाकर देशमुख, रवींद्र माणगावे, चंद्रशेखर पुनाळेकर, तनसुख झांबड, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे आदींनी संयोजन केले.
मराठी माणसाला काय येते
👤 मराठी माणसाला काय येते?
👤 मराठी माणसाला भारतीय राज्यघटना लिहिता येते.
🚂 मराठी माणसाने हिन्दुस्थानात पहिली रेल्वे सुरू केली ते नाना शंकरशेट
👤 मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते.
👤 मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येते.
👤 मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येते.
👤 मराठी माणसाला 🏤स्वराज्य उभं करता येते.
👤 मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते.
👤 मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.
👤 मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो.
👤 मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं.
👤 मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते.
👤 मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं.
👤 मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं.
👤 मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.
अभिमान बाळगा 'मराठी' असल्याचा.
🚩 🚩 🚩
😎 😎 😎
का 'मी मराठी' ?
- मी 'मराठी' आहे कारण...
- घरी येताना पिझ्झा खाल्ला तरी,
वरण-भात, साजूक तुपाशिवाय माझं पोट भरत नाही.
- मी 'मराठी' आहे कारण...
- ख्रिसमस, NEW YEARच्या जरी पार्ट्या मित्रांसोबत केल्या तरी,
घरात 'पाडवा'साजरा करतोच.
- *मी 'मराठी' आहे कारण...*
- जाम, सॉस कितीही आवडत असले तरी,
चटणी-लोणच्याचे ५-७ प्रकार तरी घरात सापडतील.
- मी 'मराठी' आहे कारण...
- रागाच्या भरात/चेष्टेत मित्रांना कितीही इंग्लिशमध्ये शिव्या दिल्या तरी,
*ठेच लागल्यावर 'आई गं' हेच शब्द तोंडात येतात*.
- मी 'मराठी' आहे कारण...
- हॉटेलमध्ये पैसे द्यायला जरी मागे रहात असलो तरी,
मित्रास त्रास देणा-याच्या ४-५ थोबाडात लावण्यास कमी पडणार नाही.
- मी 'मराठी' आहे कारण...
- 'छत्रपती शिवाजी महाराज की'
हे ऐकल्यानंतर माझ्या तोंडून आपसूक 'जय' आल्याशिवाय राहत नाही.
- मी 'मराठी' आहे कारण...
- कितीही 'HIGH LIVING' असलो तरी,
हात जोडून 'नमस्कार' बोलल्याशिवाय माझी 'ओळख' होत नाही.
- मी 'मराठी' आहे कारण...
- कितीही 'BRANDED PERFUMES' वापरले तरी,
'उटण्या'शिवाय माझी 'दिवाळी' साजरी होत नाही.
- मी 'मराठी' आहे कारण...
- गाडीतून जाताना 'मंदिर' दिसलं
कि,
आपोआप 'हात' जोडल्याशिवाय मी राहत नाही.
माझ्यातले 'मराठी'पण जोपासण्याची मला गरज नाही.
ते *माझ्या 'रक्तात' भिनलंय*.
आणि...
या 'मराठी'पणाचा मला खूप खूप 'गर्वच'' आहे.
🚩जय हिंद ! जय महाराष्ट्र !!!🚩
मराठी एक गंमत जंमत
*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━*
*꧁ मराठी एक गंमत ꧂*
*❀ शब्द एक, अर्थ अनेक ❀*
*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━*
*_संकलन : मिलिंद पंडित, कल्याण_*
मध्यंतरी माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे. असेल आठवी नववीत. पण चेन्नईहून थेट पुण्याला. मग मराठीचा गंध कसा असणार? थोडं शिकवल्यावर मी तिला काही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती. एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले. तीन चार शब्दांचे अर्थ सगितले. शेवटचा शब्द होता, लाव/लावणे.
मी तिला म्हटलं, "अगं, वाक्य लिहून आणायचंस, नुसता अर्थ कसा सांगू? एका शब्दाचा अर्थ काहीही असू शकेल?"
तिला कळेना !
"ओके, टेल मी ऑल द मीनिंग्ज" ती म्हणाली.
तिला वाटलं, असतील दोन तीन अर्थ. पण मराठीचा इंगा तिला अजून कळायचा होता. मी मनात म्हटलं, चला, आजचा वेळ या *लावालावी* तच घालवू.
"हे बघ, तू मराठीचा क्लास *लावला* आहेस !"
"ओह्, आय हॅव जॉइंण्ड द क्लास" लगेच वहीत क्लास *लावणे* = जॉइंन असं लिहिलं.
"क्लासला येताना तू आरशा समोर काय तयारी केलीस? पावडर *लावलीस*?"
"ओ येस !"
"आपण पार्टीला, फंक्शनला जाताना लिपस्टिक, कुंकू, टिकली *लावतो* ?"
"येस, आय अंडरस्टँड, टु अप्लाय." तिनं लिहिलं. "पण आपण केसांना पिन्स, हेअरबॅंड ही *लावतो* तिथे तो अर्थ होत नाही".
"ओके, वी पुट ऑन दॅट !"
"आता बघ. मी चहाचा कप तोंडाला *लावला* आणि बेल वाजली. कालच्या तुझ्या पुस्तकात गाईने चाऱ्याला तोंड *लावलं* !"
"आपण बाळाच्या गालाला हात *लावतो*, इथे काय? प्रत्यक्ष स्पर्श करतो. टच् !"
चौथा अर्थ लिहिता लिहिता तिची ट्यूब पेटली. म्हणाली, "हां, तुम्ही पार्क मधला बोर्ड वाचून दाखवला ना त्यादिवशी, फुलांना हात *लावू* नये. आणि त्या छोट्याला त्याची आई म्हणाली ना, पुस्तकाला पाय *लावू* नको. सो टु टच्"
"मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार *लाव*. मीन्स शट् द डोअर"
"हो! दार *लाव* किंवा दार बंद कर म्हणजे तेच".
"मीन्स लाव, बंद कर सेम. पण मग तुम्ही दिवा *लावते* म्हणता, देअर इट इज ऑपोझिट ऑफ दिवा बंद कर."
"बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत *लाव* = शट् = बंद कर. पण दिवा *लाव* = स्विच ऑन.
म्हणूनच तुला म्हटलं, "वाक्य लिहून आण बाई. संदर्भ नि रेफरन्स शिवाय नुसता *लाव* कसा समजणार?"
"आणखी खूप ठिकाणी *लावणे* हे व्हर्ब आपण वापरतो, पण तुला आत्ताच एवढ्या गोंधळात नाही टाकत."
"नो, नो. प्लीज टेल मी मोअर". म्हणत ती उत्साहानं सरसावून बसली.
"बरं! आता अपण इलेक्ट्रिकचा दिवा, टीव्ही, रेडिओ इ. *लावतो* तेव्हा 'स्विच ऑन' करतो. पण देवा समोर नीरांजन, उदबत्ती, समई लावतो तेव्हा काय करतो? 'लाइट ऑन' पेटवतो, फटाके *लावतो*, आग *लावतो*, गॅस *लावतो* = पेटवतो" ती भराभरा लिहून घेत होती.
तेवढ्यात आतून कुकरची शिट्टी आली. "बघ, मी कुकर *लावलाय*" दोघी हसलो. "आधीचा कुठला अर्थ आहे का यात?"
"खरं तर यात अनेक क्रिया आहेत. सगळ्याला मिळून एक सुटसुटीत शब्द *लावलाय*. आंघोळीचं पाणी *लावलंय* मधे असंच."
"मी रोज सकाळी अलार्म *लावते*" ती अचानक म्हणाली आणि हसत सुटली. "ओह्! एव्हरीथिंग इज सो डिफरंट."
"सो कनक्लूजन? एव्हरी *लाव* इज डिफरंट."
जिगसॉ पझल घेऊन बसलेल्या नातवाला मी हाक मारली. तर तो म्हणाला, "थांब गं आजी ! मी हे *लावतोय* ना!"
"हे, लुक. तो *लावतोय* = ही इज अरेंजिंग द पीसेस, टु अरेंज".
"तो शहाणा आहे. वह्या नि पुस्तकं कपाटात नीट *लावून* ठेवतो. कपाट छान *लावलेलं* असतं त्याचं".
वहीत लिहून घेऊन ती उठली, 'गुड बॉय' असं त्याचं कौतुक करून ती घरी गेली. पण माझं विचारचक्र चालूच राहिलं. आता मनाच्या अदृश्य स्क्रीनवर *लाव, लावते, लावले* हे सगळं बोल्ड मधे यायला लागलं.
रोजच कोणालातरी आपण फोन *लावतो*.
बडबड, कटकट करणाऱ्यांना आपण म्हणतो, "ए, काय *लावलंय* मगा पासून?"
आजीने कवळी *लावली* = फिक्स केली आणि आजी कवळी *लावते* म्हणजे रोज वापरते. (यूज)
पट्टा *लाव* = बांध. बकल, बटन *लाव* = अडकव.
बिया *लावणे*, झाडे *लावणे* = पेरणे, उगवणे.
इतके इतके मजूर कामाला लावले (एम्प्लॉइड).
वजन ढकलणारा, ओढणारा नेट/जोर *लावतो* (अप्लाइज स्ट्रेंग्थ). आपण वडिलांचं, नवऱ्याचं नाव *लावतो* म्हणजे काय करतो?
सुंदर गोष्ट मनाला वेड *लावते* या शब्दांच्या खेळानंही मला वेड *लावलं*.
इतक्यात आमची बाई आली. आल्या आल्याच म्हणाली, "विचारलं काहो सायबांना?' (मुलाच्या नोकरी बद्दल).
"विचारलं की, पाठव म्हणाले उद्या !"
"हा, मंग देते त्याला *लावून* उद्या" (ओहो! लावून देते = पाठवतो)
आणि *लावालावी* मधे तर कोण, कुठे काय *लावेल* !
अशी आपली ही मायमराठी ! शिकणाऱ्याला अवघड, पण आपल्याला सुंदर !
"आता, हे आर्टिकल ग्लोबल मराठीवर *लाव*" घरच्यांनी सल्ला दिला.
"आणि नाही *लावलं* तर मनाला *लावून* घेऊ नको" अशी चेष्टाही केली.
मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा 💐
💐 सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा 💐
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
कवी - सुरेश भट
राजभाषा
Chhotu : मम्मी, तू माझ्याशी खोटं बोललीस.
Mom : I told you na to speak in English.
Chhotu : Ok Mom, you lied to me.
Mom : When my son ?
Chhotu : you said that my younger sister is an angel.
Mom : Yes, she is.
Chhotu : So why didn't she fly when I threw her from our balcony.
Mom : नालायका,तुझं वाटोळं होवो, अरे... कुठ फेकलंस माझ्या पोरीला ...?
Chhotu: Mummy ! Please speak in English.
Mom : अरे कुत्र्या, बोंबलूदे तुझ ते इंग्लिश, माझी पोर कुठं हाय ते अगोदर सांग .......?
Chhotu : मम्मी, ती ठीक आहे ग,आत झोपलेली आहे, मी तर बस तुझी इंग्लिश चेक करत होतो.
Mom: काळतोंड्या,घालू का पेकाटीत लात, चल जा हीतनं......
*Moral* : When situation is serious, no other language will be remembered except *Mother Tongue..🙏*
*Happy Mother Tongue Day*
*मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!*
😂😂😂😂😂
विधानपरिषदेच्या कामकाजास वंदे मातरम् व राज्यगीताने प्रारंभ
विधानपरिषदेच्या कामकाजास वंदे मातरम् व राज्यगीताने प्रारंभ
मुंबई दि.२७ – विधिमंडळाच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या विधापरिषदेतील कामकाजास वंदे मातरम् आणि जय जय महाराष्ट्र माझा...या राज्य गीताने सुरुवात झाली.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...’ या राज्यगीताने सभागृह दुमदुमले होते.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून या गीतास राज्य गीत म्हणून मान्यता देण्यात आली आहे. कवी राजा बडे यांनी लिहिलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे गीत सीमा आंदोलनाच्यावेळी मराठी मनाला प्रेरणा देणारे ठरले होते. या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले असून, हे राज्यगीत १.४१ मिनिट अवधीचे आहे.
राज्यपालांना विधानभवन येथे मानवंदना
राज्यपालांना विधानभवन येथे मानवंदना
मुंबई दि.२७ : राज्यपाल रमेश बैस यांचे विधानमंडळ येथे आगमनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्याच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.
0000
Maharashtra Governor given a Guard of Honour at Vidhan Bhavan
Mumbai Dated 27 : Governor Ramesh Bais was welcomed by Maharashtra Chief Minister Eknath Shinde,Speaker of the Maharashtra Legislative Assembly Adv. Rahul Narwekar, Deputy Chairperson of Legislative Council Dr Neelam Gorhe, Deputy Speaker Narhari Zirwal and Minister of Parliamentary Affairs Chandrakant Patil at Vidhan Bhavan. The Governor was also given a ceremonial Guard of Honour .
The Governor addressed the joint Session of Maharashtra state Legislature on the First day of Budget Session for the year 2022-23.
0000
विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती
विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती
मुंबई, दि. 27 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली.
सर्वश्री सदस्य योगेश सागर, संजय शिरसाट, सुनिल भुसारा,सुभाष धोटे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्र्यांना भेटणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही मुंबई, दि. 27 : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह प्रधानमंत्र्यांची भेट घेण्यात येईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी विनंती करण्यात येईल. ००००
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातराज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्र्यांना भेटणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई, दि. 27 : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह प्रधानमंत्र्यांची भेट घेण्यात येईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी विनंती करण्यात येईल.
००००
श्री. अक्कलकोट स्वामी समर्थ, दादर मठ नूतनीकरण
👆श्री. अक्कलकोट स्वामी समर्थ, दादर मठ नूतनीकरण करण्यात आल्यानंतर असा आहे, नम्र विनंती एकदा येऊन जरूर दर्शन घ्यावे 💐🌹🌸🙏
Sunday, 26 February 2023
हृदयविकाराचा झटका*‼️
‼️ *हृदयविकाराचा झटका*‼️
*3000 वर्षांपूर्वी आपल्या भारत देशात खूप मोठे ऋषी होते.
*त्यांचे नाव होते* *महर्षि वाग्भट जी!!*
त्यांनी एक पुस्तक लिहिले
*ज्याचे नाव* *अष्टांग* *हृदयम्!!*
*(अस्तंग हृदयम्)*
*आणि या पुस्तकात त्यांनी * *7000* रोग बरे करण्याचे सूत्र लिहिले!
*हे त्यापैकी एक सूत्र आहे!!*
*वाग्भट जी लिहितात की हृदयाला कधी झटका येतो!* *म्हणजे हृदयाच्या नळ्यांमध्ये ब्लॉकेज होऊ लागले आहे!*
*म्हणजे रक्तात आम्लता वाढली आहे!*
*अॅसिडिटी तुम्हाला समजते!*
*ज्याला इंग्रजीत acidity म्हणतात!!*
*आम्लता दोन प्रकारची असते!
*एक म्हणजे पोटाचा आंबटपणा!*
*आणि एक म्हणजे रक्ताची आम्लता!!*
*जेव्हा तुमच्या पोटात आम्लपित्त वाढेल!* *तेव्हा तुम्ही म्हणाल*
✔️ *पोटात जळजळ होते!!*
✔️*आंबट आंबट ढेकर येत आहेत!*
✔️ *तोंडाला पाणी सुटले!*
*आणि ही आम्लता आणखी वाढली तर!*
*म्हणून हायपर अॅसिडिटी होईल!*
*आणि जेव्हा ही पोटाची आम्लता वाढून रक्तात जाते तेव्हा रक्ताची आम्लता होते!!*
*आणि जेव्हा रक्तात आम्लता वाढते तेव्हा हे आम्लयुक्त रक्त (रक्त) हृदयाच्या नळ्यांमधून बाहेर पडू शकत नाही!* *आणि नळ्यांमध्ये अडथळा निर्माण होतो!*
*तेव्हाच हृदयविकाराचा झटका येतो!! त्याशिवाय हृदयविकाराचा झटका येत नाही !!*
*आणि हे आयुर्वेदाचे सर्वात मोठे सत्य आहे जे तुम्हाला कोणताही डॉक्टर सांगत नाही!*
*कारण त्याचा उपचार हा सर्वात सोपा आहे!!*
*उपचार काय?*
*वाग्भट जी लिहितात की रक्तात आम्लता वाढली की!* *म्हणून तुम्ही अशा गोष्टी वापरता ज्या अल्कधर्मी असतात!*
*तुम्हाला माहीत आहे दोन प्रकारच्या गोष्टी आहेत!*
*आम्लयुक्त आणि अल्कधर्मी!!*
*आम्लीय आणि अल्कधर्मी*
*आता आम्ल आणि क्षार मिसळले तर काय होईल! ,
*आम्ल आणि अल्कधर्मी मिसळल्यास काय होते????*
‼️*तटस्थ*‼️
*असं सगळ्यांना माहीत असतं!!*
*म्हणून वाग्भट जी लिहितात!* *रक्ताची आम्लता वाढली असेल तर क्षारयुक्त पदार्थ खा!*
*म्हणून रक्ताची आम्लता तटस्थ होईल!!!
*आणि रक्तातील आम्लता न्यूट्रल झाली!*
*म्हणून आयुष्यात कधीही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नाही!!*
*ही आहे संपूर्ण कथा!!!
*आता तुम्ही विचाराल की कोणते पदार्थ अल्कधर्मी आहेत आणि आपण खावे????*
* तुमच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अल्कधर्मी आहेत!
*आणि आली तर!*
*मग पुन्हा येऊ नकोस!!*
*आपल्या सर्वांना माहित आहे की सर्वात अल्कधर्मी गोष्ट कोणती आहे आणि ती सर्व घरी सहज उपलब्ध आहे, तर ती म्हणजे बाॕटल गार्ड!!*
*ज्याला दुधी असेही म्हणतात!!*
*इंग्रजीत याला bottle gourd म्हणतात!!!
*जे तुम्ही भाजी म्हणून खाता!* *यापेक्षा जास्त अल्कधर्मी काहीही नाही!*
*म्हणून तुम्ही दररोज लौकिचा रस प्या!!* *किंवा कच्चा लौकी खा!!
* वाग्भट जी सांगतात की लौकीमध्ये रक्तातील आम्लता कमी करण्याची कमाल शक्ती असते. * *म्हणून तुम्ही लौकीचा रस खावा!!
*किती सेवन करावे?????????*
*दररोज 200 ते 300 मिलीग्राम प्या!!*
*कधी प्यावे?*
*सकाळी रिकाम्या पोटी (शौचाला जाऊन आल्यावर) पिऊ शकतो!!* *किंवा नाश्त्याच्या अर्ध्या तासानंतर पिऊ शकतो!!*
*तुम्ही या बाॕटल गाॕर्डचा रस अधिक अल्कधर्मी बनवू शकता!*
*त्यात तुळशीची 7 ते 10 पाने टाका* *तुळशी खूप क्षारीय असते!!* *तुम्ही त्यात पुदिन्याची 7 ते 10 पाने मिक्स करू शकता!* *पुदिना सुद्धा खूप अल्कधर्मी आहे!* *यामध्ये तुम्ही काळे मीठ टाकू शकता किंवा खडकात मीठ घालावे!*
*हे खूप अल्कधर्मी आहे!!*
*पण लक्षात ठेवा*
*फक्त काळे किंवा खडे मीठ घाला!* *इतर आयोडीनयुक्त मीठ कधीही घालू नका!!* *हे आयोडीनयुक्त मीठ आम्लयुक्त आहे!!!!*
*म्हणून मित्रांनो, तुम्ही हा दूधीचा रस जरूर सेवन करा!!!
*2 ते 3 महिन्यांच्या कालावधीत तुमच्या हृदयातील सर्व अडथळे दूर होतील!!*
*आपल्याला 21 व्या दिवशीच खूप परिणाम दिसू लागतील!!!
*तुम्हाला कोणत्याही ऑपरेशनची गरज नाही!!*
*आमच्या भारतातील आयुर्वेदाद्वारे घरच्या घरी उपचार केले जातील!!*
*आणि तुमचे मौल्यवान शरीर आणि लाखो रुपये ऑपरेशनमधून वाचतील!!
*संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!!
*तुम्हाला ती आवडल्यास तुम्ही ही माहिती इतर सर्व लोकांपर्यंत पोहोचवावी.*
*किमान पाच गटात पाठवावे*
*काही लोक पाठवणार नाहीत*
*पण मला खात्री आहे की तुम्ही नक्की पाठवाल*
कौशल अग्रवाल, सुप्रसिद्ध डॉ.
🙏 पतंजलि भारत 🙏
कला का री
पाठमोरी ती उभी सुंदरी
निळाईत समुद्रकिनारी
रविकिरणे केशरी सोनेरी
लेवून तेजात स्वप्न उरी
चित्र :: जयश्री
काव्य :: कला
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन,
या फोटोतील दत्त मूर्ती ही बेळगाव मधील त्रिपुरीसुंदरी मठ येथील आहे.याच वैशिष्ट्य अस..या मठाचे मठपती श्री किरण स्वामी यांचे पूर्वज हे स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त होते.त्यांना श्री स्वामी समर्थांनी स्वतः जवळ असलेला निलमणी दिला होता.मात्र त्या नंतर कालांतराने हा मणी कुठे आहे हे कुणालाही माहित नव्हते.आता चार पाच पिढ्यानंतर सध्याचे किरण स्वामी यांना श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष स्वप्नात येवून तो मणी तुमचे जुने घराचे भिंतीमध्ये आहे असे सांगीतले.त्या प्रमाणे त्यांनी भिंत पाडून पाहिले असता हा मणी सापडला.हा अक्कलकोट स्वामींचा मणी आहे.यास *निलमणी* म्हणतात.नंतर पुन्हा स्वामींनी स्वप्नात येवून किरण स्वामी यांना दत्त मंदिर बांधण्यास सांगीतले व त्या मध्ये दत्त मूर्ती कशी असावी हे सुध्दा सांगीतले त्या प्रमाणे किरण स्वामी यांनी दत्त मंदिर (मठ) बांधला.यालाच *त्रिपुरीसुंदरी मठ* असे म्हणतात.हा स्वामींचा निलमणी बेळगाव मध्ये आहे हे अक्कलकोट मंदिर संस्थानालाही माहीत आहे. स्वामींचा प्रगट दिन निमित्त हा मणी बाहेर काढून दर्शनाला ठेवला जातो.तो मणी आज तुम्हा सर्व स्वामी भक्तांना मी दर्शन घेण्यासाठी फोटो व व्हिडीओ क्लिपने पाठवला आहे.या मध्ये लाल फुलामध्ये तो निलमणी ठेवला आहे तसेच स्वामींच्या पादुका आहेत व नयनमनोहर अशी दत्तमूर्ती आहे.याचा दर्शनाचा लाभ घ्यावा.🙏
स्वामी समर्थFeatured post
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...