बालभारती : ज्ञानाचा वैभवशाली वारसा
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अर्थात बालभारतीच्या स्थापनेला नुकतीच ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील अठ्ठावन्न वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचारप्रणाली, कालसुसंगत शैक्षणिक धोरणे, नवीन अध्ययन- अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून बालभारतीने पाठ्यपुस्तकांच्या स्वरूपात, आशयात अनेक बदल केले आहेत. कालानुरूप बदलाची ही प्रक्रिया आजही सुरु आहे.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम आहे, तर पाठ्यपुस्तक हे ज्ञानप्राप्ती व शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रमुख साधन आहे. पाठ्यपुस्तके हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या मनाचा एक कोपरा लहानपणी शिकलेल्या पाठ्यपुस्तकांसाठी कायम राखीव असतो. लहानपणी शिकलेल्या कथा, कविता, चित्रे यांचा एक विलोभनीय ठसा मनावर उमटलेला असतो. पाठ्यपुस्तकांतून भाषेचे, साहित्याचे आणि वाचनाचे संस्कार तर होतातच, शिवाय जीवनाचे, जगण्याचे अनेक संस्कारही याच पाठ्यपुस्तकांतून होत असतात. अशी ही आयुष्यभर साथसंगत करणारी, उत्तम संस्कारांची शिदोरी देणारी पाठ्यपुस्तके बालभारतीत तयार होतात.दरवर्षी अंदाजे 6.55 कोटी पुस्तकांची छपाई करून त्यांचे वितरण बालभारती मार्फत केले जाते. पाठ्यपुस्तकांची निर्मिती ही खडतर आणि विलक्षण प्रक्रिया आहे. प्रतिवर्षी एकाचवेळी राज्यातील लाखाहून अधिक शाळांमधील शिक्षक, कोट्यवधी विद्यार्थी आणि तितकेच पालक यांच्याशी आपुलकीच्या अतूट धाग्यांनी बालभारती जोडली गेली आहे.
मंडळाची स्थापना
स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकात देशातील शैक्षणिक वाटचालीची जडणघडण झाली. अनेक जाती, अनेक भाषा, विविध रूढी, परंपरा इत्यादींमुळे सामाजिक आणि शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी नेमके काय स्वीकारावे, काय स्वीकारू नये, याबाबत निश्चित दिशा आणि धोरण नव्हते. वेगवेगळ्या राज्यांतील भाषाविषयक धोरण, शैक्षणिक आकृतिबंध, अभ्यासक्रम यामध्ये एकसमान असे सूत्रही नव्हते. कोठारी आयोगाने शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणली. पाठ्यपुस्तक मंडळाच्या स्थापनेपूर्वी शाळांमध्ये खासगी प्रकाशकांची पुस्तके वापरात होती. या पुस्तकाचा दर्जा, किमतीमधील तफावत, त्यांची उपलब्धता, शाळेत पुस्तक लावताना होणारे गैरव्यवहार या बाबींची दखल कोठारी आयोगाने घेतली. दर्जेदार आणि रास्त किमतीमधील पुस्तके मुलांना वेळेत मिळावी यासाठी राज्याने स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी शिफारस करण्यात आली. शालेय पाठ्यपुस्तकांचे राष्ट्रीयीकरण झाले. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार 27 जानेवारी 1967 रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे या संस्थेची स्थापना झाली. याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते 2 फेब्रुवारी 1967 रोजी झाले. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष या नात्याने तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांचे संस्था उभारणीत आणि मंडळाचे पहिले संचालक उत्तमराव सेवलेकर आणि पहिले नियंत्रक बापूराव नाईक यांचे संस्थेच्या प्रारंभीच्या वाटचालीत मोलाचे योगदान राहिले.
राज्यातील प्राथमिक स्तरावर शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा व इतर सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करून वितरित करणे हे मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मराठी बालभारती इयत्ता पहिली हे मंडळाचे पहिले पुस्तक 1968 मध्ये प्रकाशित झाले. आजपर्यंत बालभारतीच्या पाच माला प्रकाशित झाल्या असून २०१३ पासून सहाव्या मालेचे प्रकाशन सुरु आहे. आठ भाषा माध्यमातून सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करणारे मंडळ हे बालभारतीचे वैशिष्ट्य आहे. 1968 पासून पाठ्यपुस्तक मंडळ दर्जेदार, संस्कारक्षम आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी पाठ्यपुस्तके अल्प किमतीत उपलब्ध करून देत आहे. गेल्या पन्नास वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचारप्रणाली, कालसुसंगत शैक्षणिक धोरणे, नवीन अध्ययन- अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून पुस्तकांच्या स्वरूपात, आशयात अनेक बदल करण्यात आले आहेत. कालानुरूप बदलाची ही प्रक्रिया आजही सुरु आहे.
संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ असे असले, तरी `बालभारती' या नावाने प्रकाशित होणारी भाषेची पाठ्यपुस्तके अल्पावधीतच इतकी लोकप्रिय झाली, की मंडळ `बालभारती' याच नावाने ओळखले जावू लागले. पाठ्यपुस्तक प्रकाशन क्षेत्रातील एक पायाभूत स्वायत्त संस्था असा मंडळाचा उल्लेख करावा लागेल. मंडळाने स्थापनेपासूनच संस्कारक्षम , आकर्षक व दर्जेदार पाठ्यपुस्तक तयार करण्याचे व्रत घेतले. अनेक अडचणींवर मात करून शिक्षण क्षेत्रातील पाठ्यपुस्तक प्रकाशनाचा पाया मजबूत केला. निव्वळ मुलांवरील प्रेमापोटी राज्यातल्या अनेक ख्यातनाम लेखक, कलावंत आणि विचारवंतानी बालभारतीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. कल्पना कार्यक्षमता व कर्तृत्व यांचा एक सुंदर त्रिवेणी संगम मंडळाच्या आजवरच्या प्रवासात दिसून येतो.
पाठ्यपुस्तक मंडळाची रचना
पाठ्यपुस्तक मंडळ हे राज्यशासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. राज्याचे शिक्षणमंत्री हे या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय नियामक मंडळात घेतले जातात. पाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य काम विद्याविभागात चालते. विद्याविभागांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती या आठ भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण असे एकूण 14 विभाग आहेत.
विषय समित्या
पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विषयवार समित्या असतात. मंडळातील त्या त्या विषयाचे अधिकारी विषय समित्यांमध्ये सदस्य-सचिव म्हणून काम करतात. जुन्या अभ्यासक्रमाच्या जागी नवीन अभ्यासक्रम येऊन पाठ्यपुस्तके बदलली जात नाहीत, तोपर्यंत या समित्या कार्यरत असतात. पाठ्यपुस्तके तयार करणे ही जटील प्रक्रिया आहे. मुलांचा वयोगट, त्याचं भावविश्व, त्यांची आकलन क्षमता, मजकुराची काठिण्यपातळी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पाठ्यविषयांची निवड करणे आणि सोप्या भाषेत त्यांचे लेखन करणे हे एक प्रकारचे दिव्यच असते.
No comments:
Post a Comment