सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 27 February 2022
Saturday, 26 February 2022
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार
-- आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
· मदतीसाठी राज्य नियंत्रण तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई,दि.२५- सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून राज्यातील अंदाजे १२०० विद्यार्थी युक्रेन देशात अडकले आहेत. त्यातील ३०० विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला आहे. राज्य नियंत्रण कक्ष या विद्यार्थ्यींशी संपर्कात असून महाराष्ट्र शासनाकडून या विद्यार्थ्यांना तसेच अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंहगड निवासस्थानी युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी तसेच नागरिकांसंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते.
मदत व पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील अंदाजे १२०० विद्यार्थी अडकले असून ३०० विद्यार्थ्यांनी पालकांशी संपर्क साधला असल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहे.युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावर देखील संकलित करण्याचे काम सुरू आहे.सर्व जिल्हाधिकारी यांनी देखील हेल्पलाईन नंबर जाहीर केलेले आहेत. राज्याचा नियंत्रण कक्ष 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर मोबाईल तसेच व्हॉटस क्रमांक ९३२१५८७१४३ आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा.
श्री.वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील किती लोक अडकले आहेत याची माहिती विभाग घेत आहे.तात्काळ संपर्क केंद्रही सुरू केले आहे. जी-जी मदत हवी असेल ती मदत देण्यासाठी राज्य सरकार देण्यास तयार आहे .केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत.कदाचित युक्रेनमधून विमान उडू शकणार नाही. त्यामुळे बाजूच्या देशातून जर विमान घेतले तर त्यासाठी तयारी दर्शवली आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा स्तरावर संकलित करण्याची तयारी केली आहे. काही लोकांशी संपर्क होण्यात अडचणी येत आहेत. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने नवी दिल्ली येथे हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली येथील क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
● टोल फ्री - 1800118797
● फोन 011-23012113 / 23014104 / 23017905
● फॅक्स 011-23088124
● ईमेल situationroom@mea.gov.in या हेल्पलाईनवर संपर्क
साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग;
कालबद्ध रीतीने इतर मागण्यांवरही कार्यवाही झाली पाहिजे
-------------------------
मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. 25 : मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य शासन व मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा विस्तृत आढावा घेण्यात आला तसेच प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कालबद्ध रीतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण, समितीचे सदस्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी तसेच आदी संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.
मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी मराठा समाजासंदर्भातील निर्णयांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती व समाजाच्या, समन्वयकांच्या मागण्यांची माहिती दिली. या विषयांवर विचारविनिमय होऊन अनेक निर्णय घेण्यात आले. मराठा समाजासाठी स्वतंत्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची लवकरच घोषणा होणार आहे. निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे केवळ ओबीसी प्रकरणांची हाताळणी असेल, असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.
सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती
मराठा समाजासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीला गती मिळेल.
व्यवस्थापकीय संचालकांची रिक्त पदे भरणार
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह विविध महामंडळांची संचालक व व्यवस्थापकीय संचालकांची पदे रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 'सारथी' संस्थेच्या विभागीय उपकेंद्रांसाठी भूखंड देण्याचे प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर झाले असून, त्यावर तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले .
सारथीची पदभरती प्रक्रिया महिन्याभरात
'सारथी' संस्थेसाठी आवश्यक असलेल्या 273 पदांसाठी भरती प्रक्रिया महिन्याभरात केली जाईल. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 18 नागरिकांच्या वारसांना राज्य परिवहन मंडळात रुजू करून घेण्यात आले असून, उर्वरित प्रकरणांवरही तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले.
इतर वसतिगृहेही सुरू करण्यासाठी प्रयत्न
डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत ठाणे, पुणे, सातारा (कराड), सांगली (मिरज), कोल्हापूर, नाशिक व अहमदनगर येथील सात वसतिगृहे वापरासाठी सज्जे असून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी इतर जिल्ह्यांमध्येही वसतिगृहे कार्यरत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही या वेळी निश्चित करण्यात आले.
मराठा आंदोलनातील जे गुन्हे मागे घ्यायचे राहिले आहेत त्यांच्याबाबतीत महाधिवक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली गृह तसेच विधी व न्याय विभागाकडून न्यायालयाकडे तातडीने पाठपुरावा करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील निर्णयांची माहिती राज्य शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करुन ती वेळोवेळी अद्यावत करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आऱक्षण रद्दबातल केल्यानंतर विविध नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांबाबत लवकरच आणखी एक बैठक होणार असून, त्यामध्ये विविध कायदेशीर मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे..
Continue ४) अशोक केळकर मराठी भाषाअभ्यासक पुरस्कार (संस्था) - मराठी अभ्यास परिषद, पुणे
o मराठी भाषेचा सर्वांगीण विकास, लोकव्यवहारात मराठीचा वापर, ज्ञानव्यवहारात मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि मराठीजनांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे या चतु:सूत्रीनुसार मराठी भाषेच्या हिताच्या आणि समृद्धीच्या दृष्टीने ही संस्था चाळीस वर्षे सातत्याने कार्यरत आहे.
o भाषाविषयक सैद्धान्तिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा तसेच भाषा आणि जीवन यातील विविधपदरी संबंध आणि त्यावरचे भाष्य मांडणारी भाषा या विषयाला वाहिलेले 'भाषा आणि जीवन' हे त्रैमासिक 1983 पासून आजतागायत सुमारे चाळीस वर्षे प्रकाशित होणारे केवळ मराठीच नव्हे तर सकल भारतीय भाषांतील हे एकमेव भाषाशास्त्रीय नियतकालिक.
o कोश, बोलीभाषा, अन्य भाषारूपे यांचा अभ्यास, भाषा आणि संस्कृती यासंबंधी लेखन आणि लेखक यांना पुरस्कार.2018 पासून या पुरस्काराचे नामकरण 'प्राध्यापक ना. गो. कालेलकर पुरस्कार'.
o वर्धापन दिनानिमित्त व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद तसेच मराठी भाषा दिनानिमित्त 'भाषातज्ज्ञ श्रीमती सत्त्वशीला सामंत स्मृति व्याख्यान' इ. उपक्रम.
o त्रिभाषा-सूत्राचे मूल्यमापन, भाषिक नीती आणि व्यवहार, प्रसार माध्यमे आणि मराठीचा विकास, पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन आदी विषयांवर सकारात्मक मंथन.
5) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्कार (व्यक्ती) - डॉ. चंद्रकांत पाटील, पुणे
o कवी, समीक्षक, अनुवादक, अनेक बहुचर्चित मराठी आणि हिंदी कवितासंग्रहांचे संपादक तसेच राष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याचे मोलाचे कार्य केले.
o १९६६ साली ज्येष्ट भालचंद्र नेमाडे यांच्यासह 'वाचा' या लघु नियतकालिकाचे प्रकाशन.
o हिंदी साहित्याचा मराठी अनुवाद आणि मराठी साहित्याचा हिंदी अनुवाद करण्याचे कार्य.
o दोन हजारहून अधिक कवितांचा अनुवाद, कविता-नाटक-कादंबरी यांच्या अनुवादांचे ४० संग्रह, १० संपादित ग्रंथ, ५ कवितासंग्रह, ५ लेखसंग्रह अशी ग्रंथसंपदा.
o गेली सात वर्षे ज्ञानपीठ पुरस्कारासाठीच्या अंतिम निवड समितीत परीक्षक तसेच मध्यप्रदेश सरकारचा कबीर सन्मान, कुसुमांजली राष्ट्रीय पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार यांसह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार समित्यांत परीक्षक म्हणून कार्य.
o महाराष्ट्र शासनाच्या चार पुरस्कारांसह मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांचे पुरस्कार, विविध राष्ट्रीय पुरस्कार आणि अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार.
5) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्कार (संस्था) - मराठी अभ्यास केंद्र, मुंबई
o मराठी भाषा, समाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन.
o शालेय शिक्षणात येणारे मराठी भाषेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करून राज्य शासनाला द्विस्तरीय आराखडा सादर.
o 'उच्च शिक्षणाची दशा आणि दिशा' हा उच्च शिक्षणात मराठीच्या वापरासंबंधी लक्ष वेधणारा अभ्यासग्रंथ प्रकाशित. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर सर्वत्र मराठी माध्यम उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा. त्यातून मुंबई विद्यापीठाच्या 'बॅचलर ऑफ मास मीडिया' अभ्यासक्रमांचे मराठीकरण.
o न्यायव्यवहारात मराठीचा वापर व्हावा यासाठी 'न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी' ह्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन करून जिल्हा व तालुका न्यायालय वकील परिषदेत त्याचे वितरण तसेच या संदर्भातील चर्चासत्रांचे आयोजन.
o माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात मराठीचा वापर वाढावा यासाठी संगणकीय मराठीच्या वापराबद्दल कार्यशाळा. राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक संगणकात मराठीचा वापर अनिवार्य होण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांशी चर्चा. मराठीसाठी इन्स्क्रिप्ट फलक सर्वमान्य व्हावा, एमएससीआयटी अभ्यासक्रमात युनिकोड व मराठीचा समावेश व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा. त्या संबंधित पुस्तिका प्रकाशित.
0000
वृत्त क्र. 630
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने
मराठी भाषा गौरव दिनी 53 पुस्तकांचे लोकार्पण
मुंबई, दि. 25; साहित्य संस्कृती, कला, इतिहास अशा विविध विषयांवरील वैविध्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, नाविन्यपूर्ण व दुर्मिळ 53 पुस्तकांचे लोकार्पण मराठी भाषा गौरवदिनी दि. 27 फेब्रुवारी, 2022 रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ‘पुस्तक प्रकाशन’ हे मुख्य उद्दिष्ट असून साहित्य संस्कृती, कला, इतिहास यासारख्या विषयांवर वैचारीक, समीक्षात्मक, चरित्रात्मक, वाङमयीन संशोधन या विषयांवरील वैविध्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, नाविन्यपूर्ण व दुर्मिळ ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केले जातात. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेल्या पुस्तकांचे दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी लोकार्पण करण्याची अनेक वर्षाची मंडळाची परंपरा आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कोरोनासारख्या महासंकटातही ही परंपरा खंडित न होऊ देता मंडळाकडून अत्यंत मौलिक अशा 53 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते त्यांच्या मंत्रालयीन दालनात दि. 23 फेब्रुवारी, 2022 रोजी झाले, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील यांनी कळविले आहे.
मराठी भाषा गौरव दिनी 27 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
गौरव व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन
मुंबई, दि. 25 : ज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी रविवारी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिननिमित्त मराठी भाषा विभागातर्फे सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा गौरव व त्यांना पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. भारत सासणे यांच्यासह श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था - लोकवाङ्मय गृह, मुंबई, अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराचे मानकरी (व्यक्ती) - डॉ. रमेश वरखेडे, नाशिक, मराठी अभ्यास परिषद, पूणे (संस्था) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्काराचे मानकरी (व्यक्ती) - डॉ. चंद्रकांत पाटील, पुणे, कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्कार मिळालेली (संस्था) - मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख,मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी चौरंग निर्मित 'शारदेच्या अंगणी मराठीच्या प्रांगणी' हा कार्यक्रम सादर होणार आहे.
पुरस्काराचे नाव व पुरस्कारार्थी यांची माहिती
1) विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक – डॉ.भारत सासणे
· डॉ. भारत सासणे यांनी कथा, नाटक, एकांकिका, कादंबरी, बालसाहित्य, ललित व श्रुतिका लेखन, चित्रपट पटकथा या वाङ्मय प्रकारात लेखन केले असून त्यांची 35 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
· डॉ.भारत सासणे यांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी 7 पुरस्कार व इतर 30 पुरस्कार मिळाले आहेत. मराठवाडा साहित्य संमेलन, सांगली येथे झालेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व जळगांव येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
· डॉ.भारत सासणे यांनी ‘दीर्घकथा’ हा वाङ्मयप्रकार नाविन्यपूर्णतेने व प्रयोगशीलतेने हाताळला आहे.
· सामाजिक वास्तवाच्या चित्रणात अद्भताचे आणि कल्पकतेचे रंग मिसळून कथात्मक साहित्याला विचारपूर्वक कलात्मक आकार दिली.
2) श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था
- लोकवाङ्मय गृह, मुंबई
o पुस्तक व्यवसायापुढची सगळी आव्हाने पेलून सदैव पुरोगामी विचारांशी बांधिलकी बाळगणाऱ्या लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने समाजाला नवी दृष्टी देणारे वाङ्मय सातत्याने प्रकाशित केले आहे.
o ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बृहद चरित्र’, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या मुलाखतींचा संग्रह, अशोक केळकरांचा ‘रुजुवात’ हा मराठी समिक्षेचा मानदंड, सतीश काळसेकर यांचे कसदार साहित्य, दहा निवडक लेखकांच्या साहित्याची संपादित ‘निवडक साहित्यमाला’, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र-चरित्र, अशोक शहाणे, अरुण खोपकर, अरुण काळे, प्रतिमा जोशी, जयंत पवार, मनोहर ओक, नितिन रिंढे, अशा नव्या वळणाच्या प्रयोगशील लेखकांच्या साहित्याने लोकवाङ्मयची सूची उजळून निघाली आहे.
o नवीन लेखक / कवींना पुढे आणण्यासाठी कवि संमेलन, विविध लेखनविषयक स्पर्धा, आपले वाङ्मय वृत्त या मासिकाद्वारे साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक परिघावरील लिखाणाला चालना देण्याचे काम लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने केले आहे.
o वि.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कारासह मराठी विज्ञान परिषद, फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स, मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य संघ या संस्थांचे पुरस्कार लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेस प्राप्त झाले आहेत.
o लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेची गेल्या पन्नास वर्षांतील तेराशे पुस्तकांची भरघोस निर्मिती मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात मौलिक स्वरुपाची भर घालणारी आहे.
3) अशोक केळकर मराठी भाषाअभ्यासक पुरस्कार (व्यक्ती)- डॉ. रमेश नारायण वरखेडे, नाशिक
o ‘अनुष्टुभ’ या मराठी साहित्य आणि समिक्षाव्यवहारात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक.
o पुणे विद्यापीठात व्यावहारिक मराठीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात तसेच पाठ्यपुस्तक निर्मितीतही पुढाकार.
o का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्र धुळे येथे कार्यरत असताना खानदेशातील भिलोरी, पावरा, बंजारा, अहिराणी या बोलींचा भाषिक आणि लोकसांस्कृतिक अभ्यास करण्यासाठी पद्धतिशास्त्र विकसित केले. तसेच ह्या विषयाचा अभ्यास करणाऱ्यांना उपयुक्त असे ‘समाज भाषाविज्ञान:प्रमुख संकल्पना’ हे पुस्तक १९८८ मध्ये प्रकाशित.
o 19वर्षे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अनुदेशन तंत्रविज्ञानाचे प्राध्यापक आणि मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेचे संचालक म्हणून कार्यरत. स्वयं-अध्ययनपर पुस्तकांची निर्मिती. ग्रंथालयशास्त्र, वृत्तपत्रविद्या, मानवी हक्क, ग्राहक संरक्षण, पंचायतराज, सामाजिक परिवर्तन आणि चळवळी असे अनेक नवे अभ्यासक्रम विकसित करून त्यांची परिभाषा तयार केली.
o निवृत्तीनंतर नाशिक येथे इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनिअरिंग या संस्थेचे अध्यक्ष आणि 'क्रिटिकल इन्क्वायरी' या द्वैभाषिक संशोधन-पत्रिकेचे आठ वर्षे संपादन.
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...