सोलापूर जिल्ह्यातील अवैध मार्गाने आलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई
- गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. २१ : सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसी नई जिंदगी भागात, विमानतळ शेजारी आणि कणबस (दक्षिण सोलापूर) येथे अवैध मार्गाने आलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. श्री जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस या ठिकाणी १२ बांगलादेशी नागरिक आढळून आले. त्यांनी भारतात वैध परवाना किंवा कागदपत्रांशिवाय प्रवेश केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य सुभाष देशमुख यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
गृह राज्यमंत्री कदम म्हणाले की, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर यांनी संयुक्त कारवाई करत या कारखान्यात पाहणी केली असता, तेथे १२ बांगलादेशी नागरिक सापडले. त्यानंतर तपास पथके बंगळूर आणि मुंबई येथे पाठवण्यात आली. या कारवाईत आणखी दोन जणांना ताब्यात घेतले असून, एकूण १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गृहराज्यमंत्री श्री.कदम म्हणाले की, सुरक्षा यंत्रणांकडून संशयित बांगलादेशी नागरिकांची तपासणी नियमितपणे केली जाते. संशयास्पद नागरिकांची माहिती वेळोवेळी मिळावी यासाठी नागरिकांनी आणि व्यवसायिकांनी सतर्क राहावे. घर भाड्याने देताना किंवा कामगार नियुक्त करताना त्यांची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. बांगलादेशी नागरिक अवैध मार्गाने कामावर रुजू झाले असल्यास, संबंधित कंपन्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील असेही गृहराज्यमंत्री श्री. कदम यांनी सभागृहात सांगितले.
०००</sp
No comments:
Post a Comment