Tuesday, 23 April 2019

उन्हाळ्यात अशी घ्या काळजी !


      उन्हाळा आला, की शरीराची लाही लाही होते. सद्यस्थितीत वातावरणात उष्णतेची लाट आहे. मेपर्यंत ती राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहेच. उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी प्रत्येकाने प्रशासनाच्या मार्गदर्शक उपायांना कृतीत आणावे. जेणेकरून शरीराची योग्य काळजी घेतली जाईल. अन् उन्हापासून बचावही.

      उन्हापासून बचावासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक असावे. त्यासाठी प्रत्येकाने तहान लागलेली असो वा नसो तरीही जास्तीत जास्त पाणी प्यावे. अंगावर हलकी, पातळ, सच्छिद्र, सैल, सुती कपडे वापरावीत. घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, छत्री, डोळ्यावर काळा गॉगल, पायात बूट अथवा चप्पल परिधान करावीच. प्रवासात सोबत पाण्याची बाटली ठेवावीच. उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी, छत्रीचा वापर करावा. त्याचबरोबर ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा. तीव्र उष्णतेच्या लाटेने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. ते होऊ नये, यासाठी अधिक पाणी पिणे उचित. त्याचबरोबर ओआरएस, घरी तयार केलेली लस्सी, लिंबूपाणी, ताकाचे सेवन करावे.

        अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सततचा येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची लक्षणे आहेत. ती वेळीच ओळखावीत आणि चक्कर आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

      घरे, दुकाने, आपण ज्याठिकाणी राहतो तिथला परिसर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे वापरावेत. कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी उपाय योजावेत. कामगारांनाही याबाबत अवगत करावे. उन्हापासून बचावासाठी शक्यतो पहाटेच कामे अधिकाधिक उरकावीत. उन्हात काम करताना मध्येमध्ये थोडासा विसावा घ्यावा.

       गरोदर महिला, आजारी कामगारांनी उन्हापासून बचावासाठी अधिकाधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उन्हापासून बचाव, संरक्षणासाठी शेड उभारावेत. जागो-जागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी, या उपाययोजना केल्यास उन्हापासून संरक्षण होऊन बचावही होऊ शकतो. मानवाला ज्याप्रमाणे पाण्याची आवश्यकता असते, अगदी त्याचप्रमाणे मुक्या जनावरांचाही विचार करावा. गुरांना छावणीत ठेवावे. त्यांनाही पुरेसे पाणी पिण्यास द्यावे.

       उन्हाच्या तीव्र लाटेपासून संरक्षण कसे करावे, ते आपण वाचलेच. परंतु काय करू नये, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी लहान मुले, पाळीव प्राण्यांना बंद किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालणे टाळावेत. तापमानाचा अंदाज घेऊन अधिक तापमान असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हापासून बचावासाठी दुपारी १२ ते ३.३० वाजेपर्यंत घरातून बाहेर पडणे टाळावे. शिवाय यावेळेत शारीरिक परिश्रम, स्वयंपाक करण्याचेही टाळावे. स्वयंपाक घरात मोकळी, खेळती हवा राहण्यासाठी स्वयंपाक घराची दारे, खिडक्या उघडी ठेवावीत.

      मे महिन्यांपर्यंत राहणाऱ्या या उष्णतेच्या लाटेपासून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी, बचाव व संरक्षणासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सूचविलेल्या या उपाययोजना अंमलात आणाव्यात. तसेच उन्हाळ्यात होणारा त्रास आणि उद्भवणाऱ्या आजारांपासून दूर राहावे. त्यामुळे प्राधिकरणाने सूचविलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येकाने काळजी घ्यावीच आणि निरोगी रहावे.

                                                                                     श्याम टरके, 

                                                                          माहिती सहायक, औरंगाबाद




No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi