👆👆 महाड तालुक्यातील केंबुर्ली येथे दोनशे खटांचे हॉस्पिटल ला मंजुरी ..
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 1 December 2023
कायदेविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'विधी विधान इंटर्नशीप' १५ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत
कायदेविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'विधी विधान इंटर्नशीप'
१५ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत
मुंबई, दि. 30 :- विधी व न्याय विभागातील 'विधी विधान शाखा' ही राज्याच्या कायद्यांचे मसुदे तयार करण्यासाठी विशेष स्वतंत्र शाखा म्हणून स्थापन करण्यात आली आहे. या शाखेत कायदे तयार करणे, कायद्यांमध्ये सुधारणा करणे, अध्यादेश प्रख्यापित करणे, विधान मंडळात विधेयके पारित करण्याची कार्यपद्धती, अधिनियम आणि नियम तयार करणे, अधिसूचना करणे, इत्यादी कामे करण्यात येतात. राज्यात कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विधी व न्याय विभागाच्या विधी विधान शाखेबाबत माहिती व्हावी व त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, त्यांच्या कार्य क्षेत्रातील करिअरसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी उपयोग व्हावा यादृष्टीने विधी व न्याय विभागाच्या विधी विधान शाखेमध्ये दहा विद्यार्थ्यांकरीता सहा आठवड्यांचा इंटर्नशीप उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
हा उपक्रम १ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी १ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत sec.legislations maharashtra.gov.in या ई-मेलवर अर्ज पाठवावा.
विद्यार्थ्यांच्या निवडी संदर्भात निकष
शैक्षणिक अर्हता :- इंटर्नशीप उपक्रम राज्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त विधी महाविद्यालय किंवा विधी विद्यापीठातून विधी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे.
पाच वर्षाचा विधी पदवी अभ्यासक्रम : चौथ्या किंवा पाचव्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी.
तीन वर्षाचा विधी पदवी अभ्यासक्रम, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी. विधी पदव्युत्तर पदवी, पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी यासाठी अर्ज करु शकतात.
अर्ज करण्याची पद्धत
इंटर्नशीपसाठी अर्ज विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाकडे किंवा विद्यापीठाकडे विहित नमुन्यात करावयाचा आहे. महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने त्यांना प्राप्त झालेल्या अर्जांपैकी जास्तीत जास्त दोन अर्ज ई-मेल वर पाठविणे आवश्यक आहे.
इंटर्नशीप उपक्रमाची रूपरेषा
या इंटर्नशीप उपक्रमामध्ये शासनाच्या कामकाजाबद्दल माहिती, विधेयकांचे व अध्यादेशाचे प्रारूप तयार करण्याबाबतची कार्यपद्धती, अधिनियमाखालील नियम व अधिसूचना तयार करण्याची, बनविण्याची कार्यपद्धती, विधानमंडळात विधेयक पारित करण्याबाबतची कार्यपद्धती, विधी विधान शाखेतील अधिकारी, विधी विधान, दुय्यम विधी विधान तसेच इतर संबंधित वेगवेगळ्या विषयांवर माहिती देतील. विविध प्रकारचे कायदे व त्यामधील विशिष्ट प्रकारच्या तरतुदीबाबतची माहिती, संविधानातील कायदेविषयक तरतुदी, त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो याबाबतची माहिती, विधी विधानांच्या कामकाजाबाबत संबंधित कार्यालयाला भेटी देणे इत्यादीचा समावेश असणार आहे. इंटर्नशीप कार्यक्रम मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरील विधी व न्याय विभागाच्या कार्यालयात घेण्यात येईल. या इंटर्नशीप उपक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतेही मानधन, भत्ता किंवा खर्च देय असणार नाही. विद्यार्थ्यांना राहण्याची सोय स्वतः करावी लागेल. निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर निर्देशित केलेल्या ठिकाणी विहित मुदतीत विद्यार्थ्यास स्व-खर्चाने हजर व्हावे लागेल.
या संदर्भातील आदेश 28 नोव्हेंबर 2023 रोजी च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहेत.
0000
आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय
आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण ; ‘नमो 11’ सूत्री कार्यक्रमाचा शुभारंभ
रत्नागिरी, दि.30 : सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पाऊले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करत आहोत. सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन ‘नमो 11’ सूत्री कार्यक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. राजीव निवतकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शिरगावच्या सरपंच फरिदा काझी, माजी आमदार विनय नातू, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी निर्णय झाला होता आणि वर्षभरातच त्याचा शुभारंभ होत आहे. 430 खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे. 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी देखील 400 ठिकाणी झाली आहे. औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोग्य विभागाचा कायापालट झाला पाहिजे. ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या आहेत. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची रक्कम 5 लाखांवर वाढविली आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून 1 कोटी 80 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कोकणात जेवढी विकास कामे आणता येतील तेवढी आणू. रत्नागिरी विमानतळाला 118 कोटी मंजूर केले आहेत. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीमधून 160 कोटी रुपये खर्च झाले आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु, बळीराजाने चिंता करु नये. सरकार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, मागासवर्ग घटक अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबध्द आहे. ‘नमो 11’ सूत्री कार्यक्रम या सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम आहे. शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, या महाविद्यालयामुळे मागणी पूर्ण झाली आहे. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा केला. भविष्यात टप्प्या-टप्प्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याचा मानस आहे. बी.एस.सी. नर्सिंग अभ्यासक्रम देखील या महाविद्यालयात सुरु केला जाईल. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी भरतीसाठीचा शासन निर्णय काढूनच येथे आलो आहे. शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहचविण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी यांनी हातात हात घालून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाविषयी मुख्यमंत्री यांच्याशी मी बोललो. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दूरध्वनीवरुन मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणण्यास सांगितले. त्यासाठी 522 कोटी रुपये मंजूरही केले. पुणे, मुंबई नंतर रत्नागिरीला परिपूर्ण एज्युकेशन हब बनविण्यासाठी मेडिकल कॉलेज देखील दिले. उद्योजकांना 100 टक्के इन्सेव्टिव्ह देण्याचा निर्णय देखील घेतला.
कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी, तर मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी आभार प्रदर्शन केले.
दिव्यांग लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ
वसंत घाणेकर, संजय पावसकर यांना घरकुल योजनेसाठी 6 लाख 80 हजार निधी वितरीत करण्यात आला. दिनेश शितप व मुक्ता शिरसाट, सूरज अवसरे व सोनाली जाधव यांना दिव्यांग-दिव्यांग विवाह योजनेत 5 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. अंकिता कोलगे, संदीप कांबळे, भारती भायजे, संतोष रहाटे यांना स्वयंचलित 3 चाकी सायकल वाटप करण्यात आल्या. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील 14 विद्यार्थ्यांना व्हील चेअर, सीपी चेअरचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील 2 हजार 443 सीआरपींना मोबाईल वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात 6 महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल वाटप करण्यात आले. ‘नमो शेततळी’ अभियानांतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
000
नाका कामगारांच्या कौशल्य विकासासाठी ४ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद
नाका कामगारांच्या कौशल्य विकासासाठी
४ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद
- मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई शहर आणि उपनगर येथील ७ हजार ५०० नाका कामगारांना मिळणार लाभ
मुंबई, दि. ३० : बांधकामाची आधुनिक पद्धती लक्षात घेऊन मुंबई शहर आणि उपनगर येथील ७ हजार ५०० नाका कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी प्रथम टप्प्यात चार कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक कामगाराचा कौशल्य विमा सुद्धा विभागामार्फत काढण्यात येणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेतून भारतीय मजदूर संघ आणि बांधकाम सेक्टर स्किल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य प्रमाणिकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, भारतीय मजदूर संघाचे सचिव अनिल घुमने व नाका कामगार उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यामध्ये बांधकाम क्षेत्रात कुशल कामगारांची आवश्यकता व त्यामधील 55 टक्के त्रुट लक्षात घेता बांधकाम क्षेत्रामधील 47 टक्के कुशल कामगारांचा आजही अभाव समोर येतो. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य असून, बांधकाम क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेऊन नाका कामगारांना कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांसाठी पूर्वज्ञान कौशल्य प्रमाणिकरण कार्यक्रम राबवला जात आहे त्याचा लाभ या कामगारांनी घ्यावा.
यावेळी नाका कामगारांना बांधकाम क्षेत्रात देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण विषयक साहित्याचे वाटप करण्यात आले.
******
गीत रामायणाचा गोडवा अजूनही कायम
गीत रामायणाचा गोडवा अजूनही कायम
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्वर सम्राट सुधीर फडके चौकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 30 :- सध्या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक माध्यमातून रसिक श्रोत्यांचे मनोरंजन होत असले तरीही गीत रामायणाचा गोडवा अजूनही कायम आहे. हा गोडवा यापुढेही तो कायम राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते ह्युजेस रोड, गावदेवी, मुंबई येथील स्वर सम्राट सुधीर फडके चौकाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, श्रीधर फडके, महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद महाराज आदी उपस्थित होते.
बाबूजींच्या नावाच्या चौकाचे उद्घाटन करण्याचे भाग्य आपणास लाभले याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बाबूजींची मनाला प्रसन्न करणारी भक्ती गीते, सदाबहार गाणी हा अजरामर गीतांचा खजिना आहे. बाबूजींनी स्वरबद्ध केलेली गीते आजही रसिक श्रोत्यांच्या मनाला भुरळ घालत असून त्यांनी गायलेली गाणी रसिकांच्या ओठावर रेंगाळत आहेत.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या चौकात निर्माण केलेल्या शिल्पातून सुधीर फडके तथा बाबूजींच्या स्मृती चिरंतन जपल्या जातील. बाबूजींचे व्यक्तिमत्त्व प्रेरक असून ते भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल. अशी व्यक्तिमत्वे कायम मनात जपू या असे आवाहन ही त्यांनी केले. चौकात केलेली बाबूजींच्या शिल्पाची रचना चौकातून जाणाऱ्या-येणाऱ्याला प्रेरणा देईल व चौकात स्वर सम्राटाचे स्वरतीर्थ निर्माण झाल्याची भावना त्याच्या मनात निर्माण होईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
बाबूजींनी संगीताची साधना करून रसिकांच्या मनात आपले दृढ स्थान निर्माण केले असल्याचे सांगून मंत्री श्री. लोढा यांनी महानगरपालिकेतर्फे या चौकाचे नामकरण केल्याबद्दल महानगरपालिकेचे त्यांनी अभिनंदन केले.
श्री विश्वेश्वरानंद महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी नृत्य कला निकेतन ग्रुपने भरतनाटयम् सादर केले.
०००००
वृत्त वाहिन्यांनी लोकहिताच्या निर्णयांना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे
वृत्त वाहिन्यांनी लोकहिताच्या निर्णयांना
लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 1 : राज्याची प्रगती आणि समृद्धी हेच राज्य शासनाचे ध्येय आहे. सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मराठी वृत्त वाहिन्यांनी शासनाच्या लोकहिताच्या निर्णयांना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मराठी चित्रपट आणि रंगमंच क्षेत्रातील कलावंतांमध्ये गुणवत्ता असून, हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या चित्रपट क्षेत्राच्या प्रगतीसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
टिव्ही 9 मराठी आयोजित ‘आपला बायोस्कोप - मराठी टिव्ही आणि फिल्म अवॉर्ड्स 2023’ मधील प्रमुख पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व कलावंतांचे आणि विजेत्यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, कलावंत हे अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका निभावतात. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप दिल्याने त्यांना प्रोत्साहन मिळते. टिव्ही 9 हे देशातील मोठे नेटवर्क आहे. टिव्ही 9 चा हा पहिलाच पुरस्कार सोहळा असून त्यात मराठी कलावंतांचा पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल त्यांनी टीव्ही 9 चे अभिनंदन केले.
मराठी कलावंतांनी रंगमंच जीवंत ठेवले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठी लोकांनी कलात्मकता आणि सर्जनशीलता जपली असून मराठी कलावंतांनी रंगमंच जीवंत ठेवले असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.
टिव्ही 9 ने साधलेल्या प्रगतीचे कौतुक करून बायोस्कोप ला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त टिव्ही 9 ने त्याच नावाने आपले पहिले पुरस्कार देण्याची सुरूवात केल्याबद्दल त्यांनी टिव्ही 9 नेटवर्कचे अभिनंदन केले.
मराठी चित्रपटांनी आपला दर्जा कायम राखला असल्याचे सांगून त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे यावेळी अभिनंदन केले.
प्रारंभी टिव्ही 9 नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक बरूण दास यांनी प्रास्ताविकाद्वारे आपल्या वाहिनीची भूमिका मांडली.
यावेळी सुभेदार या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा तर अभिनेता रितेश देशमुख यांना वेड या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वाळवी चित्रपटातील भूमिकेसाठी शिवानी सुर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली तर सुभेदार चित्रपटासाठी दिगपाल लांजेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. मालिका विभागामध्ये ‘ठरलं तर मग’ मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा, सचिन गोखले यांना याच मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा तसेच जुई गडकरी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर ‘जय जय स्वामी समर्थ’साठी अक्षय मुडावदकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
0000
पोयसर नदी रुंदीकरणातील बाधितांना याच परिसरात मिळाली घरे! चावी वाटपानंतरच नदी रुंदीकरण कामाचा प्रारंभ, आमदार अतुल भातखळकर यांच्या पाठपुराव्याला यश
पोयसर नदी रुंदीकरणातील बाधितांना याच परिसरात मिळाली घरे!
चावी वाटपानंतरच नदी रुंदीकरण कामाचा प्रारंभ, आमदार अतुल भातखळकर यांच्या पाठपुराव्याला यश[फोटो आहेत]
मुंबई : पोयसर नदी रुंदीकरणाच्या कामात बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांना याच परिसरात घरे उपलब्ध करून आज या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आणि त्यानंतरच नदीच्या रुंदीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नातून बाधित झोपडपट्टीधारकांना आज महापालिका आर. दक्षिण विभाग कार्यालयात घरांच्या चावीचे वाटप करण्यात आले. तसेच हनुमाननगर येथे नदी रुंदीकरण कामाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला.
महापालिका विभाग कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आज २१ बाधित झोपडपट्टी धारकांना आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते चावीचे वाटप करण्यात आले. तसेच या पूर्वी ३५ बाधिताना घरांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, विकास हा माणुसकीच्या दृष्टिकोनातून करावा लागतो. लोकांच्या घरांवर बुलडोजर फिरवून विकास काही उपयोगाचा नाही. याच भूमिकेतून पोयसर नदी रुंदीकरणात बाधित झालेल्या झोपडपट्टी धारकांना याच परिसरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. आज बाधित नागरिकांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द करताना आनंद होत आहे. आमचा विकासाला विरोध नाही उलट विकास हाच भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे, असेही आमदार भातखळकर म्हणाले.
पोयसर नदी रुंदीकरण आणि खोलीकरण कामात परिसरातील बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांना याच परिसरात घरे मिळाली पाहिजेत यासाठी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते. या कामासाठी खूप संघर्ष केला होता. अखेर या प्रयत्नाना यश आले. यावेळी उपस्थित बाधित झोपडपट्टी धारकांनी चावी मिळाल्यानंतर समाधान व्यक्त करून आमदार अतुल भातखळकर यांचे आभार मानले.
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...