Thursday, 7 April 2022

 गडचिरोली जिल्ह्यात आता ब्लॉकचेन प्रणालीद्वारे जात प्रमाणपत्रे निर्गमित होणार.

जात प्रमाणपत्रांची नक्कल तसेच खोटी प्रकरणे रोखण्यासाठीमहाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनाचा नावीन्यपूर्ण उपक्रम.

            मुंबई, दि. 7 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नाने गडचिरोली जिल्ह्यात जात प्रमाणपत्रे प्रमाणित करण्यासाठी आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे जात प्रमाणपत्रांची नक्कल, खोटी प्रकरणे रोखण्यास मदत होणार आहे. यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप वीक विजेत्या लेजीटडॉक (LegitDoc) या स्टार्टअपची नियुक्ती करण्यात आली आहे.

            सध्या डिजिटल स्वाक्षरी केलेली जात प्रमाणपत्रे नागरिकांना महाऑनलाइन पोर्टलद्वारे जारी केली जातात. तथापि, बहुसंख्य लोक सोयीच्या दृष्टीने जात प्रमाणपत्रे कागदी प्रिंटच्या स्वरूपात बाळगतात आणि यामुळे छापील कागदांवरील डिजिटल स्वाक्षरी प्रमाणित करणे शक्य होत नाही. डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रमाणपत्रे जारी करूनही आज जात प्रमाणपत्रांची नक्कल आणि खोटी प्रकरणे निदर्शनास येतात. हे टाळण्यासाठी आता ब्लॉकचेन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत पॉलीगॉन POS तंत्रज्ञानाचा वापर करून जात प्रमाणपत्रे ब्लॉकचेन प्रणालीद्वारे प्रमाणित करता येणार आहेत. प्रत्येक जात प्रमाणपत्रावरील महत्त्वाचे तपशील पॉलीगॉन POS ब्लॉकचेन सिस्टीमद्वारे क्रिप्टोग्राफिक QR कोड स्वरुपात दर्शविले जातील. या QR कोडद्वारे शासकीय विभाग अथवा इतर कोणत्याही कार्यालयांना या प्रमाणपत्राची पडताळणी व सत्यता सत्यापित करणे शक्य होणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली उपविभागात राबविला जात असून मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असलेल्या एटापल्ली आणि भामरागडमधील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

            या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना, सहायक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एटापल्ली उपविभाग कार्यालयाच्या अधिपत्याखालील सुमारे 65 हजार जात प्रमाणपत्रांची माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे. पुढील एका महिन्यात जात प्रमाणपत्रांचा सर्व डेटा ब्लॉकचेन प्रणालीमध्ये भरला जाणार आहे. QR कोड असलेली ब्लॉकचेन-सक्षम जात प्रमाणपत्रे जिल्ह्यातील सामायिक सेवा केंद्रांद्वारे (Common Service Centre) नागरिकांना प्राप्त करता येतील.

            याबाबत श्री. कुशवाह म्हणाले की, भारतातील काही सर्वात मोठ्या स्टार्टअप्सच्या यशोगाथांचे मूळ महाराष्ट्रात आहे, ज्या की आज जागतिक स्तरावरही यशस्वी ठरत आहेत. महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहांतर्गत विजेत्या ठरलेल्या स्टार्टअप्सना त्यांच्या उत्पादन, सेवेच्या प्रकल्पांची शासनाच्या विविध विभागांबरोबर प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी 15 लाख रुपयांचे कार्यालयीन आदेश देण्यात येतात. हा उपक्रम प्रशासनात नाविन्यता आणण्यात मोठी भूमिका बजावत आहे, असे त्यांनी सांगितले. 

            सहायक जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले की, या नावीन्यपूर्ण यंत्रणेमुळे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेल्या कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्रांच्या गैरवापरास आळा बसेल. येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनद्वारे नवीन प्रमाणपत्रे ब्लॉकचेनद्वारे निर्गमित केले जातील.

            लेजीटडॉक (LegitDoc) स्टार्टअपचे सहसंस्थापक नील मार्टिस म्हणाले की, प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी महाराष्ट्र शासन ई-गव्हर्नन्स उपक्रमांमधे वेब/ब्लॉकचेनसारख्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची बाब अतिशय महत्वकांक्षी व लक्षणीय आहे. अशा उपक्रमांमुळे येणाऱ्या काळात आमुलाग्र सकारात्मक बदल दिसतील.

            ब्लॉकचेन प्रणालीद्वारे निर्गमित केलेल्या कोणत्याही कागदपत्रांची सत्यता अवघ्या 10 सेकंदांत सत्यापित करता येते. कुठल्याही प्रकारच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

००००


 


 




                                                    

 विमेन ग्रॅज्युएट्स युनिअनतर्फे राजभवन येथे स्त्रीशक्तीचा सन्मान


स्त्रीशक्ती सोबतच मातृभाषा व मातृभूमीचा सन्मान व्हावा


- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई, दि. 7 :- विद्यापीठांमध्ये महिला स्नातकांची संख्या पुरुषांपेक्षा वाढत आहे. सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या मुलींची संख्या ८० टक्क्यांच्यावर आहे. काही वर्षांनी भारतीय प्रशासन व पोलीस सेवेत देखील महिला अधिकाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांवर जाईल. मातृशक्तीचा पुनश्च जागर होत असताना मातृभाषा व मातृभूमीचा देखील सन्मान वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            मुंबईतील १०७ वर्षे जुनी असलेल्या विमेन ग्रॅज्युएट्स युनिअन (महिला स्नातक संघ) या संस्थेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा तसेच संस्थेच्या आजी माजी विश्वस्त व अध्यक्षांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे आज सत्कार करण्यात आला त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

            व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा ॲड. गौरी छाब्रिया व माजी अध्यक्ष हवोवी गांधी उपस्थित होत्या.

            भारतात प्राचीन काळापासून मातृशक्तीला महत्व दिले आहे. अनेक प्रांतात लोक देशाला पितृभूमी म्हणतात परंतु भारतात लोक मातृभूमी शब्द वापरतात. आईकडून उत्तम संस्कार मिळाले तरच उत्तम पिढी तयार होते. पूर्वी महिलांना महत्वाचे स्थान होते त्यावेळी देशाने सुवर्णयुग पाहिले. कालांतराने महिलांना अवमानित केले गेले व अन्यायकारकरीतीने वागविले गेले. त्यामुळे देशाचे अधःपतन झाले. आज स्त्रीशक्तीचा पुनश्च जागर होत आहे. मातृशक्तीचे सहकार्य लाभल्यास देश पुन्हा जगतगुरु होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉ आयेशा सुनावाला, पत्रकार तबस्सुम बारनगरवाला, डॉ. सपना रामाणी सलढाणा, डॉ. प्राजक्ता आंबेकर, सिमरन अहुजा, सुनीता भुयान, महिला स्नातक परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुधा पाध्ये, दोलत कोतवाल, प्रा.सबिता चुगाणी, शैला शास्त्री, माजी अध्यक्षा नंदिता सिंह, महिला पदवीधर संघाच्या विश्वस्त काश्मिरा मेहेरहोमजी अध्यक्षा अ‍ॅड. गौरी छाब्रिया, हवोवी गांधी, डॉ गिरधर लुथरिया, आशिष सिंह, राजश्री त्रिवेदी व अ‍ॅड.निर्मला सामंत प्रभावळकर यांचा सत्कार करण्यात आला.

            यावेळी गायिका व व्हायोलिनवादक सुनीता भुयान यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. महिला स्नातक संघातर्फे काम करणाऱ्या महिलांना हॉस्टेल तसेच शिक्षण शिष्यवृत्ती दिली जात असल्याचे गौरी छाब्रिया यांनी सांगितले.

0000

 राज्यात सौर ऊर्जा पार्क उभारणार महानिर्मितीच्या एनटीपीसी समवेत कंपनी स्थापण्यास मान्यता

        राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंतचे अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याकरीता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (किंवा त्यांचे सहाय्यक/ सहयोगी कंपनी) व महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महानिर्मिती) यांच्या दरम्यान अनुक्रमे 50:50 या प्रमाणात भांडवली गुंतवणूक राहील.

            ही संयुक्त उद्यम कंपनी राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करेल. त्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागास राज्य सुकाणू अभिकरण (State Nodal Agency) म्हणून घोषित करण्यात आले.

            या समितीवर राज्य शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाशी सुसंगत अशा बाबींचे पालन करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सौर ऊर्जा पार्कमधील प्रकल्पधारकाकडून एक रकमी शुल्क व वार्षिक संचलन व देखभाल शुल्क इ. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुज्ञेय करण्यात आले आहे

            अपारंपरिक ऊर्जासाठी 17360 मेगावॅट क्षमतेच्या निर्मितीचे प्रकल्प 21 मार्च 2025 पर्यंत विकसित करण्यात येणार असून यापैकी 12930 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यात सध्या 9305 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून 2123 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.

-----०-----


 



 




 

बढती उम्र.

 


काश्मीर फाईल,उघडा डोळे

 बघा कोणाचे डोळे

उघडतायत का…? 👀🙄

——————————

#kashmirfilesmovie वरुन कौल काका आठवले मला. जुना लेख आहे.

निर्वासित

माझं घर बांधून नुकतंच झालं होतं तेव्हाची गोष्ट. पलंगांच्या मापांच्या गाद्या करून घ्यायच्या होत्या. गावातल्या एका चांगल्या फर्निशिंगच्या दुकानात फोन केला, मालक म्हणाले 'दुपारी नमुने घेऊन आमच्या माणसाला पाठवतो. तुम्ही हवी त्या जाडीची, हवी त्या प्रकारची गादी निवडा. तेच गृहस्थ मापं घेतील. तीन वाजता येतील ते गृहस्थ नमुने घेऊन तुमच्या घरी'. आता हे पुण्याचे तीन, त्यामुळे ते गृहस्थ निवांत साडेतीन पर्यंत येतील ह्या हिशेबाने आम्ही सव्वातीनपर्यंत नव्या घरी पोचलो, बघितलं तर फाटकाबाहेर एक जुनी दुचाकी उभी होती आणि घराच्या पायरीवर एक साठीचे गृहस्थ आमची वाट बघत शांतपणे बसून होते. बाजूला दोन मोठ्या पिशव्या ठेवलेल्या. 


दिवस एप्रिलचे, उन्हाने अंगाची नुसती काहिली काहिली होत होती आणि त्या उन्हात तापलेल्या पायरीवर ते गृहस्थ बसले होते. आम्ही खूप खजील झालो. उशिरा आल्याबद्दल त्यांची माफी मागितली, 'असू दे बेटा, होतं असं.' ते म्हणाले. मराठीतच बोलत होते, पण भाषेत किंचित उत्तरेकडचा बाज डोकावत होता. आम्ही बरोबर आणलेल्या किल्लीने दरवाजा उघडला आणि आत गेलो. पहिलं काम केलं म्हणजे पंखा लावला आणि त्यांना पाणी दिलं. बाटली वाकडी करून ते घटाघटा पाणी प्याले आणि डोळे मिटून काही क्षण पंख्याखाली स्वस्थ बसले. 'खूप उन्हाळा तापलाय ना ह्या वर्षी '? मी म्हणाले. ते हसले, म्हणाले, 'पंधरा वर्षे झाली महाराष्ट्रात येवून, पण इथला उन्हाळा काही अजून सहन होत नाही'. खरंच, उन्हाने त्यांचा मुळचा गोरा चेहरा चांगलाच रांपला होता. 


थोड्या वेळाने एक दीर्घ सुस्कारा सोडून उठत ते म्हणाले, 'चला, बेटा, नमुने बघून घेता?'. पुढचा काही वेळ ते कामात गढून गेले. आम्हाला आणि मुलांना आणलेले नमुने    

दाखवले, प्रत्येकाची किंमत, फीचर्स व्यवस्थित समजावून सांगितले आणि आम्ही निवड केल्यानंतर त्यांनी सगळ्या पलंगांची मापे घेतली. ते मापे घेत असताना मी त्यांचे निरीक्षण करत होते. अजिबात घाई न करता, काळजीपूर्वक त्यांचं काम चालू होतं. प्रत्येक बाजू मोजली की बरोबरच्या वहीत ते आकडे नोंदवायचे, ते सुद्धा सावकाश, एका ओळीत, सुंदर अक्षरात. त्यांच्या कामात कुठेही घिसाडघाई नव्हती. माझी मुलगी त्यांचं हे माप घेणं बारकाईने बघत होती, मधून मधून त्यांना प्रश्न विचारत होती, आणि ते काका अजिबात न कंटाळता तिच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. त्यांचं एकूण सौजन्य, वागण्यात ओसंडून वाहणारा सुसंस्कृतपणा, खरोखरच वाखाणण्याजोगा होता. 

मापं घेऊन झाली. नमुने परत पिशवीत ठेवत ते म्हणाले, 'आठ दिवसात गाद्या तयार होतील. पुढच्या गुरुवारपर्यंत डिलिव्हरी मिळून जाईल, आता जातो मी', 'थांबा काका, लिंबू शरबत करते' मी म्हटलं. 'नको, नको, उशीर होईल, परत गावात पोचायला हवं पाच वाजेपर्यंत,' ते संकोचानं म्हणाले. 'घ्या ना आजोबा शरबत', लेकीने आग्रह केला. हे आजोबा एकूण तिला फारच आवडले होते असं दिसत होतं. 'खूप गोड आहे तुमची मुलगी, लहानपणी माझी नात अगदी अशीच दिसायची', कौतुकाने अनन्याकडे बघत ते काका म्हणाले. 

मी शरबत करून आणलं, आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या. 'तुम्ही मराठी खूप चांगलं बोलता', मी म्हटलं, 'बेटा, गेली पंधरा वर्षे झाली मी महाराष्ट्रात आहे, मग इथली भाषा शिकायला नको'? ते हसत म्हणाले. 'तुम्ही मुळचे कुठले, पंजाबचे का?' मी विचारलं. त्यांचा लख्ख गोरा रंग आणि भाषेचा लेहजा बघून मला ते मनोमन पंजाबी वाटले होते. 'नाही बेटा, माझं नाव हरीकिरण कौल. मी मुळचा काश्मीरचा. सारस्वत ब्राह्मण. काश्मिरी पंडित.' ते काहीसं खिन्न हसत बोलले. त्या एकाच वाक्यात त्यांनी त्यांच्या गेल्या दोन दशकातल्या आयुष्याचा पूर्ण जमाखर्च मांडला होता. 'मग तुम्ही, काश्मीर नव्वदमध्ये सोडलंत'? मला पुढे बोलवेना. 

'सोडावंच लागलं बेटा. श्रीनगर मध्ये दुकान होतं माझं स्वतःचं. हेच फर्निशिंगचं. घर होतं, जमीन होती. पण अक्षरशः एका रात्रीत सगळं सोडून जावं लागलं. ज्यांच्याशेजारी पिढ्यानपिढ्या राहिलो होतो तेच जीवावर उठले. आम्हाला सांगण्यात आलं, आजादीच्या लडाईत सामील व्हा, तुमच्या पोरी-बाळी आमच्या स्वाधीन करा नाहीतर काश्मीर सोडून चालते व्हा'. कौल म्हणाले. भावनावेगाने त्यांचा आवाज कापत होता. 'कुठे जाणार होतो आम्ही आमचं वतन सोडून? पण जावंच लागलं आणि सगळ्या आयुष्याचीच फरफट झाली पहा'. 

'काही दिवस जम्मूला नातेवाईकांकडे काढले, काश्मीरला लवकरच परिस्थिती निवळेल आणि आम्ही परत जाऊ ह्या आशेने. पण काही काही झालं नाही. सरकारने काहीही मदत केली नाही आम्हाला. तिथून आम्ही आलो दिल्लीला. तिथे निर्वासित म्हणून काही महिने काढले. मग पोटाच्या पाठी लागून एक दिवस मुंबईला आलो. मुलं शाळेत शिकत होती, हातपाय हलवणं भागच होतं आम्हाला. मुंबईला एका फर्निशिंगच्याच दुकानात नोकरी धरली, हरकाम्या म्हणून, काश्मीरला दहा माणसं माझ्या दुकानात पगारावर होती, आणि इथे मुंबईत मी हातात टेप घेऊन कुणाच्या तरी दुकानात सामान्य कामगार म्हणून उभा होतो. पुढे चांगल्या कामामुळे मालकाचा विश्वास कमावला आणि त्याने पुण्याला पाठवलं, इथल्या दुकानाची व्यवस्था बघायला. तेव्हापासून पुण्यातच आहे'. कौलकाका म्हणाले. 

त्यांची कहाणी ऐकून मी सुन्न झाले होते. काश्मिरी पंडितांची वाताहत कशी झाली, कुणी केली हे वर्तमानपत्रातून वाचणं वेगळं आणि अश्या ठसठसत्या वेदनेचा आलेख डोळ्यांसमोर कुणी उलगडत असताना ऐकणं वेगळं. 'आता मुलं काय करतात', गढूळलेलं वातावरण निवळावं म्हणून मी कौलकाकांना विचारलं. ते परत एकदा काहीसं कडवट हसले, म्हणाले, 'मुलं मोठी झालीत आता, मुलीचं लग्न झालंय. ती दिल्लीला असते. मुलगा अमेरिकेत एमएस करून नोकरी करतोय, म्हणतोय मी परत भारतात येणार नाही. आता अमेरिकेतच राहीन. निर्वासितच म्हणून राहायचं तर इथे अमेरिकेत का नको? आपल्याच देशात निर्वासिताचं जिणं जगणं ह्याहून जास्त लाजीरवाणी गोष्ट जगात असूच शकत नाही'. 

कौलकाका निघून गेले तरी त्यांचे शब्द कितीतरी वेळ माझ्या कानात घुमत होते! 

- Shefali Vaidya…

 *सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ........*


झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂

पाण्याचे डबे आणून सोडी 🚎

वाळकी झाडे पाहू या 🎍🌾

मामाच्या गावाला जाऊ या 👫


मामाचा गाव मोठा 😆

पाण्याचा लय तोटा 🚱

हंडा रांगेत लावु या 🏮🏮

मामाच्या गावाला जाऊ या 👫


मामाची बायको सुगरण 💃🏻

पाण्यासाठी फिरते वणवण 😰

बिनआंघोळीचे राहू या 😝

मामाच्या गावाला जाऊ या 👫


मामाची बायको गोरटी ☺

म्हणेल कुठून आलीत ही कार्टी😜

पाण्यासाठी भांडु या 😡

मामाच्या गावाला जाऊ या 👫


मामा मोठा तालेवार 👳🏻

आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार 💊

कोरड्या पाण्याने न्हाऊ या 🗑

मामाच्या गावाला जाऊ या 👫


😝😂😆

*झाडे लावा, झाडे जगवा*

😂😂😂

Featured post

Lakshvedhi